महाराणी
ताराराणींच्या कार्याचा विद्यापीठात जागर
| शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी. |
कोल्हापूर, दि. १५ डिसेंबर: स्त्री-पुरूष
समानतेची सुरवात घरापासून झाली, तरच समाजात समानतेचे बीज रुजेल. त्या दृष्टीने
महाराणी ताराराणी यांचे जीवनचरित्र स्त्रियांच्या कर्तृत्वासाठी प्रेरणादायी आहे,
असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक के. मंजुलक्ष्मी
यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग
आणि बेटी बचाव अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात करवीर राज्य
संस्थापिका छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जयंती वर्षानिमित्त ‘महाराणी ताराराणी
यांच्या शिवशाहीचा तेजस्वी जागर’ या उपक्रमांतर्गत व्याख्यान, कर्तृत्ववान
महिलांचा सत्कार आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके अशा कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव उपस्थित होत्या.
मुलींनी मोठी स्वप्ने पाहणे आवश्यक असल्याचे
सांगताना श्रीमती मंजुलक्ष्मी म्हणाल्या, एकीकडे शिक्षणामध्ये मुलींचा टक्का खूप
मोठा आणि वाढता आहे. त्याच वेळी विविध खासगी, शासकीय आस्थापना आणि सेवांमध्ये
मात्र त्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी आहे. ही तफावत दूर करण्याची गरज आहे. कुटुंबातील
प्रत्येकाने घरामध्ये मुलगा- मुलगी असा भेद न करता दोघांचेही समान पद्धतीने संगोपन
करणे आवश्यक आहे. तरच त्यांच्या मनावर लहानपणापासून समानतेचे मूल्य रुजेल.
पेठवडगावच्या बी.एड. कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य
श्वेता चौगुले म्हणाल्या, ताराराणी या केवळ लढवय्या नव्हत्या, तर त्या एक आदर्श
सून, पत्नी आणि माताही होत्या. ही भूमिकाही त्यांनी समर्थपणे पार पाडली.
‘महिलेला घरचे पाठबळ
महत्त्वाचे’
गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक जयश्री
गायकवाड यांनी आपल्या आयुष्याच्या वाटचालीचा हृद्य आढावा घेतला. कष्टकरी घरात
जन्मलेल्या गायकवाड यांनी घरच्यांच्या पाठिंब्यावर शिक्षण घेतले आणि अवघ्या
एकोणीसाव्या वर्षी विवाहानंतर सासरच्यांच्या पाठिंब्यावर राज्यसेवा आणि केंद्रीय
सेवा परीक्षा पहिल्याच प्रयत्नांत उत्तीर्ण केल्या. इच्छाशक्ती, कष्ट करण्याची
तयारी आणि त्यामध्ये सातत्य यांच्या जोडीला कुटुंबियांचे पाठबळ ही बाब सुद्धा
महिलेच्या प्रगतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, महाराणी
ताराराणी यांचे कर्तृत्व केवळ करवीरपुरते मर्यादित नव्हते, तर त्या खऱ्या अर्थाने
स्वराज्य रक्षक होत्या. इथल्या प्रत्येक मुलीने त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न
करावा.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव
म्हणाल्या, लहानपणापासून महाराणी ताराराणी यांचा पुतळा माझे प्रेरणास्रोत राहिला
आहे. या पुतळ्यासमोर नतमस्तक होताना कृतज्ञतेमुळे डोळ्यांतून अश्रू ओघळल्याशिवाय
राहात नाहीत. त्या प्रजाहितदक्ष रणरागिणी होत्याच, त्याच बरोबरीने कुशल प्रशासक व
राजकारणी होत्या. त्यांचा पराक्रम आणि मुत्सद्देगिरी यामुळे मराठा सत्ता टिकून राहिली.
यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, पुराभिलेख
अधिकारी दिपाली पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व
प्रास्ताविक डॉ. प्रतिभा देसाई यांनी केले, तर डॉ. सुषमा पाटील यांनी आभार मानले.
यानंतर झालेल्या दुसऱ्या सत्रात व्यवस्थापन परिषद
सदस्य डॉ. वर्षा मैंदर्गी, डॉ. मंजिरी मोरे, अधिसभा सदस्य श्वेता परुळेकर, डॉ.
माधुरी वाळवेकर, डॉ. विनिता रानडे, अॅड. अनुष्का कदम, दुर्गाली गायकवाड
यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यानंतर राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात मर्दानी
खेळांच्या प्रत्यक्षिकांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:
Post a Comment