Friday 3 December 2021

महामानवांना समजून घेणे ही माणूस बनण्याच्या प्रक्रियेची सुरवात: प्रा. शरद गायकवाड

 

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात बोलताना प्रा. शरद गायकवाड. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे. 

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, प्रा. शरद गायकवाड, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे. 

शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे आयोजित पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना पारितोषिके प्रदान करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. एस.एस. महाजन, प्रा. शरद गायकवाड, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.


 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्राच्या विविध स्पर्धांतील पारितोषिकांचे वितरण

 कोल्हापूर, दि. ३ डिसेंबर: महामानवांना समजून घेणे ही माणूस बनण्याच्या प्रक्रियेसाठीची महत्त्वाची सुरवात आहे, असे प्रतिपादन विचारवंत प्रा. शरद गायकवाड यांनी नुकतेच येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्राच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात बुधवारी (दि. १ डिसेंबर) झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

प्रा. गायकवाड म्हणाले, महामानवांच्या विचारांना व्यापक भूमिकेतून समजून घेण्याची आज नितांत गरज आहे. जात, धर्म, प्रांत आदी कोणत्याही भेदभावात अडकविता आपण फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांना समजून घेतले तर खऱ्या अर्थाने माणूस बनण्याच्या प्रक्रियेची ती सुरवात ठरते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला समावेशक लोकशाही विचार दिला आहे. जातीअंत वर्गअंत होऊन समाजवादी समाजरचना या देशात निर्माण झाली पाहिजे. बुद्धाची शांती भीमाची क्रांती या देशाला तार आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार सर्व समाजघटकांपर्यंत केला पाहिजे. बाबासाहेबांचा ग्रंथप्रेमाचा आदर्श युवकांनी अंगिकारणे आवश्यक आहे. बाबासाहेबांचे हे ग्रंथप्रेम अफाट वाचन यांचा वारसा आपण घेतला पाहिजे. तरच आपण स्वतःला परिपूर्ण माणूस म्हणून घडवू शकतो. वाचाल तर बोलू शकाल आणि त्यानंतर लिहू शकाल. अशी स्वतःला घडवण्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचन जीवनाच्या खऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी उपयुक्त ठरते.

डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या १३० व्या जयंतीच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्राच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांना कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यावेळी केंद्राचे संचालक डॉ. एस. एस. महाजन यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. तेजश्री सावंत-मोहरेकर यांनी केले तर प्रा. अविनाश भाले यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, प्रा. डॉ. प्रकाश कुंभार, प्रा. डॉ. गिरीश मोरे, डॉ. दीपा श्रावस्ती, प्रा. अमोल मिणचेकर, डॉ. व्ही. एस. खंडागळे, डॉ. मुरली भानारकर, आनंद खामकर, तेजपाल मोहरेकर, सुशांत पंडित, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते.

विविध स्पर्धांतील विजेते (अनुक्रमे) असे:-

वक्तृत्व स्पर्धा (पदव्युत्तर स्तर गट): मिथुन दत्तात्रय माने, प्रवीण तानाजी येवले (कोल्हापूर), ऋषिकेश प्रताप घुटुगडे (कोल्हापूर), उत्तेजनार्थ: प्रणय गौतम निमसरकार (इस्लामपूर), प्रसाद सुहास लोखंडे (कोल्हापूर), प्राजक्ता हरिश्चंद्र गायकवाड (सातारा)

वक्तृत्व स्पर्धा (पदवी स्तर गट): संभाजी बबन पाटील (कोल्हापूर), गुरुराज लक्ष्मण रसाळ (सातारा), मृणाल संजय कोठाली (सांगली), उत्तेजनार्थ: श्रद्धा पंडित चोपडे (पेठ वडगाव), श्रुती राजाराम कांबळे, मनाली कृष्णात शिरगावे (कोल्हापूर)

प्रश्नमंजुषा स्पर्धा: तनुजा पांडुरंग पाटील (कराड), प्रतिभा विश्वनाथ पाटील (तासगाव), स्वप्नाली श्रीकांत देसाई (कोल्हापूर), उत्तेजनार्थ: रोहन जगन्नाथ गुरव (कोडोली), शिवांजली संभाजी पाटील (कोल्हापूर), अश्विनी गुदमेवार (कोल्हापूर)

 

No comments:

Post a Comment