शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय
चर्चासत्राला प्रारंभ
![]() |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय राज्यशास्त्र चर्चासत्रात बीजभाषण करताना डॉ. पी.डी. देवरे. |
कोल्हापूर, दि. १३ मार्च: राज्यशास्त्रातील सिद्धांत आणि
प्रत्यक्ष राजकीय व्यवहार यामध्ये वाढत चाललेली विसंगती समजून घेणे आणि त्यावर
नव्या पद्धतीने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विचारवंत
डॉ. पी. डी. देवरे यांनी आज येथे केले. ‘राज्यशास्त्रातील नवीन प्रवाहांचे
चर्चाविश्व’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये
बीजभाषक म्हणून बोलताना देवरे यांनी बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत
विचारप्रवाहांची नवी मांडणी करण्याची गरज अधोरेखित केली.
शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र अधिविभाग, नेहरू अभ्यास केंद्र आणि शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद यांच्या
संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र परिषदेचे ३१ वे अधिवेशन आणि दोन दिवसीय राष्ट्रीय
चर्चासत्राचे आज उद्घाटन झाले. मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव
देशमुख यांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन झाले. प्राचार्य व्ही.एम. पाटील
उद्घाटन समारंभाचे तर डॉ. भारती पाटील बीजभाषण सत्राच्या अध्यक्षस्थानी होत्या.
डॉ. देवरे म्हणाले, विद्यापीठांमध्ये राज्यशास्त्राचे
सिद्धांत, संकल्पना आणि विचारधारा शिकविल्या जातात; मात्र प्रत्यक्ष राजकारण आणि
समाजव्यवहार यामध्ये मोठी तफावत दिसून येते. ही तफावत समजून घेऊन विद्यार्थ्यांना
आणि समाजाला वास्तव परिस्थिती समजावून सांगणे ही राज्यशास्त्रज्ञ आणि
प्राध्यापकांची जबाबदारी आहे. विचारसरणींच्या इतिहासात कोणताही विचार कायमस्वरूपी
संपत नाही; उलट एका विचारातून दुसरा विचार जन्म घेतो. हेगेलने मांडलेली
‘थिसिस-अँटीथिसिस-सिंथेसिस’ ही प्रक्रिया समाजातील वैचारिक परिवर्तन सातत्याने
घडवत राहते, असे त्यांनी नमूद केले.
समाजातील बदल, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि
माहितीचा प्रस्फोट यामुळे नव्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगताना
डॉ. देवरे म्हणाले, मोबाईल, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या प्रभावामुळे माहिती सहज उपलब्ध
झाली असली तरी ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण झाला आहे का, हा प्रश्न आहे. सोशल मीडियाद्वारे कृत्रिम
आणि बनावट विचारनिर्मिती होण्याचा धोका वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
विकासाच्या प्रक्रियेतील विसंगतींकडे लक्ष वेधताना डॉ. देवरे
म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था वाढत असतानाही समाजातील मोठा वर्ग अद्याप मूलभूत
गरजांसाठी संघर्ष करत आहे. भौतिक विकास झाला असला तरी त्याची फळे
सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. कोणतीही विचारसरणी समाजाच्या वास्तव
परिस्थितीपासून वेगळी असू शकत नाही. मार्क्सवादाचा प्रभाव जगभर पडला असला तरी
प्रत्येक समाजाच्या परिस्थितीनुसार त्यात बदल झाले. भारताच्या संदर्भात शरद पाटील
यांनी मार्क्सवादी विचारांसोबत फुले-आंबेडकरांच्या विचारांचा समन्वय करण्याचा
प्रयत्न केला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
विद्यापीठे आणि महाविद्यालये ही संवादाची केंद्रे म्हणून अधिक
सक्रिय होण्याची गरज असल्याचे सांगताना डॉ. देवरे म्हणाले, व्यवस्था आणि विचार
यांच्यातील संघर्षातून निर्माण होणाऱ्या समस्यांवर नव्या पद्धतीने विचार करणे ही
आजच्या राज्यशास्त्रज्ञांची जबाबदारी असून लोकशाहीची वाटचाल समजून घेताना
तिच्यातील विसंगती आणि नव्याने उद्भवणारे प्रश्न यावर बौद्धिक नेतृत्वाने
मोकळेपणाने चर्चा करणे आवश्यक आहे. समाजातील वैचारिक वारसा जपून त्याला नव्या
संदर्भात पुढे नेण्यासाठी प्राध्यापक आणि विद्यार्थी यांनी सक्रिय भूमिका घ्यावी, अन्यथा लोकशाहीची वैचारिक पायाभरणी
कमकुवत होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
उद्घाटनपर मनोगतात बोलताना अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख
म्हणाले, विकसित भारताचे स्वप्न घेऊन वाटचाल करीत असताना त्या विकासाला मानवी
चेहरा देण्याची आपली जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या त्रिसूत्रीच्या
बळावरच हा विकास शक्य आहे. त्यासाठी राज्यशास्त्रीय आणि अर्थशास्त्रीय धोरणांचा
मिलाफ आवश्यक आहे.
डॉ. भारती पाटील म्हणाल्या, राजकारणाचा सार्वत्रिक आणि
सर्वस्तरीय ऱ्हास, नैतिक पतन या पार्श्वभूमीवर राज्यशास्त्रीय संकल्पना मुळातून
समजून घेणे आणि त्यांचे सातत्याने अधोरेखन करणे आवश्यक आहे. आदर्श
राज्यनिर्मितीसाठी अर्थकारण समजून घेतल्याखेरीज राजकारण समजून घेता येणार नाही.
त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे
शिक्षकांनी आता माहिती देणारे न होता विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक होऊन त्यांचे
ज्ञानवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. व्ही.एम पाटील म्हणाले,
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्रांतीचा राज्यशास्त्रीय विचारप्रणाली आणि प्रवाह
यांच्यावर मोठा प्रभाव पडला आहे. त्या प्रभावांचा आणि प्रवाहांचा वेध घेण्याच्या
दृष्टीने सदरचे चर्चासत्र उपयुक्त भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
यावेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण चव्हाण यांनीही आपले
मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात राज्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र भणगे
यांनी लिहीलेल्या ‘भूराजकारण, तंत्रज्ञान आणि भविष्यातील जागतिक व्यवस्था’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते
प्रकाशन करण्यात आले.
सुरवातीला डॉ. भणगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नेहा
वाडेकर यांनी परिचय करून दिला. डॉ. दत्ता सावंत यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. सुखदेव उंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवाजी
विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी.एम. पाटील, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.
श्रीराम पवार, डॉ. शिवाजी पाटील, डॉ. बाळासाहेब भोसले, डॉ. बी.बी. पाटील, सिकंदर
जमादार यांच्यासह परिषदेचे सदस्य, राज्यशास्त्राचे अध्यापक, संशोधक,
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आज दिवसभरात झालेल्या उर्वरित सत्रांपैकी एका सत्रात 'भारतीय राजकीय विचारांची सद्यकालीन
प्रस्तुतता' या विषयावर डॉ. अशोक चौसाळकर यांनी मार्गदर्शन केले. तर, पुढील
सत्रात डॉ. के. के. उर्फ काशिनाथ कावळेकर स्मृती व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. जयदेव
डोळे यांनी 'सामाजिक चळवळ आणि राजकारण' या विषयावर विचार प्रकट केले.



No comments:
Post a Comment