Tuesday, 6 January 2026

पत्रकारांकडून कृत्रिम बुद्धीमत्तेचा सजग वापर आवश्यक: डॉ. सदानंद मोरे

मराठी पत्रकार दिनानिमित्त राज्यातील दहा विद्यापीठांचे विशेष ऑनलाइन व्याख्यान

मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानामध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्यासह सहभागी झालेले डॉ. अंबादास भासके, डॉ. मीरा देसाई, प्रा. योगेश बोराटे, डॉ. विश्राम ढोले, डॉ. तेजस्विनी कांबळे आदी.


कोल्हापूर, दि.६ जानेवारी: मुद्रणकलेनंतर जर कोणती मोठी क्रांती झाली असेल, तर ती कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाची आहे. पत्रकारितेत अनेक नवे प्रयोग झाले असले, तरी मानवी मेंदूला टक्कर देण्याची क्षमता असलेली कृत्रिम बुद्धीमत्ता ही अत्यंत संवेदनशील बाब असून, याचा  वापर पत्रकारांनी अधिक सजगता आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागांतर्फे आज  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माध्यमे’ या विषयावर विशेष ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ऑनलाईन व्याख्यानाचे हे सहावे वर्ष आहे. या संयुक्त कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठासह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (नागपूर), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पुणे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर), पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (सोलापूर), मुंबई विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड), गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) आणि श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (मुंबई) सहभागी झाले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले आणि प्रा. डॉ. योगेश बोराटे यांनीही मार्गदर्शन केले.
डॉ. मोरे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेचा शोध अनेक वर्षांपूर्वी लागला असला, तरी सध्या तिचा वापर सर्वच क्षेत्रांत झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाला जसे सकारात्मक व नकारात्मक पैलू असतात, तसेच एआयचेही आहेत. त्यामुळे पत्रकारांनी एआय-साक्षर होत या तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ पत्रकार डॉ. धनंजय बिजले यांनी एआयमुळे बातम्यांमध्ये साचेबद्धता वाढण्याचा धोका असल्याचे नमूद केले. वृत्तपत्रांच्या मांडणीसाठी, मुद्रित शोधासाठी तसेच आकर्षक हेडींगसाठी एआयचा वापर होत असला, तरी चुकीची माहिती प्रसारित होण्याचा धोका वाढल्याने फॅक्ट-चेकिंगला अधिक महत्त्व देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. योगेश बोराटे यांनी माध्यमांमध्ये एआयचा उपयोग केवळ मजकूरनिर्मितीपुरता न ठेवता बहुआयामी पद्धतीने शोधपत्रकारितेसाठीही प्रभावीपणे करता येऊ शकतो, असे  नमूद केले.
ऑनलाइन व्याख्यानात, डॉ. निशा मुडे-पवार (विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर),  डॉ. राम भावसार (प्र-संचालक, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), . डॉ.संजय तांबट (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे),  डॉ. माधवी रेड्डी (विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे),  डॉ. दिनकर माने  (विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर),  डॉ. सुहास पाठक (संचालक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड),  डॉ. प्रभाकर कोळेकर (प्र-विभागप्रमुख, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर),  डॉ. प्रबास साहु (प्र-विभागप्रमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर),  डॉ. सुंदर राजदिप (विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ, मुंबई), . मीरा देसाई (विभागप्रमुख, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई) आणि प्रा. डॉ. सरफराज अन्सारी (विभागप्रमुख, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) यांनी मनोगत केले. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय तांबट यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले. डॉ. गोपी सोरडे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी डॉ. वृषाली बर्गे, डॉ. मनीषा मोहोड, रोहित देशमुख यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात राज्यातील विविध विद्यापीठांतील  विद्यार्थी, प्राध्यापक आणि पत्रकारांनी मोठ्या प्रमाणांत सहभाग  नोंदविला.

No comments:

Post a Comment