Thursday 3 October 2019

अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून पर्यावरणाप्रती अहिंसा आवश्यक: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित सौरदूत कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा संचालक गजानन पळसे.



शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित सौरदूत कार्यशाळेत सोलर स्टडी लँप तयार करणारे विद्यार्थी.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित सौरदूत कार्यशाळेत तयार केलेल्या सौरदिव्यांसह सहभागी विद्यार्थी.

गांधी ग्लोबल सौर यात्रेअंतर्गत विद्यापीठात २५० सौरदूतांना प्रशिक्षण
कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबरस्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जेच्या संदर्भात स्वयंपूर्णता हा जगातील प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. त्यासाठी युवकांनी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून गांधी जयंतीच्या निमित्ताने पर्यावरणाप्रती अहिंसा व प्रेम प्रदर्शित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी काल येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्याने महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने गांधी ग्लोबल सौर यात्रा उपक्रमांतर्गत विद्यार्थी सौरदूत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यशाळेत २५० सौरदूतांना सोलर स्टडी लँप बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगसदृश हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाप्रती सजगता आणि स्वच्छ ऊर्जेचा पुरस्कार करण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी आयआयटी, मुंबईने गांधी जयंतीच्या निमित्ताने केवळ देशातच नव्हे, तर जगभरातील ८० देशांतील सुमारे चार हजार केंद्रांमध्ये ग्लोबल सौर यात्रेचे आयोजन केले. त्यामध्ये विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचा समावेश करण्यात आला, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सौर ऊर्जेचा वापर जनसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी कसा वापर करता येईल, या दृष्टीने या कार्यशाळेचा लाभ घ्यावा. तसेच, भावी जीवनातही अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात संशोधनासाठी सिद्ध व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी म्हणाले, गांधी ग्लोबल सौर यात्रेतून जगभरात सौरऊर्जेबाबत जागृती तसेच अपारंपरिक ऊर्जा वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. याद्वारे अत्यल्प खर्चात, विश्वासार्ह आणि टिकाऊ सौर उपकरणांची निर्मिती शक्य आहे. अशा उपक्रमांतून युवकांना रोजगार निर्मितीसाठी सक्षम बनविण्याबरोबरच स्थानिकांना या ऊर्जेचे लाभ देणेही शक्य होणार आहे.
या उद्घाटन समारंभाला प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे उपस्थित होते. तंत्रज्ञान अधिविभागातील प्रवीण प्रभू यांनी कार्यशाळेचे समन्वयक व मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.


२५० सौरदूतांनी बनविले सोलर स्टडी लँप
तंत्रज्ञान अधिविभागात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत बी.टेक.च्या सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना सोलर स्टडी लँप बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. टेक्विप उपक्रमांतर्गत त्यांना त्यासाठी आवश्यक साधनांची उपलब्धता करून देण्यात आली. सौरऊर्जेच्या प्रसारासाठी काम करण्याची आणि पर्यावरणाप्रती अहिंसाधर्म बाळगण्याची त्यांना यावेळी शपथ देण्यात आली.

No comments:

Post a Comment