कोल्हापूर,
दि.21 जानेवारी - आपणांस
कोळसा
आणि तेल मोठयाप्रमाणात आयात करावे लागत आहे. यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी ग्रीन एेनर्जी तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणे आवश्यक आहे,
असे प्रतिपादन डी.वाय.पाटील विद्यापीठाचे संशोधन संचालक आणि शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांनी केले.
शिवाजी विद्यापीठात सुरू झालेल्या दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय शिक्षण-उद्योग-शासन परिषदेचा सांगता समारंभ विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.प्रमोद पाटील बोलत होते. मलेशिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ.मोहम्मद याहा,
डॉ.अहमद ईलियास यांची विशेष उपस्थिती होती.अध्यक्षस्थानी रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.संजय चव्हाण होते.
डॉ. प्रमोद पाटील पुढे म्हणाले,
अशा प्रकारच्या परिषदांच्या आयोजनामधून विविध आयडीयांची देवाण-घेवाण करून शैक्षणिक संस्था आणि उद्योगधंदे यांच्यामधील आंतर कमी करणे शक्य आहेे.आत्मनिर्भरता इंडेक्स वाढून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी सर्वांच्या विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.देशामध्ये उत्पादीत साहित्य निर्यात होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ करण्यासाठी प्रगत यंत्रसामग्री आणि उत्पादन क्षमता यांच्यामध्ये वाढ होणे गरजेचे आहे.भारत सरकार उत्पादन क्षेत्राला बळकट करण्यासाठी विविध माध्यमातून सातत्याने प्रयत्न करीत आहे.मर्यादीत स्वरूपात असलेली ऊर्जा मोठयाप्रमाणात उपलब्ध होण्यासाठी नवनवे संशोधन झाले पाहिजे.त्यासाठी ऊर्जेच्या पूर्नवापराचा अभ्यास होणे आवश्यक आहे. शाश्वत विकास हा एक पैलू आहे.औद्योगीक क्षेत्रास नेमके काय आवश्यक आहे हे पाहून ते पुरवठा करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत.विद्यार्थी आणि तरूणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम होणे आवश्यकच आहे.पुढच्या पिढींसाठी पृथ्वीवरील जैवविविधतेचे संवर्धन करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तरूणांनी योग्य माहितीच्या आधारे नवनिर्मिती करण्याचा ध्यास घेतला पाहिजे.भारत सरकार विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देत आहे.आपली योजना योग्य असेल तर देश-विदेशातूनही त्यास मागणी होवू शकते.शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना याबाबत मार्गदर्शन करावे. नवनिर्मितीच्या माध्यमातून समाजाभिमूख संशोधनाकरिता शिक्षकांनी विद्यार्थी आणि उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.
यावेळी मार्व्हल्स् इंजिनिअरिंगचे संग्राम पाटील मनोगतामध्ये म्हणाले, तरूण पिढींच्या आत्मनिर्भर भारत बनविण्याच्या संकल्पनेतून आपण जगावर राज्य करू शकतो.यासाठी उत्सफुर्तपणे केलेले प्रयत्न महत्वाचे ठरू शकतात.तरूणांनी वेगवेगळे विषय हाताळू नयेत.ज्या विषयामध्ये आपण पारंगत आहात त्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत.यश प्राप्त करण्याची जो पर्यंत मनामध्ये भूक निर्माण होत नाही तो पर्यंत तुम्हाला यश प्राप्त होणार नाही. भारत सरकारच्या सोईसुविधांचा लाभ घेता आला पाहिजे. नवीन विचार घेवून विकसित भारत करण्याचा सामुहीक प्रयत्न होणे आवश्यक आहे.
पुणे येथील एनसीएलचे संचालक डॉ. पी पी वडगांवकर मनोगतामध्ये म्हणाले, तरूणांनी प्रगतीच्या मार्गामध्ये येणाऱ्या आवाहनांना भिडण्याचे धाडस दाखविले पाहिजे. शिवाजी विद्यापीठामध्ये संशोधनासाठी आवश्यक असलेली इको सिस्टीम तयार झालेली आहे. समाज ज्या समस्यांना तोंड देत आहे ते सोडविण्यासाठी तरूण संशोधकांनी पुढाकार घेतला पाहिजे. उद्योजकतेमध्ये करिअर पर्यायाचा विचार करण्यासाठी योग्य हालचाली होणे आवश्यक आहे.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.एस.एस.चव्हाण म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आता ज्ञानाचे एक अग्रगण्य केंद्र म्हणून ओळखले जात आहे. यामुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर विद्यापीठाची विश्वासार्हता वाढेली आहे. संशोधन कार्याना नवीन दिशा दिली जात आहे. समाज आणि उद्योगासाठी फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टींवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. रोजगारक्षमतेमध्ये वृध्दी होण्यासाठी औद्योगिक कौशल्ये प्राप्त करून घेणे गरजेचे आहेे. विकसित भारत घडविण्यासाठी शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्रांनी मोलाचे योगदान देणे आवश्यक आहे.
दरम्यान, स्टार्टअप प्रदर्शन, इनोव्हेशन हॅकेथॉन, पोस्टर स्पर्धा यामध्ये विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. शार्कटैंक कम् हॅकॅथॉन गटामधील श्रेणीप्रमाणे निकाल असा, शाश्वतता आणि आरोग्यमध्ये दिपक सावंत (प्रथम), राजेश कांबळे (द्वितीय), अभियांत्रिकी आणि फॅबटेकमध्ये अमित चव्हाण (प्रथम), एैश्वर्या मुंगळे (द्वितीय), माहिती तंत्रज्ञान आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान यामध्ये अभेय वासंबेकर, ओम कोळेकर आणि निलेश पाटील (प्रथम), प्रणव यादव (द्वितीय), सामाजिक व्यवस्थापन आणि वित्तीय तंत्रज्ञान यामध्ये सोहम देशपांडे (प्रथम) यांना मिळाला.
तसेच, पोस्टर प्रझेन्टेशन स्पर्धेमध्ये शाश्वतता आणि आरोग्य यामध्ये महेश पोरे (प्रथम), साहील पाटील आणि वैष्णवी पाटील (द्वितीय), अभियांत्रिकी आणि फॅबटेकमध्ये मृगेंद्र गुरव (प्रथम), सागर पोर्लेकर (द्वितीय), माहिती तंत्रज्ञान आणि उद्योन्मुख तंत्रज्ञान यामध्ये प्रियदर्शनी पाटील (प्रथम), प्रसाद कोळी (द्वितीय), सामाजिक व्यवस्थापन आणि वित्तीय तंत्रज्ञान यामध्ये शंतनू पिसाळ (प्रथम), अश्विनी हवालदार (द्वितीय) यांना मिळाला.
कार्यक्रमास डॉ. कल्याणराव गरडकर, डॉ.गोविंद कोळेकर, डॉ.दिपा इंगवले, डॉ.हेमराज यादव, शिवानंद पाटणे, नितीन वाडकर, यांच्यासह इंडस्ट्रीचे पदाधिकारी, शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक समन्वयक डॉ.सागर डेळेकर यांनी केले. डॉ सुभाष माने यांनी आभार मानले तर राजनंदिनी पाटील आणि अंकिता दळवी यांनी सूत्रसंचालन केले
------


No comments:
Post a Comment