कोल्हापूर, दि. ३० मे : निसर्गाचे अस्तित्व मानवावर अवलंबून नाही; मात्र मानवाचे अस्तित्व निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल अबाधित राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजगतेने आणि जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे. जमीन, पाणी, हवा, ऊर्जा आणि वनसंपत्ती यांचे संवर्धन केल्याशिवाय जैवविविधतेचे रक्षण होऊ शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सुधीर कुंभार यांनी केले.
शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक पर्यावरण दिन – पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मिशन लाईफ (LiFE) अभियान’ अंतर्गत आयोजित ‘समाज आणि शाश्वत विकास’ या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर होते.
आपल्या व्याख्यानात ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ कुंभार यांनी पर्यावरण आणि जैवविविधतेविषयी समाजात रूढ झालेल्या अंधश्रद्धा व गैरसमजांवर भाष्य केले. पर्यावरण व निसर्गसंवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज निर्माण झालेली आहे. शुभ-अशुभाच्या कल्पनांमुळे अनेक पशू-पक्ष्यांबाबत चुकीच्या समजुती निर्माण झाल्या असून त्यातून साप, वटवाघूळ, मोर, अस्वल, साळिंदर, घोरपड, टिटवी यांसारख्या महत्त्वाच्या वन्यजीवांची हत्या केली जाते. अशा घटना पर्यावरणीय साखळी खंडित करून जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण करतात, असे त्यांनी स्पष्ट केले. वन्यजीवांचे संरक्षण हे जंगलांच्या संवर्धनाशी थेट जोडलेले असल्याचे सांगताना त्यांनी वाघांच्या अधिवासाचे महत्त्व अधोरेखित केले. जंगलात वाघांचे अस्तित्व असल्यामुळे मानवी हस्तक्षेपावर काही प्रमाणात नियंत्रण राहते आणि त्यामुळे वनपरिसंस्थेचे नैसर्गिक संतुलन टिकून राहण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करताना त्यांनी फळे, कंदमुळे आणि फुलांपासून नैसर्गिक रंगनिर्मितीची शक्यता अधोरेखित केली. यामुळे रासायनिक पदार्थांच्या वापरातून निर्माण होणारे पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक धोके टाळता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. यासोबतच प्लास्टिकच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणणे आणि जैवकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. मुरलीधर भानारकर यांनी पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी आता केवळ चर्चा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता असल्याचे सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने वाढणाऱ्या वापरामुळे निर्माण होणारा ई-कचरा ही भविष्यातील गंभीर पर्यावरणीय समस्या बनत असल्याचे त्यांनी नमूद केले. या समस्येकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यालाही गंभीर धोके निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. एस. ए.
शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. अविनाश भाले यांनी केले, तर डॉ. किशोर
खिलारे यांनी आभार मानले. या ऑनलाइन व्याख्यानास मिलिंद चिटणीस, भिमराव
खाडे, दिनेश उथळे, डॉ. प्रदीप नंदावर, प्रियांका
स्वामी, पलक भानारकर, गौतमी भाले, नरेंद्र देशमुख,
शरद
पाटील, चारू भानारकर, डॉ. विलास सोयम, राजेश मेश्राम,
अंजली
नामे, विश्वजित गुरव यांच्यासह विविध अधिविभागांतील प्राध्यापक, संशोधक,
विद्यार्थी,
कर्मचारी,
पर्यावरणतज्ज्ञ
आणि पर्यावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
--------
No comments:
Post a Comment