Saturday 31 August 2024

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातात खऱ्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास चिंताजनक: डॉ. शिरीष शेवडे

 विद्यापीठात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट केंद्राचे उद्घाटन


शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना बेंगलोरचे प्राध्यापक डॉ. शिरीष शेवडे. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. शशीभूषण महाडिक.


कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झंझावातामध्ये मानवाच्या खऱ्या बुद्धिमत्तेचा ऱ्हास होत जाणे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्राध्यापक डॉ. शिरीष शेवडे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागामध्ये नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या केंद्राचे उद्घाटन डॉ. शेवडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात ए.आय. ते जेन-ए.आय.: संधी आणि आव्हाने या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शेवडे म्हणाले, तंत्रज्ञानावर विसंबून राहण्याचे प्रमाण सार्वत्रिकरित्या वाढले आहे. हे खूप धोकादायक आहे. तंत्रज्ञान हे मानवी बुद्धीला सहाय्यभूत स्वरुपाचे आहे, त्याला तसेच राहू द्यावे. तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे योग्य नाही. चॅटजीपीटीसारखे जनरेटिव्ह ए.आय. अनेकदा आपल्याला चुकीची माहिती पुरविते आणि त्या माहितीचे समर्थनही करते. वापरकर्त्याला जर ही माहिती चुकीची असल्याचे ठाऊक नसेल, तर पुन्हा दिशाभूल होऊ शकते. त्यामुळे ही सर्व माध्यमे अत्यंत काळजीपूर्वक आणि जबाबदारपूर्वक वापरावीत. सृजनशीलता हा यामधील अत्यंत कळीचा मुद्दा आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध साधनांचे आपण केवळ वापरकर्ते बनून न राहता सर्जक निर्माते बनणे आवश्यक आहे. या सर्व बाबी इतक्या गतीने बदलत आहेत की विद्यार्थ्यांना, वापरकर्त्यांना त्या गतीनुसार अगदी दररोज बदलावे लागेल. त्यासाठी सातत्याने नवनवीन बाबी शिकत राहणे आणि विश्लेषणाची सवय लावून घेणे फार महत्त्वाचे आहे. समाजाला भेडसावणाऱ्या विविध प्रकारच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी या नवतंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सुकुमार राजगुरू यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. आर.एन. रट्टीहाळी, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. सरिता ठकार, इनोव्हेशन, इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. कविता ओझा, डॉ. सोमनाथ पवार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday 30 August 2024

नवनिर्मितीच्या शक्यता जिज्ञासेतूनच साकार: प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

सांगलीतील उद्योजकता विकास कार्यशाळेस उत्साही प्रतिसाद


सांगली येथे शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळेत बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील


सांगली/कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: उद्योग-व्यवसाय निर्मिती आणि विकासामध्ये जिज्ञासा महत्त्वाची भूमिका बजावते. जिज्ञासेतूनच नवनिर्मितीच्या शक्यता पुढे येतात, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांनी आज सांगली येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक वंचितता व सामवेशक धोरण अभ्यास केंद्र व यलो सिटी आंत्रप्रिन्युअरशिप फोरम, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास आणि युवकया कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. दीपस्तंभ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा केंद्र संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन प्रमुख उपस्थित होते. या कार्यशाळेला नवउद्योजक, व्यावसायिकांसह स्थानिक विद्यार्थी-विद्यार्थिनींचा उत्साही प्रतिसाद लाभला.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, युवकांना जो उद्योग अथवा व्यवसाय सुरु करावयाचा आहे, त्याचा परिपूर्ण अभ्यास करून ज्ञान मिळवावे. आपापल्या क्षेत्रातील नवीन कल्पना व संशोधनाद्वारे स्वतला अद्ययावत करीत राहावे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व युवकांच्या व्यावसायिक क्षमता वाढविण्यासाठी विद्यापीठ कटीबद्ध असून महिलांनीही उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या आसपासच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घ्या. त्यामुळे व्यवसाय व उद्योगाची वृद्धी होईल.

कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात युवा उद्योजकता विकास आणि पालकत्वया विषयावर डॉ. सुहास खामले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. जगन कराडे अध्यक्षस्थानी होते. दुसऱ्या सत्रात ऍड. पिराजी मिठारे यांनी बँकिंग संबंध व कागपत्रे आणि युवा उद्योजकया विषयावर मार्गदर्शन केले. कुंदन शिनगारे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. तिसऱ्या सत्रात अविनाश भाले यांनी उद्योजकता विकासातील परस्पर संबंध या अनुषंगाने सहभागी युवा उद्योजकांना मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या समारोपाला सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर डॉ. श्रीकृष्ण महाजन अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेस सांगली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध क्षेत्रांत काम करणारे युवा उद्योजक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday 29 August 2024

सामाजिक न्यायासक्त समाजनिर्मितीबाबत शाहू महाराज दृढनिश्चयी: डॉ. अरूण भोसले

 शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध ग्रंथाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात डॉ. अवनीश पाटील संपादित 'राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध' या ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. अशोक चौसाळकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अरूण भोसले व डॉ. अवनीश पाटील.


शिवाजी विद्यापीठात डॉ. अवनीश पाटील संपादित 'राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना डॉ. अरुण भोसले.

शिवाजी विद्यापीठात डॉ. अवनीश पाटील संपादित 'राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध' या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना डॉ. अशोक चौसाळकर. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. अरुण भोसले व डॉ. अवनीश पाटील.




कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: समताधिष्ठित आणि सामाजिक न्यायासक्त समाजनिर्मिती करण्याबाबत दृढनिश्चयी असणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वतंत्र प्रज्ञेचे राजपुरूष होते, असे गौरवोद्गार इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. अरूण भोसले यांनी आज येथे केले.

राजर्षी शाहू छत्रपती शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, समाज प्रबोधन पत्रिका आणि शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज डॉ. अवनीश पाटील संपादित राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. मानव्यशास्त्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर प्रमुख उपस्थित होते.

डॉ. भोसले म्हणाले, एतद्देशीय समाजातील पिढ्यानपिढ्यांची शोषण परंपरा नष्ट करून समताधारित समाज घडविण्याचा निर्धार राजर्षी शाहू महाराजांनी केलेला होता. बहुजनांच्या अगतिकतेवर शिक्षण हीच मात्रा आहे, या विषयी त्यांच्या मनात तीळमात्र शंका नव्हती. सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्याद्वारे त्यांना पुरोगामी सामाजिक बदल अपेक्षित होते. तथापि, शाहू महाराजांच्या विचारवारशाशी आपण नाते जपले आहे का, ते नाते विसरण्याचा द्रोह कोणी केला, या प्रश्नांची उत्तरे शोधून महाराजांच्या स्वप्नातील मराठी मुलूख अस्तित्वात आणण्याची जबाबदारी आजच्या समाजाने घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. अवनीश पाटील यांनी संपादित केलेला हा ग्रंथ अत्यंत मौलिक स्वरुपाचा असून अनेकार्य़ांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. राजर्षी शाहूंविषयी संशोधन करणाऱ्या संशोधकांच्या तीन पिढ्यांचे लेखन या ग्रंथात समाविष्ट आहे, ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, शाहू महाराजांना समर्पित समाज प्रबोधन पत्रिकेचा विशेषांक काढला होता. तथापि मासिकांचे आयुर्मान आणि वाचक मर्यादित असतात. त्यामुळे या विशेषांकाचे ग्रंथरुपांतरण करण्यात आले. पत्रिकेमध्ये आलेले लेखन चिरस्थायी करण्याच्या दृष्टीने हे ग्रंथरुप महत्त्वाचे आहे. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भातील पुनरुज्जीवन घडून आले, ही वस्तुस्थिती आहे. प्रथम कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार, डॉ. विलास संगवे यांनी त्यांच्याबाबत मूलभूत स्वरुपाचे संशोधनकार्य उभे केले. यापुढील काळातही महाराजांच्या विचारकार्याच्या विविध पैलूंच्या अनुषंगाने नवसंशोधन व्हावे. आपत्ती व्यवस्थापन, प्रशासकीय सुधारणा, ब्राह्मणेतर चळवळीचे पुनरुज्जीवन आदी विषयांच्या अनुषंगाने हे संशोधन व्हावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने जबाबदार भूमिका बजावावी, असेही त्यांनी सूचित केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सदर ग्रंथात ज्येष्ठ इतिहास संशोधकांबरोबर नवसंशोधकांच्या लेखनाचा समावेश होणे ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. शाहूकार्यामागील त्यांच्या विचारांचा वेध घेणारा महत्त्वाचा ग्रंथ त्यातून साकारला आहे. महाराजांच्या विचारकार्यामधील सर्जनशीलता, प्रयोगशीलता, अभिनव उपक्रमशीलता आणि गतिमानता या गुणविशेषांचा अभ्यास करून त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. शिक्षण, औद्योगिक व्यवस्थापन आदी अंगांनीही शाहूकार्याचा वेध घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती विचारवेध या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. इतिहास अधिविभागाचे प्रमुख तथा संपादक डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. दत्तात्रय मचाले यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. टी.एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. केशव हरेल, डॉ. ईस्माईल पठाण, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. शरद गायकवाड, डॉ. भारतभूषण माळी, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे आदी उपस्थित होते.

खाशाबा जाधव यांचा आदर्श घेऊन क्रीडापटूंनी वाटचाल करावी: रणजीत जाधव

 विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याला समर्पित दोनदिवसीय प्रदर्शनास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, रणजीत खाशाबा जाधव यांच्यासह मान्यवर.

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व रणजीत खाशाबा जाधव. सोबत (डावीकडून) डॉ. राजेंद्र रायकर, शरद बनसोडे, रामचंद्र पवार, डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. तानाजी चौगुले, दौलत इंगवले, डॉ. विलास शिंदे, डॉ. रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर व डॉ. प्रकाश गायकवाड.

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे.

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या दुर्मिळ वस्तू व दस्तावेज 

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शनामध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिकमध्ये परिधान केलेला पोषाख पाहताना मान्यवर. 

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शन पाहताना शालेय विद्यार्थी. 

शिवाजी विद्यापीठात खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधरित प्रदर्शन पाहताना महाविद्यालयीन विद्यार्थी.


कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: जाज्ज्वल्य देशप्रेम, उत्तुंग इच्छाशक्ती आणि उच्च नैतिक मूल्यांची जोपासना या त्रिसूत्रीची जोपासना करीत देशाचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी आयुष्य व्यतित केले. उदयोन्मुख क्रीडापटूंनी त्यांचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करावी, असे आवाहन त्यांचे सुपुत्र रणजीत जाधव यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्याला समर्पित दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. जाधव म्हणाले, आधुनिक ऑलिंपिक स्पर्धांच्या गेल्या १२८ वर्षांच्या इतिहासात चीनने ७००हून अधिक, अमेरिकेने १३०० हून अधिक तर युरोपियन व आफ्रिकन देशांनीही मोठ्या संख्येने ऑलिंपिक पदके मिळविली आहेत. जगातील २५ टक्के लोकसंख्या असणाऱ्या भारताने मात्र या काळात ४८ पदके मिळविली असून त्यातही वैयक्तिक पदके अवघी २३ आहेत. ही खूप मोठी पोकळी आहे. व्यवस्थाप्रणित काही त्रुटी असल्या तरी खेळाडूंनी पूर्ण ध्येयनिष्ठेने आणि नितिमानतेने आपल्या नैपुण्याचा कस लावून पदके मिळविण्यासाठी सज्ज व्हायला हवे.

विद्यापीठाच्या कुस्ती संकुलातील पहिला उपक्रम हा खाशाबा जाधव यांच्याशी निगडित असल्याचा मोठा अभिमान वाटत असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, खाशाबा जाधव यांच्या कुटुंबियांनी सदर प्रदर्शन भरविण्याच्या अनुषंगाने विद्यापीठावर विश्वास टाकला, ही मोठी बाब आहे. या दुर्मिळ दस्तावेजांचे डिजीटायझेशन वगैरे प्रकारे जतन व संवर्धन करण्याच्या कामी विद्यापीठ सहकार्यासाठी सदैव तत्पर राहील. विद्यापीठाने यापूर्वीच मिशन ऑलिंपिकची घोषणा करून क्रीडापटूंना पाठबळ दिले आहे. विद्यापीठाच्या प्रत्येक खेळाडूने आपापले लक्ष्य निर्धारित करून त्याचा हिरीरीने पाठपुरावा करावा. खेळण्याबरोबरच क्रीडाविषयक ज्ञान वाढविण्याकडेही लक्ष देणे अभिप्रेत आहे.

या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार यांच्यासह दौलत इंगवले, शामराव जाधव, प्रियांका जाधव, डॉ. राजेंद्र रायकर आदी उपस्थित होते. क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुचय खोपडे यांच्यासह क्रीडा अधिविभागाच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

यावेळी सुरवातीला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

खाशाबा जाधव यांच्या दुर्मिळ आठवणींचा संग्रह

या प्रसंगी कुलगुरू डॉ. शिर्के व श्री. जाधव यांच्या हस्ते खाशाबा जाधव यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात खाशाबा जाधव यांनी ऑलिंपिक व आशियाई स्पर्धांसह विविध स्पर्धांत जिंकलेली पदके, चषके, स्मृतिचिन्हे, ऑलिंपिक स्पर्धेमध्ये घातलेला ब्लेझर व पोषाख,  पोलीस सेवेतील कॅप्स, वेपन, हॉकी स्टीक, दुर्मिळ छायाचित्रे, हस्तलिखित पत्रे, त्यांच्याविषयी प्रसिद्ध झालेले लेख, बातम्या इत्यादी बाबी मांडण्यात आल्या आहेत. जाधव कुटुंबियांनी प्रथमच अशा प्रकारे खाशाबा जाधव यांच्याशी निगडित अमूल्य व दुर्मिळ वस्तूंचा संग्रह नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला आहे. प्रदर्शन पाहण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठी गर्दी केली.

Monday 26 August 2024

अमेरिकेतील उच्चशिक्षण संधींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा:

अमेरिकेचे कॉन्सुल जनरल माईक हँकी यांचे आवाहन

 

अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी शिवाजी विद्यापीठास दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी (डावीकडून) अमेरिकन कॉन्सुलेटचे रॅन मुलेन, डॉ. शिवाजी सादळे, डॉ. सागर डेळेकर, अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील व डॉ. तृप्ती करेकट्टी.


शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुंबईतील अमेरिकन कॉन्सुल जनरल माईक हँकी. मंचावर (डावीकडून) डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. महादेव देशमुख व डॉ. सरिता ठकार.


शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद सुमारे तासभर साधल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्यासमवेत छायाचित्र काढण्याचा मोह अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल माईक हँकी यांना आवरला नाही. त्यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह उपस्थित अधिकारी.



कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट: अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक उच्चशिक्षणाच्या मुबलक संधी उपलब्ध असून त्यांचा लाभ घेण्यासाठी कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन अमेरिकेचे मुंबईतील कॉन्सुल जनरल माईक हँकी यांनी आज येथे केले.

कोल्हापूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आलेल्या हँकी यांनी आज राजर्षी शाहू सभागृहात शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे उपस्थित होते.

कॉन्सुल जनरल माईक हँकी म्हणाले, अमेरिकी विद्यापीठे व शिक्षण संस्थांमध्ये अभियांत्रिकी आणि संगणकशास्त्र या शाखांपलिकडे मानव्यशास्त्रे, विज्ञान आणि व्यवस्थापन इत्यादी विद्याशाखांतीलही आधुनिक उच्चशिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. त्यांचा लाभ भारतीय विद्यार्थ्यांनी घ्यायला हवा. अमेरिकेचे भारताशी घट्ट राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बंध आहेत. अमेरिकेत उच्चशिक्षण घेण्यास पसंती दर्शविलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या चीनपाठोपाठ सर्वाधिक आहे. अमेरिकेकडे शैक्षणिक व्हिसा मागणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढती आहे. अमेरिकी विद्यापीठांसाठी भारतीय विद्यार्थी हे मोठी देणगीच आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा उभय देशांनाही भविष्यात मोठा लाभ झाल्याखेरीज राहात नाही. शिवाजी विद्यापीठासह कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेतील शिक्षण संधींचा लाभ घेण्याबाबत विचार करावा. त्यांना विद्यापीठ निवडीपासून ते प्रवेश प्रक्रिया, व्हिसा प्रक्रिया आदींसाठी कॉन्सुलेट सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

तत्पूर्वी, व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शाल, श्रीफळ व विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह देऊन कॉन्सुल जनरल हँकी यांचा सत्कार केला. प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी स्वागत केले, तर इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वाटचालीबद्दल अवगत केले. त्याबद्दल समाधान व्यक्त करून शिवाजी विद्यापीठासमवेत नजीकच्या काळात साहचर्यवृद्धीबद्दलही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कॉन्सुलेटचे राजकीय व आर्थिक अधिकारी रॅन मुलेन, विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, बौद्धिक संपदा हक्क कक्ष आणि आंतरराष्ट्रीय संबंध कक्ष यांचे समन्वयक डॉ. शिवाजी सादळे, इंग्रजी अधिविभागाच्या डॉ. तृप्ती करेकट्टी यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

--

US Consul General interacts with SUK students

Kolhapur: US is the most favorite educational destination of Indian students. US Universities have more potential to accommodate students who wish to seek higher education in faculties like humanities, science and management beyond engineering and computer science. The students from Shivaji University’s jurisdiction and Kolhapur region should come forward to take these opportunities to learn in US universities, appeals Mr. Mike Hankey, the US Consul General in Mumbai, while interacting with the students of Shivaji University today.

The Consul General, who is on two days visit of Kolhapur, visited Shivaji University today. Prof. D.T. Shirke, the Vice Chancellor, Prof. P.S. Patil, the Pro-Vice Chancellor along with the officers of University welcomed him at the University by presenting a memento of the University. Dr. Sagar Delekar, Director, Centre of Innovation, Incubation and Linkages gave him a brief presentation about the progress and achievements of Shivaji University. The Consul General was much impressed with it and expressed his wish for extending the bilateral ties with the University in near future.

Later on, Mr. Hankey interacted with the UG, PG and research students of the University. He said, US has political, socio-economic and socio-cultural ties with India since long. It is the most favorite educational destination of Indian students, making them the second largest group of foreign students in US after China. US student visa applications are always up across India. Indian students are a great asset to United States universities and colleges.  Both countries benefit greatly when our students study and learn together. He encouraged students to think of US for their further higher education and assured to extend his support through Consulate to ease their procedures like selection of academic institutes, admission process, scholarships and visa etc.

Dr. V.N. Shinde, the Registrar, Dr. Ajitsinh Jadhav, the Director, Board of Examinations and Evaluations, Dr. Suhasini Patil, the Finance and Accounts Officer, Dr. S.S. Mahajan, Dean, faculty of Commerce and Management, Dr. M.S. Deshmukh, Dean, faculty of Humanities, Dr. S.H. Thakar, Dean, Science and Technology, Dr. S.B. Sadale, Director, Intellectual Property Rights Cell and Coordinator, International Student Cell, Dr. Trupti Karekatti of Department of English were present at the program.


Monday 19 August 2024

कै.डॉ.ॲड. रूपाली पणदुरकर महिला अभ्यासिका विस्तारीकरण : दुसरा हप्ता रू.25 लाख देणगी

 पणदुरकर दाम्पत्याने शिवाजी विद्यापीठास दिले एकूण रू.60 लाख

कोल्हापूर, दि.19 ऑगस्ट - शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त भूगोल अधिविभागप्रमुख ज्येष्ठ कायदा अभ्यासक डॉ.ॲड.राम पणदुरकर पत्नी सौ. हेमकिरण यांनी त्यांची स्वर्गीय कन्या, एकमेव अपत्य, कै.डॉ.ॲड.रूपाली पणदुरकर यांच्या स्मरणार्थ कमवा शिका महिला वसतिगृहातील अभ्यासिकेसाठी रू.35 लाख देणगी गतवर्षी कन्येच्या पुण्यतिथी दिनी दिली होती.त्या देणगीमधून अभ्यासिकेचा तळ मजला पूर्ण झाला आहे.सदर धनादेश देताना सौ.पणदुरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांना आणखीही देणगी देण्याचे वचन दिले होते.आता, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने पहिला मजला विस्तारीकरण करण्याचे ठरविले असल्याने पणदुरकर पती-पत्नींनी त्यासाठी अधिक रू.25 लाखाचे धनादेश आज कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांचेकडे सुपूर्द केले.याप्रसंगी, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.विलास शिंदे, डॉ.संभाजी शिंदे उपस्थित होते.

           पणदुरकर दाम्पत्यांच्या अर्थसहाय्यामुळे अभ्यासिकेची संपूर्ण इमारत लवकर पूर्ण होईल. दिलेले वचन, मुलीच्या स्मृतीसाठी धडपड गरीब मुलींच्या शिक्षणातून त्या मुलींच्या डोळयात कै.रूपालीचे 'रूप' पाहाणे, या ध्येयाने प्रेरीत झालेल्या पणदुरकर दाम्पत्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.येत्या पुण्यतिथी पर्यंत सदर अभ्यासिकेचे उद्धाटन करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.'शिकणाऱ्या नातींसाठी' नारळी पोर्णिमा रक्षाबंधन या शुभदिनी आजी-आजोबांकडून अभ्यासिकेच्या स्वरूपात सप्रेम भेट देत असून मुलींनी या अभ्यासिकेत शिकून खूप मोठे व्हावे, विद्यापीठाचे नांव लौकीक करावे, अशी भावना या दांम्पत्यांने व्यक्त केली.

----------