Monday 30 August 2021

विद्यापीठास ‘सेक्शन-८’ कंपनी म्हणून मान्यता मिळणे अभिमानास्पद: पालकमंत्री सतेज पाटील यांचे गौरवोद्गार

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित बैठकीत बोलताना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील. शेजारी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

'शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशन'ला 'सेक्शन-८' कंपनी म्हणून मान्यता प्राप्त झाल्याचे पत्र कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना प्रदान करताना पालकमंत्री सतेज पाटील. सोबत (डावीकडून) अभिजीत रेडेकर, डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. संजय जाधव, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, व्ही.टी. पाटील, गजानन पळसे, डॉ. एस.एस. महाजन, डॉ. आर.के. कामत.


कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांना प्रदान केले मान्यतेचे पत्र

कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठातर्फे स्थापित शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशनला कंपनी कायद्यानुसार सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता मिळणे ही अतिशय अभिमानाची व आनंदाची बाब आहे. यामुळे विद्यापीठाला आता कौशल्य व स्टार्ट-अप कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक गतिमानतेने कार्य करता येऊ शकेल, असे मत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठ संशोधन व विकास फौंडेशनला सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता मिळाल्याचे पत्र केंद्रीय कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडून प्राप्त झाले. पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ते आज कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी स्वीकारले. या प्रसंगी मंत्री श्री. पाटील बोलत होते.

मंत्री सतेज पाटील म्हणाले, सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता मिळाल्याने विद्यापीठास आता विद्यार्थीहिताचे तसेच संशोधन व विकासाचेही अनेक नवनवीन उपक्रम हाती घेणे शक्य होणार आहे. महाराष्ट्र नवोन्मेष सोसायटीच्या अटीअंतर्गत ही प्रक्रिया विद्यापीठाने तातडीने पूर्ण केली, हे महत्त्वाचे आहे. भविष्यात याचे अनेक लाभ विद्यार्थी तसेच समाजालाही होतील.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक कार्याच्या पलिकडे जाऊन महापूर असो, अवर्षण असो की कोरोना, या सर्वच कालावधीत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून योगदान दिले आहे. येथील संशोधनकार्याचा दर्जा अत्युच्च आहे, यावर थेट नॅकच्या ++’ मानांकनाचे शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे आता अनेक मोठमोठ्या संधी आणि निधी विद्यापीठास उपलब्ध होणार आहे. त्याचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करावा. येत्या डिसेंबरपर्यंत कोल्हापूर विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार आहे. दोन महामार्गांनी हा भाग देशाच्या इतर भागांशी जोडलेला आहे. त्यामुळे आता जागतिक कनेक्टिव्हिटी वाढविण्याची संधी विद्यापीठासही आहे. त्याचा लाभ घेण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील भूस्खलन आणि हवामान बदल यांविषयी संशोधन व विश्लेषण करण्यासाठी विद्यापीठाने नोडल एजन्सी म्हणून पुढाकार घ्यावा. पूर व्यवस्थापनाच्या कार्यातही आपले संशोधकीय योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाच्या नवोपक्रमांमध्ये तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपले सदैव सहकार्य राहील, याची ग्वाहीही त्यांनी या प्रसंगी दिली.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी ग्रंथभेट देऊन मंत्री श्री. पाटील यांचे स्वागत केले आणि विद्यापीठाविषयी थोडक्यात सादरीकरणही केले. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. या वेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, डॉ. आर.के. कामत, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. ए.डी. जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संजय जाधव, सांख्यिकी अधिकारी अभिजीत रेडेकर आदी उपस्थित होते.

सेक्शन-८ कंपनीची उद्दिष्ट्ये-

शिवाजी विद्यापीठाच्या शिवाजी विद्यापीठ संशोधव व विकास फौंडेशनला कंपनी कायद्यानुसार ना-नफा तत्त्वावरील सेक्शन-८ कंपनी म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. या कंपनीची उद्दिष्ट्ये थोडक्यात पुढीलप्रमाणे असतील.

·         जलसंवर्धनाचे, पर्यावरणपूरक प्रकल्प प्रस्थापित करणे, त्यांना प्रोत्साहन देणे

·         शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये प्रशिक्षण व संशोधन केंद्रांना प्रोत्साहित करणे

·         शिक्षणाच्या सर्व शाखांमध्ये दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण, आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन यांसाठी शैक्षणिक संस्थांच्या स्थापनांसाठी आवश्यक ते सहकार्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन देणे

·         नैसर्गिक स्रोतांचे, साधनसंपत्तीचे संरक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या अनुषंगाने हरित व अपारंपरिक ऊर्जाविषयक संशोधन व उपक्रम राबविणे, हरित विकासाला प्राधान्य देणे

·         तदअनुषंगिक स्टार्ट-अप प्रकल्प, कौशल्य विकास यांना प्रोत्साहन देणे

·         त्यासाठी आवश्यक तो निधी उभा करणे, त्यासाठी विविध उपक्रम राबविणे, विविध चॅरिटी पोर्टल, वेबसाईट उभारणे, ई-कॉमर्स सेवा निर्माण करणे, निर्धारित लक्ष्य साध्यतेसाठी इंटरनेट आधारित सेवा उभारणे

·         विविध संशोधन संस्थांमध्ये भागीदारीसाठी मध्यस्थ म्हणून भूमिका बजावणे

·         शासकीय, अशासकीय संस्थांच्या माध्यमातून उद्दिष्टपूर्तीसाठी, प्रबोधनासाठी कार्यशाळा, चर्चासत्रे इत्यादी कार्यक्रम घेणे

No comments:

Post a Comment