Showing posts with label Dr. R.K. Kamat. Show all posts
Showing posts with label Dr. R.K. Kamat. Show all posts

Monday, 11 July 2016

अभियांत्रिकीचा आंतरविद्याशाखीय अभ्यास गरजेचा: प्रा. मनुकीड



'ग्यान' उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलताना ए.आय.टी. (थायलंड)चे प्रा.मनुकीड. व्यासपीठावर (डावीकडून) समन्वयक उदय पाटील, ग्यान समन्वयक डॉ. आर.के. कामत,  तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. जे.एस. बागी, प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर.मोरे, श्री. एस.डी. प्रधान व कुमार रामचंद्रन.



शिवाजी विद्यापीठात मॅकेट्रॉनिक्ससंदर्भातील 'ग्यान' कार्यशाळेस प्रारंभ

कोल्हापूर, दि. ११ जुलै: अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आता स्पेशलायझेशनबरोबरच सर्वच अभियांत्रिकी शाखांचा सीमाविरहित आंतरविद्याशाखीय अभ्यास करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. मनुकीड पार्निच्कून यांनी आज येथे केले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे प्रायोजित 'ग्लोबल इनिशिएटीव्ह फॉर ॲकेडेमिक नेटवर्क्स' (ग्यान) या उपक्रमांतर्गत आजपासून शिवाजी विद्यापीठात 'मेकॅट्रॉनिक्स: सिनर्जिक इंटिग्रेशन ऑफ मॅकेनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी' या विषयावरील कार्यशाळेस प्रारंभ झाला. या उद्घाटन प्रसंगी कार्यशाळेचे प्रमुख तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. मनुकीड बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते.

टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी व इक्विनॉक्स कंपनीचे संस्थापक अध्यक्ष एस.डी. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. यावेळी टाटा टेक्नॉलॉजीज्‌चे माजी उपाध्यक्ष कुमार रामचंद्रन प्रमुख उपस्थित होते.

मॅकेट्रॉनिक्स व रोबोटिक्स विषयातील जागतिक दर्जाचे तज्ज्ञ असलेल्या प्रा. मनुकीड यांनी कार्यशाळेतील मार्गदर्शनाविषयी आपली भूमिका थोडक्यात विषद केली. ते म्हणाले, आज जगातील कोणत्याही अभियंत्याला अभियांत्रिकीच्या अन्य शाखांचे वावडे असता कामा नये. मॅकेनिकल अभियंत्याने त्याला आवश्यक असलेल्या हार्डवेअरसाठीचा प्रोग्राम स्वतःच तयार केला, तर त्याला हवा तो निकाल मिळू शकतो. यांसारख्या समस्यांवर मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या संगमातून निर्माण झालेल्या मॅकेट्रॉनिक्स या आंतरविद्याशाखेच्या माध्यमातून उपाय शोधता येणे शक्य झाले आहे.

थायलंडची ए.आय.टी. आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या दरम्यान या पूर्वीच झालेल्या सामंजस्य कराराला 'ग्यान' उपक्रमामुळे पुनरुज्जीवन लाभले असून या पुढील काळात दोन्ही शैक्षणिक संस्था व देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास प्रा. मनुकीड यांनी व्यक्त केला. थायलंडवर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव असून महाराष्ट्रात आणि कोल्हापुरात आपण प्रथमच आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बरीच माहिती ऐकण्यात आली. त्यामुळे आता येथून गेल्यानंतर शिवाजी महाराजांच्या इतिहासाचाही आपण अभ्यास करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

श्री. एस.डी. प्रधान यांनी आपल्या भाषणात 'बाऊंड्रीलेस इंजिनिअर' या संकल्पनेची जगाला विशेषतः भारताला मोठी गरज असल्याचे सांगितले.  ते म्हणाले, आतापर्यंत अभियांत्रिकीने वाफ, इलेक्ट्रीकल, इलेक्ट्रॉनिक्स व आयटी तसेच आता कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- ए.आय.), बायोटेक्नॉलॉजी असा व्यापक प्रवास केला आहे. ए.आय. संकल्पनेमुळे पूर्वीच्या अनेक मूलभूत संकल्पनांकडे नव्या दृष्टीने अभ्यासण्याची गरज निर्माण झाली आहे. तंत्रज्ञानातील सातत्यपूर्ण बदल, त्यांचा स्वीकार आणि उपयोजन हेच केवळ अभियांत्रिकीचे वास्तव आहे. ए.आय.मुळे निम्न व मध्यम दर्जाचे रोजगार संपुष्टात येणार आहे. यामुळे अभियांत्रिकीचे भवितव्यच बदलणार आहे. या बदलांच्या स्वीकारासाठी आपण तयार असले पाहिजे. त्यासाठी शिक्षण व उद्योग क्षेत्रांतील सुसंवाद वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कुमार रामचंद्रन यांनीही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बळावर गेल्या चारशे वर्षांत झाले नाहीत, इतके गतिमान बदल येत्या तीस ते चाळीस वर्षात होणे अपेक्षित असल्याचे सांगितले. त्यासाठी अभियांत्रिकी शाखांचा एकात्मिक दृष्टीकोनातून अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नजीकच्या काळात शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात टाटा टेक्नॉलॉजीज्‌च्या माध्यमातून विद्यार्थी, नव-अभियंत्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः अभियांत्रिकीच्या क्षेत्रात मानवी जीवनावर आणि जीवनशैलीवर दूरगामी परिणाम करणारे बदल कधी नव्हे इतक्या गतीने होत आहेत. या बदलांशी पूरक अशा पद्धतीने जुळवून घेण्यासाठी प्रत्येकालाच अनुषंगिक बदल करवून घ्यावे लागतील. याला कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. या गतिमान युगात आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर या बदलांशी जुळवून घ्यावे लागेल. त्या दृष्टीने उपयुक्त दृष्टीकोन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांत विकसित करण्यात ही कार्यशाळा निश्चित यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुरवातीला श्री. प्रधान यांच्या हस्ते कार्यशाळेचे डिजीटल उद्घाटन करण्यात आले. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जे.एस. बागी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. 'ग्यान' प्रकल्पाविषयी समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यशाळा समन्वयक उदय पाटील यांनी परिचय करून दिला. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. जी.एस. कुलकर्णी, डॉ. ए.एम. गुरव, विद्याधर कांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 6 June 2016

'ग्यान'च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ज्ञानाची देवाणघेवाण गतिमान: मंत्री चंद्रकांतदादा पाटील


शिवाजी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रमाचे डिजीटल उद्घाटन करताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. शेजारी (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, प्रभारीक लुसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर.मोरे, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठाचे डॉ. व्यंकटेश मेरवाडे आणि डॉ. आर.के. कामत.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील नूतन कार्यशाळेचे उद्घाटन करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील नूतन कार्यशाळेतील यंत्रांची पाहणी करताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. 


शिवाजी विद्यापीठात 'ग्यान' उपक्रम, तंत्रज्ञान अधिविभाग वर्कशॉपचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. ६ जून: शिवाजी विद्यापीठात आजपासून सुरू झालेल्या 'ग्यान' (ग्लोबल इनिशिएटीव्ह ऑफ ॲकेडेमिक नेटवर्क्स) उपक्रमाच्या माध्यमातून विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञानाच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया गतिमान होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज येथे केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे पुरस्कृत 'ग्यान' उपक्रमाचे तसेच तंत्रज्ञान अधिविभागाच्या नूतन वर्कशॉपचे आज मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, 'ग्यान' समन्वयक डॉ. आर.के. कामत, संयोजक डॉ. पी.डी. राऊत होते.
मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यापीठाने 'जीआयएस प्रणाली आणि जलस्रोतांचे व्यवस्थापन' हा 'ग्यान'च्या प्रथम सत्रासाठी निवडलेला विषयही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सध्या हा विषय महाराष्ट्र शासनाच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा बनला आहे. पर्जन्यमान कमी-अधिक असणे ही बाब आपल्या हातात नसली, तरी पाऊस जमिनीत जिरवणे हे निश्चितपणे आपण करू शकतो. या सात दिवसांच्या अभ्यासक्रमात या विषयावर अत्यंत उपयुक्त चर्चा होईल, अशी आशा आहेच. पण, विद्यापीठाने एवढ्यावरच न थांबता पाण्याचे नियोजन या विषयाचा सर्वंकष अभ्यास करणारा स्वतंत्र विभाग किंवा यंत्रणा उभी करावी आणि शासनाला त्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाने जलसंवर्धनाची मोहीम अत्यंत गांभीर्यपूर्वक हाती घेतली असून गेल्या वर्षभरात राज्यातल्या ६,५०० गावांत एक लाखांहून अधिक पाणी साठवण क्षेत्रे विकसित केली केली आहेत. अशा प्रकारे पाच वर्षांत सुमारे ३२,५०० गावांपर्यंत ही मोहीम शासन राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. मेरवाडे यांनी सांगितली जलस्रोत माहिती व्यवस्थापनाची चतुःसूत्री
या प्रसंगी अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांचे 'भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) व जलस्रोतांचे व्यवस्थापन' या विषयावर बीजभाषण झाले. पुढील आठवडाभर ते 'ग्यान' उपक्रमांतर्गत विद्यापीठात या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहे. ते म्हणाले, पाणी प्रश्नाविषयी चर्चा करीत असताना विविध स्रोतांच्या माध्यमातून आपल्याकडे नेमके किती पाणी उपलब्ध आहे, याची माहिती असणे अनिवार्य आहे. त्याखेरीज त्यांचे व्यवस्थापन अशक्य आहे. तालुक्यापासून ते देश आणि खंड अशी ही व्याप्ती वाढत जाईल, तितकी या माहितीची अनिवार्यता वाढत जाते. पर्यावरणीय बदल आणि जमिनीच्या वापरातील बदल या दोन बाबींमुळे जलस्रोतांचे व्यवस्थापन अधिक जिकीरीचे बनत आहे. कोणत्याही विभागातील जलप्रवाहांकडे पाहून त्या-त्या परिसरातील पाण्याच्या एकूण अवस्थेचा अंदाज येत असतो. याच आधारावर संबंधित प्रवाहांचे, स्रोतांचे संगणकीय सिम्युलेशन मॉडेल तयार करण्यात येते. आणि त्या आधारे त्यांच्या व्यवस्थापनाचे नियोजन करता येऊ शकते. मात्र त्यासाठी हार्ड इन्फ्रास्ट्रक्टर, सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक व अद्यावत डाटा सिम्युलेशन व नॉलेज शेअरिंग ही चतुःसूत्री अत्यंत कळीची भूमिका बजावते. जितका अद्यावत व गतिमान डाटा उपलब्ध होईल, तितकी त्यासंदर्भातील अनिश्चितता आपल्याला कमी करता येऊ शकते आणि जास्तीत जास्त अचूक, वस्तुनिष्ठ माहिती देता येऊ शकते.
पाण्याच्या संदर्भातील अनेक एजन्सी देशपातळीवर कार्यरत असतात. त्यांच्यामध्ये योग्य समन्वय राखण्याबरोबरच समाजमाध्यमांच्या सहाय्यानेही पाण्याच्या माहितीचे संकलन व आदान प्रदान आता 'हायड्रो-शेअर'सारखे प्लॅटफॉर्म उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी विद्यापीठाने राबविलेल्या विविध विद्यार्थीभिमुख योजना, उपक्रमांची तसेच राष्ट्रीय उपक्रमांत विद्यापीठाने दिलेल्या योगदानाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, केवळ विद्यापीठ स्तरावरच नव्हे, तर महाविद्यालयीन स्तरावरही संशोधनास चालना देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण योजना हाती घेतल्या आहेत. पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी 'रिसर्च सेन्सिटायझेशन ग्रँट' घोषित करणारे शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ आहे. त्याचप्रमाणे कोणतीही फेलोशीप नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'रिसर्च स्टुडंट फायनान्शियल असिस्टंन्स' योजना विद्यापीठाने घोषित केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर 'बेस्ट रिसर्चर' पुरस्कार देण्याचेही विद्यापीठाने ठरविले आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्रामध्ये इस्रोच्या 'INRSS' उपग्रह मालिकेतील संदेशग्रहण करणारा रिसिव्हर स्थापित करण्यात आला आहे. अशी सुविधा उपलब्ध असणारे आणि या उपक्रमात सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेले शिवाजी विद्यापीठ हे देशातील एकमेव अकृषी विद्यापीठ आहे.
शिवाजी विद्यापीठास सात दिवसाच्या विक्रमी वेळेमध्ये सात आंतरराष्ट्रीय ग्यान कोर्सेस मंजूर झाले असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, IIT, IIM, IISCR या नामांकित शैक्षणिक संस्थांच्या बरोबरीने शिवाजी विद्यापीठ हे प्रकल्प मिळविण्यात यशस्वी झाले आहे. चालू शैक्षणिक वर्षा जगाच्या कानाकोपऱ्यातून सात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक, शिक्षक शिवाजी विद्यापीठात येऊन येथील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. डॉ. व्यंकटेश मेरवाडे यांच्याबरोबरच  मेकॅट्रॉनिक्ससारख्या प्रगत विषयावर ए.आय.टी., थायलंड येथील डॉ.पर्चीकून, 'अठराव्या शतकातील दख्खन' या मराठा इतिहासासंबंधीच्या विषयावर मिशीगन येथील प्रा.गॉर्डन, हिंदी ही आपली राष्ट्रभाषा परदेशात कशी शिकवावी, यासंबंधी इटलीच्या डॉ.कॉन्सोलारो, पश्चिम घाटातील जैवविविधतेविषयी रशियामधील डॉ.सुकोलॉफ आणि पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्नावर दक्षिण कोरियामधील डॉ.ली हे सात दिवसांचे विशेष सत्र घेणार आहेत.
कार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. डॉ. आर.के. कामत यांनी परिचय करून दिला. सौ. नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा नियंत्रक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी.के. गायकवाड, क्राडी विभागप्रमुख पी.टी. गायकवाड, तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. जी.एस. कुलकर्णी, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 1 April 2016

शिवाजी विद्यापीठाचा 'सी-डॅक'शी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार



दोन्ही संस्थांच्या सहकार्यवृद्धीच्या दृष्टीने मोलाचा करार: प्रा. रजत मोना

कोल्हापूर, दि. १ एप्रिल: शिवाजी विद्यापीठ आणि प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक) या दोन महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये करण्यात आलेला सामंजस्य करार दोन्ही संस्थांच्या भावी शैक्षणिक व माहिती तंत्रज्ञानविषयक सहकार्य वृद्धीमध्ये मोलाची कामगिरी बजावेल, असा विश्वास सी-डॅकचे महासंचालक प्रा. रजत मोना यांनी आज येथे व्यक्त केला.
शिवाजी विद्यापीठाचा संगणकशास्त्र अधिविभाग आणि सी-डॅक यांच्यात आज प्रा. मोना व कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी तर सी-डॅकच्या वतीने सचिव कर्नल अनुपकुमार खरे यांनी स्वाक्षरी केल्या.
शिवाजी विद्यापीठात माहिती संवाद तंत्रज्ञानाच्या
(आयसीटी) अनुषंगाने सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून प्रा. मोना म्हणाले, आयसीटीचा वापर केवळ भौतिक संपन्नतेसाठी न करता समाजाच्या भल्यासाठी करण्याचे ब्रीद घेऊन 'सी-डॅक' गेली २८ वर्षे कार्यरत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा देश अशी भारताची जगभर ओळख प्रस्थापित करण्यात 'सी-डॅक'ने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शिवाजी विद्यापीठानेही मुडलसारख्या आधुनिक शिक्षण पद्धतीचा अंगिकार केला आहे. त्याबरोबरच केवळ विज्ञान विभागच नव्हे, तर हिंदीसारख्या भाषा अधिविभागातही आयसीटीविषयक अतिशय उत्तम काम सुरू आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठासोबत सहकार्य संबंध प्रस्थापित करत असल्याचा आनंद वेगळा आहे. हे सहकार्य अधिक वृद्धिंगत करीत राहण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. शिंदे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विद्यापीठ स्तरावरील कॉम्प्युटिंगला काही प्रमाणात मर्यादा येतात. त्यामुळे या क्षेत्रातील 'सी-डॅक' या दिग्गज कंपनीसोबत सामंजस्य करार करण्याची भूमिका विद्यापीठाने घेतली. दोन्ही संस्थांमध्ये ज्ञान व माहितीचे होणारे आदान-प्रदान विद्यार्थी, शिक्षक, संशोधक या सर्वांच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. त्याचप्रमाणे संगणक क्षेत्रातील संशोधन विकासालाही विद्यापीठात चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी 'सी-डॅक'चे सह-संचालक महेश कुलकर्णी यांनी 'सी-डॅक'च्या वाटचालीचा आढावा घेतला. शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने अनेकविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सुरवातीला संगणकशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून त्यांनी विभागाच्या वाटचालीचा आढावा घेतला. कुलगुरू डॉ. शिंदे व बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले. या प्रसंगी सी-डॅकचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत दरबारी, डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. पद्मा पाटील, डॉ. के.एस. ओझा, डॉ. यु.आर. पोळ, डॉ. व्ही.एस. कुंभार यांच्यासह संगणकशास्त्र अधिविभागातील शिक्षक, संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक तसेच कोल्हापूर आयटी असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सामंजस्य कराराची उपयुक्तता
 शिवाजी विद्यापीठ व सी-डॅक यांच्या दरम्यान आज करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे संगणकशास्त्राच्या विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञानाबरोबरच पूरक ज्ञान उपलब्ध होणार आहे. बीग डाटा ॲनालिसीस, फ्री ॲन्ड ओपन सोर्स डाटा यनिंग एम्बेडेड सिस्टीम, वायरलेस सेन्सर नेटवर्क, व्ही.एल.एस.आय. डिझाईन, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मल्टिलिंग्युअल टेक्नॉलॉजी यांसारख्या अत्यावश्यक संशोधन क्षेत्रांसंदर्भातील देवाण घेवाण होणार आहे.
औद्योगिक क्षेत्रास आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार होण्यास या सामंजस्य करारामुळे बळ मिळणार आहे. नवतंत्रज्ञान, संशोधन यांबाबतीत या दोन शिखर संस्थांमध्ये चर्चासत्रे, परिसंवाद, प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. याचा लाभ संशोधक, विद्यार्थी व शिक्षकांना अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी होईल. विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांतील बदल, संशोधनाच्या बाबतीत समन्वय व विचार विनिमय करता येणे शक्य होणार आहे. सी-डॅकमधील तज्ज्ञांची अभ्यागत व सहयोगी व्याख्याते म्हणून नियुक्त करता येऊ शकेल.
त्याचप्रमाणे संगणकशास्त्र अधिविभागातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शेवटच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान कंपनीत प्रकल्प करणे अनिवार्य असते. त्यांना पुणे येथे सी-डॅक प्रकल्प तयार करण्याचे प्रशिक्षण देणार आहे. तसेच, अन्य कौशल्येही शिकविणार आहे. त्याचा भविष्यात व्यवसाय- रोजगार संधी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.