Monday, 25 May 2026

शाश्वत विकासात ई-कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

शिवाजी विद्यापीठात 'मिशन लाईफ कॅम्पेन'अंतर्गत ई-कचरा संकलनाला प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. कविता वड्राळे, डॉ. कबीर खराडे, डॉ. मुरली भानारकर, डॉ. पवन गायकवाड, आनंद खामकर, अविनाश भाले आदी.


शिवाजी विद्यापीठात 'मिशन लाईफ कॅम्पेन'अंतर्गत ई-कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. राजनीश कामत. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे व अन्य अधिकारी, शिक्षक व कर्मचारी.



शिवाजी विद्यापीठात 'मिशन लाईफ कॅम्पेन'अंतर्गत ई-कचरा व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या विषयावरील पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. विलास शिंदे,  डॉ. मुरली भानारकर, डॉ. पवन गायकवाड, आनंद खामकर, अविनाश भाले आदी.

(मिशन लाईफ कॅम्पेन उद्घाटनाचा व्हिडिओ)


शिवाजी विद्यापीठात मिशन लाईफ कॅम्पेनला प्रारंभ

कोल्हापूर, दि. २५ मे: जागतिक शाश्वत विकासाच्या प्रक्रियेमध्ये सुसंगत ई-कचरा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मिशन लाईफ कॅम्पेनच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल आदी वाढत्या सुखसोयीच्या साधनांमुळे ई-कचऱ्याचे प्रमाणही जागतिक स्तरावर वाढत आहे. या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आपल्यासमोर उभे आहे. त्यासाठी योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने जनमानसात ई-कचरा व्यवस्थापनविषयक प्रचार व प्रसार व्हावा, त्याचे महत्त्व समजावे, यासाठी शिवाजी विद्यापीठाने हे अभियान हाती घेतले आहे. यामध्ये ई-कचऱ्याच्या संकलनासह त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचा समावेश आहे. लोकांनीही आवश्यकता असल्याविना इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल आदी वस्तूंची खरेदी करणे टाळावे, त्याचप्रमाणे नादुरुस्त किंवा खराब झालेल्या वस्तूंची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, ई-कचऱ्याचे वाढते प्रमाण मानवासह पर्यावरणासाठीही घातक आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये अनेक दुर्मिळ मूलद्रव्ये वापरली जातात. त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यास ही मूलद्रव्ये अस्तंगत होतील. त्यामुळे ई-कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून या मूलद्रव्यांचा पुनर्वापर कसा होईल, या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

यावेळी कुलगुरू डॉ. कामत आणि कुलसचिव डॉ. शिंदे यांच्या हस्ते ई-कचऱ्याचे संकलन टाकीमध्ये संकलित करण्यात आला. तसेच, या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण संवर्धन आणि ई-कचरा या विषयावरील ऑनलाईन पोस्टर प्रदर्शनाचेही कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी स्वागत केले. अविनाश भाले यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. पवन गायकवाड, आनंद खामकर, आशिष घाटे,  दिनेश उथळे, शरद पाटील, डॉ. कविता वड्राळे, डॉ. किशोर खिलारे, शरद पाटील, उदय पोवार, माऊली पांढरे, संतोष वंगार, विनोद लोखंडे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment