Tuesday, 16 December 2025

शब्दांच्या समृद्धीने माणूस अभिव्यक्तीसंपन्न: शिवाजी राऊत

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात बोलताना शिवाजी राऊत.

शिवाजी विद्यापीठात पी.एम. उषाअंतर्गत आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन करताना डॉ. आलोक जत्राटकर. सोबत ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत आणि डॉ. तृप्ती करेकट्टी. 




कोल्हापूर, दि. १६ डिसेंबर: शब्दांची समृद्धी माणसाला अभिव्यक्तीसंपन्न बनवते. शब्दांचा जितका काटेकोर वापर तितकी अभिव्यक्ती परिणामकारक होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी अधिविभागामार्फत आयोजित कंटेण्ट रायटिंग फॉर मीडिया या मूल्यवर्धित पाठ्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते काल (दि. १५) बोलत होते. आशयपूर्ण लेखन, भाषण शैली स्वरूप व महत्व याविषयी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधिविभाग प्रमुख डॉ. तृप्ती करेकट्टी उपस्थित होत्या.

श्री. राऊत यांनी माध्यमांसाठी आवश्यक आशय, शब्दांची निवड, वाक्यांची मांडणी, शैलीची स्पष्टता, मोजकेपणा आदींची माहिती दिली. ते म्हणाले, शब्द माणसाला माणूस बनवतात, ज्ञान देतात, सुसंस्कृत करतात. त्यामुळे त्यांचा वापर जपून आणि तोलामोलाने करणे गरजेचे आहे. शब्दांची समृद्धी अभिव्यक्तीसंपन्नता वाढविते. ही समृद्धी वाचनाने वाढते. लिहिण्याने तिचा पैस विस्तारतो. म्हणून आशयपूर्ण लेखनासाठी भाषा, शब्द, मेंदू यांची सांगड घातली पाहिजे. जितका शब्दांवर प्रभाव तितके सरस लेखन होते. शब्दातून बोध होतो. अनेक शब्दांमधून वाक्यबोध, वाक्यांतून तत्वबोध आणि तत्वबोधातून ज्ञानबोध होत असतो. वास्तवता, आवाज, चित्रमयता, व्यक्तीवाचकता, वस्तूवाचकता, वर्णनात्मकता या सर्व गोष्टी कंटेण्ट रायटिंगमध्ये आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माध्यमांच्या वर्तमानकालीन विस्ताराचा वेध त्यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात घेतला. माध्यमांनी, विशेषतः समाजमाध्यमांनी सर्वसामान्य माणसांच्या जगणे व्यापले असून त्यांचा वापर करताना सदैव आपला सद्सद्विवेक जागृत ठेवण्याची आवश्यकता आहे. समाजात पोषक वातावरण निर्मितीसाठी समाज माध्यमांचा तरुणांनी जबाबदार वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी जबाबदार नागरिक घडवण्यामध्ये माध्यमे मोलाची भूमिका बजावतात, असे सांगितले. डॉ. जयसिंग कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. गीता दोडमणी यांनी परिचय करून दिला, तर डॉ. प्रकाश निकम यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment