| शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना युजीसीचे सहसचिव डॉ. मनोज कुमार. |
| शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना युजीसीचे सहसचिव डॉ. मनोज कुमार. मंचावर डॉ. प्रतिभा देसाई, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव आदी. |
कोल्हापूर, दि. २३ मार्च: दिव्यांगांना निर्णयप्रक्रियेत आणि
राजकीय सहभागात पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे. अपंगत्वाच्या आधारावर
त्यांच्या बाबतीत भेदभाव केला जाऊ नये, असे प्रतिपादन
विद्यापीठ अनुदान आयोगाचे (युजीसी) सहसचिव डॉ.मनोज कुमार यांनी केले.
दिव्यांग
व्यक्तींसाठीची युजीसी- योजना आणि शिवाजी विद्यापीठाचे सर्वसमावेशी शिक्षण संशोधन
केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ''उच्च शिक्षणसंस्था आणि विद्यापीठासाठी सुलभता मार्गदर्शक तत्त्वे आणि
मानके'' या विषयावर राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित
एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रभारी
प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या. सेंटर फॉर डिसॅबिलिटीज् स्टडीज
अँड सोशल वर्क, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई येथील अध्यक्षा डॉ.संध्या लिमये यांची कार्यशाळेला विशेष उपस्थिती
होती.
डॉ. मनोज कुमार
म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना
समान संधी उपलब्ध होण्यासाठी सर्व तरतुदींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
अपंगत्वाबाबत कोरडी सहानुभूती न दाखविता त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यासाठी
समाजाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. दिव्यांगांना शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न
व्हावेत. मतदान कक्ष, वाहतूक आणि आरक्षणांमध्ये दिव्यांगांना
लाभ होण्यासाठी न्यायपालिकेने अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही केली आहे. मागील तीस
वर्षांमध्ये शासनाने विविध माध्यमातून अनेक योजना राबविलेल्या आहेत. आवाजहीन अशा
दिव्यांग बांधवांना समाजात ताठ मानेने जगण्यासाठी सहाय्य करावे. लोकसंख्येच्या सात
टक्के असलेल्या दिव्यांगांचा आवाज संसदेमध्ये आणि राजकीय परीघामध्ये पोहचू शकत
नाही. त्यांच्याकरिता स्वतंत्र आयोग असणे आवश्यक आहे. विकसित भारताकडे जात असताना
सात टक्के दिव्यांग समाजाने मागे राहणे संयुक्तिक नाही. दिव्यांगांना प्रवासासाठी
आवश्यक सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. दिव्यांग महिलांना दुहेरी त्रासाचा सामना
करावा लागतो. शाळा-महाविद्यालयांमध्ये रॅम्प, लिफ्ट, रेलिंग, दिव्यांगांसाठी सोयीस्कर शौचालय, ब्रेल लिपीतील फलक, अडथळामुक्त परिसराची पायाभूत
सुविधा दिव्यांगांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय
मनोगतात प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव म्हणाल्या, विद्यापीठामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अनेक
सोयी-सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
साधारणपणे ४६ दिव्यांग विद्यार्थी विद्यापीठातील विविध अधिविभागांत शिकत
आहेत. दोनशे दिव्यांग विद्यार्थी संलग्नित महाविद्यालयांत शिकत आहेत. सर्वसमावेशक
शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी वाहून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींसाठी यूजीसी योजनेच्या समन्वयक डॉ.प्रतिभा देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथील सहा.प्राध्यापक डॉ. मधुरा नागचौधरी यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिविभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक, विविध संस्थांचे दिव्यांग विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment