Showing posts with label Uttam Kamble. Show all posts
Showing posts with label Uttam Kamble. Show all posts

Friday, 10 November 2017

डॉ. आंबेडकर अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थीच: उत्तम कांबळे


ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे

कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहिले. ज्ञानकण संचयाचे काम त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत उत्तम कांबळे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या सेवा-पूर्व मार्गदर्शन केंद्रात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शैक्षणिक परिवर्तन या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते.
श्री. कांबळे म्हणाले, बाबासाहेबांना शिक्षणाचे महत्त्व आणि प्रयोजन खूप लवकर लक्षात आले कारण या देशातील सामाजिक परिस्थिती आणि व्यवस्थेविषयी ते दररोज एका नित्यनव्या प्रश्नाला सामोरे जात होते. त्यातून त्यांना आपल्याला माणूस म्हणून समान वागणूक का दिली जात नाही, हा प्रश्न छळू लागला. त्यातून वडिलांसोबत कबीराचे दोहे गाताना किंवा केळुस्कर गुरूजींनी भेट दिलेले बुद्धचरित्राची पारायणे करताना त्यांना त्यांच्या शिक्षणाचे प्रयोजन सापडले, ते म्हणजे मला समाज बदलायचा आहे, हे होय. मी माणूस आहे आणि मला माझी सच्ची ओळख निर्माण करायची आहे, मिळवायची आहे, हा बाबासाहेबांच्या अथक संघर्षाचा महत्त्वाचा मुद्दा राहिला. त्यातूनच त्यांनी शिक्षणाचा असा काही ध्यास घेतला की, अल्पावधीत या देशातील ते सर्वाधिक उच्चशिक्षित व्यक्ती बनले. परदेशातील खडतर परिस्थितीत एकवेळ उपाशी राहून त्यांनी जी ज्ञानोपासना केली, त्याला इतिहासात तोड नाही. जो विषय अभ्यासायला घेतला तो ते संपूर्णतया आत्मसात करीत असत. त्या विषयाशी पूर्णतः तादात्म्य पावत असत. त्यामुळे बाबासाहेबांच्या शिक्षणाचा या देशातील अडाणी, निरक्षरदलित समाजमनावर अत्यंत दूरगामी परिणाम झाले. शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबले. बाबासाहेबांनी केलेले हे महत्त्वाचे शैक्षणिक परिवर्तन कार्य होते.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असताना जिंकण्याची सकारात्मक ऊर्मी असणे हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे सांगून श्री. कांबळे म्हणाले, स्पर्धा परीक्षा किंवा कोणताही अभ्यास करीत असताना आपले पर्यावरण समजून घेणे ही अत्यंत महत्त्वाची पूर्वअट आहे. आपण आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, जातीय, धार्मिक, आर्थिक आदी प्रकारच्या पर्यावरणाला गृहित धरतो किंवा त्याच्याशी संबंध नाकारतो, तिथेच मोठी चूक करतो. या पर्यावरणाचे भान आणि जाण आपल्यात विकसित झाली पाहिजे. त्यातून प्रश्न विचारण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. प्रश्न विचारणे हे व्यक्तीगत ज्ञानपिपासू वृत्तीचे आणि जागृतीचे महत्त्वाचे लक्षण आहे. गटचर्चा म्हणजे सुद्धा कोणाला संवादात हरवणे नव्हे, तर एकमेकांना समजून घेऊन एखाद्या सर्वसमावेशक निष्कर्षाप्रत येणे होय. आपल्या जगण्याला जसे प्रयोजन आवश्यक तसेच शिक्षणालाही आवश्यकच आहे. कोणत्याही अभ्यासातून अंतिमतः चौफेर व्यक्तीमत्त्व विकास होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी जिंकण्याच्या ऊर्मीनेच अभ्यास करायला हवा, असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर सचिन कदम यांनी आभार मानले.

मरेस्तोवर मारा, खरं याच्यातला बाबासाहेब जागा करा!’
आपल्या भाषणात श्री. कांबळे यांनी बाबासाहेबांच्या शैक्षणिक साधनेचा परिणाम दर्शविणारी अनेक उदाहरणे सांगितली. त्यामध्ये त्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण सांगताना ते म्हणाले, मी शाळेत जायला तयार नव्हतो. पण, माझी आजी मला बदडतच शाळेत घेऊन गेली. तिथं मास्तरांसमोर मला उभा करून म्हणाली, मास्तर, याला मरेस्तोवर मारा; खरं याच्यातला बाबासाहेब जागा करा!’ ही बाबासाहेबांच्या शैक्षणिक परिवर्तनाची किमया होती. शिक्षणापासून वंचित म्हातारीमध्येही आपल्या नातवामध्ये दडलेल्या बाबासाहेबाला जागृत करण्याची तीव्र इच्छा प्रदीप्त झाली होती, हे बाबासाहेबांचे यश होते. या महामानवाच्या शाळा प्रवेशाचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा होण्याला म्हणूनच आगळे महत्त्व आहे.

Saturday, 1 October 2016

अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे गरजेचे: उत्तम कांबळे





कोल्हापूर, दि. १ ऑक्टोबर: समाजशास्त्र हे अद्यापही स्थिर जातींभोवती फिरते आहे. आता अस्थिर जातींच्या अभ्यासाकडे समाजशास्त्रज्ञांनी वळणे नितांत गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातर्फे फिरस्ती: एक समाजशास्त्र या विषयावर श्री. कांबळे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
श्री. कांबळे म्हणाले, दहा वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या फिरस्तीच्या माध्यमातून शोषित व वंचित घटकांना मराठी साहित्यामध्ये स्थान देता आले. या घटकांना कोणत्याही क्रमिक पुस्तकात कधीही स्थान मिळालेले नव्हते. त्यांच्या अस्तित्वाची दखल अथवा जाणीवही कोणाला नव्हती. हाकेच्या अंतरावर सुरू असलेल्या प्रगती नामक बाबींपासून तो कोसो दूर होता. समाजामध्ये स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या जाती आहेत. अस्थिर जाती भटक्या असतात. त्यांना ना घर, ना शेती, ना ठिकाणा अशी परिस्थिती आहे. त्यांचे नाव ना सातबाऱ्यावर आहे, ना रेशन कार्डावर, ना मतदार यादीमध्ये. तथापि, आपले समाजशास्त्र मात्र अद्यापही स्थिर जातींभोवतीच केंद्रित झाले आहे. या समाजशास्त्राच्या परीघात अस्थिर जातींचा समावेश होणे गरजेचे आहे. फिरस्तीदरम्यान सापडलेल्या या अस्थिर जाती-जमातींनी मला इतके हरविले आहे की विजयाची शक्यता दूरवर दिसत नाही. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपल्या व्यवस्थेकडे नाहीत. जाती कशा टिकवायच्या, यापेक्षा त्या मोडायला शिकविणाऱ्या पुस्तकांची आजच्या समाजाला मोठी गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
श्री. कांबळे म्हणाले, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये उदयास आलेल्या अर्थव्यवस्थेने गुलामांची नवी व्यवस्था निर्माण केली आहे. पूर्वीच्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव तरी होती; मात्र या नवीन गुलामांना गुलामीची जाणीवच होऊ न देण्याची दक्षता व्यवस्थेने घेतली आहे. त्यामुळे माणसाचे रुपांतर यंत्रात आणि यंत्रमानवामध्ये होते आहे. या सायबरयुगात आपल्यातला माणूस जिवंत ठेवणे हेच आपल्यासमोरचे खरे मोठे आव्हान आहे. जागतिकीकरणामुळेच ग्राहक आणि अ-ग्राहक अशी फळी आणि त्यांच्यातील संघर्ष उद्भवला आहे. भौतिक आणि शारीर गोष्टींचे भांडवल करून त्या प्रत्येक अवयवाचं मार्केटिंग हा या नव्या ग्राहक युगाचा फंडा आहे. याला अगदी गर्भाशय सुद्धा अपवाद राहिलेले नाही. अशा परिस्थितीत नवा समाज, नव्या संस्कृती आणि त्या संस्कृतींमधील संघर्ष आकाराला येतो आहे. संस्कृतीकरणाचे हे नवे प्रवाह जर आपण वेळीच ओळखू आणि रोखू शकलो नाही, तर मानवी मूल्यांच्या ऱ्हासाला आपण कारणीभूत ठरू, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले, जेव्हा समाजात निर्मितीची, उत्पादनाची साधने बदलतात, तेव्हा नवनिर्मितीची शक्यता निर्माण होते. सध्याही आपण एका अशाच टप्प्यावर उभे आहोत. शेषनागाच्या फण्यावरुन श्रमिकांच्या तळहातावर सरकलेल्या दुनियेचं नवं शिफ्टिंग आता संगणकाच्या पडद्यावर, मोबाईलच्या स्क्रीनपर्यंत झालेलं आहे. यामुळं ग्लोबलायझेशन ऑफ लिंग्विस्टीक्सही बदलून गेलं. भाषा बदलली, भाषेची प्रतीके, चिन्हे बदलली. भाषेतून आणि भाषेपलिकडेही जीवन बदलत गेले. भाषेची उपयुक्तता जोपर्यंत असते, तोपर्यंतच ती टिकते. कोणाच्याही भाषणावर नव्हे, तर उपयुक्ततेवर भाषेचे जीवन-मरण अवलंबून असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, उत्तम कांबळे यांनी फिरस्तीमधून समाजातील शोषित, वंचितांचे जगणे मांडले, त्यातील भीषणता मांडली. या सदराच्या माध्यमातून अखंडित समाजसेवेचेव्रतच त्यांनी सांभाळले. समाजाच्या भावनांना हात घालून जनमानसामध्ये दातृत्वाची भावना जागृत करण्याचे काम त्यांनी केले. त्यातून अनेक वंचितांना मदतीचा हात तर मिळवून दिलाच, त्याचबरोबरच समाजाची संवेदनशीलता जागृत असल्याचा प्रत्ययही दिला. ही फिरस्ती अशीच अखंडित सुरू राहो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. जगन कराडे यांनी ग्रंथ व स्मृतिचिन्ह देऊन श्री. कांबळे यांचे स्वागत केले. डॉ. प्रल्हाद माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रतिमा पवार यांनी परिचय करून दिला. डॉ. श्रीमती पी.बी. देसाई यांनी आभार मानले. यावेळी प्रा. विजय मारुलकर, प्रा. आर.बी. पाटील, डॉ. शशिकांत चौधरी, डॉ. एस.एस. महाजन यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 29 August 2016

शिक्षणाद्वारे समाज बदलवून टाकण्याचे बाबासाहेबांचे उद्दिष्ट: उत्तम कांबळे





कोल्हापूर, दि. २९ ऑगस्ट: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचे प्रयोजन हे केवळ पदवी किंवा नोकरी मिळविण्यापुरते मर्यादित नव्हते; तर, समाज बदलवून टाकण्याचे उद्दिष्ट त्यांनी शिक्षण घेताना बाळगले होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत उत्तम कांबळे यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्रातर्फे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण' या विषयावर आयोजित व्याख्यान देताना ते बोलत होते. वि.स. खांडेकर भाषा भवनाच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.
शिक्षणाच्या प्रयोजनाविषयीच आजच्या व्यवस्थेमध्येच संभ्रम असल्याचे आढळून येते, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, आयुष्य घडविणे आणि आयुष्य बदलून टाकणे हा कोणत्याही शिक्षणाचा प्रधान हेतू असतो, असला पाहिजे. अशा शिक्षणातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व घडत असते. क्रमिक अभ्यासक्रमापलिकडे जाऊन संबंधित विषयांचे ज्ञान मिळविण्याची जिज्ञासा व प्रज्ञा बाबासाहेबांनी स्वतःमध्ये विकसित केली. या वाचनातून त्यांना प्रश्न पडत. त्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी ते आणखी वाचत. या प्रक्रियेमधून आपल्याला निरतिशय आनंद व समाधान मिळते, असे बाबासाहेब म्हणत असत. खूप प्रश्न पडणे हे चांगल्या शिक्षणाचे लक्षण आहे. अशा प्रकारे पुस्तकांशी त्यांनी लहानपणापासून जिव्हाळा निर्माण केला, तो अखेरच्या क्षणापर्यंत जपला.
बाबासाहेब जेव्हा विलायतेहून शिक्षण घेऊन परतले, तेव्हा ते या देशातले सर्वाधिक उच्चशिक्षित व्यक्ती होते, असे सांगून श्री. कांबळे म्हणाले, बाबासाहेबांच्या या शिक्षण प्रक्रियेचा मुळापासून अभ्यास केल्यास त्यामध्ये त्यांनी मानलेले तीन महागुरू बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांच्यासह त्यांच्या शिक्षणाला दिशा देणाऱ्या त्यांच्या विलायतेतील शिक्षकांचा आणि समकालीन विचारवंतांचाही मोलाचा वाटा राहिला. बाबासाहेबांना कबीराची परंपरा जन्मजात लाभली. विषमतेवर प्रहार करणारा पहिला संत म्हणून हा प्रभाव महत्त्वाचा राहिला. बुद्ध हा असा महान शिक्षक होता, ज्याने आपल्या शिष्यांची कधीही पिळवणूक अथवा शोषण केले नाही. महात्मा फुले यांनी बाबासाहेबांच्या जन्माअगोदरच दलित व महिलांना शिक्षण मिळावे, यासाठी इंग्रज सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून जणू बाबासाहेबांच्या शिक्षणाची पृष्ठभूमी तयार करून दिली. या त्रिगुरूंखेरीज इतिहासतज्ज्ञ जेम्स हार्वे रॉबिन्सन, तत्त्वचिंतक व शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युई, जेम्स शॉटवेल, प्रोफेसर सेलिग्मन, प्रोफेसर सिडनेवेब या त्यांच्या विलायतेतील गुरूंच्या विचारांचा मोठा प्रभाव बाबासाहेबांवर पडला. या विचारांची कास त्यांनी सदोदित सोबत बाळगली. त्यांच्या पुढील आयुष्यभरातील कार्यामध्ये त्यांच्या या सर्व गुरूंच्या विचारांची व कार्याची परंपरा प्रतिबिंबित होताना दिसते. या सर्व विद्वानांच्या खांद्यावर बाबासाहेब उभे राहिल्याने साहजिकच त्यांच्या विद्वत्तेची व द्रष्टेपणाची उंची वाढली. या विद्वत्तेच्या जोरावरच भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य बाबासाहेबांनी केले. स्वातंत्र्य व शहाणपणा यांच्यातील परस्परसंबंध अधोरेखित करण्याचे कार्य त्यांच्याइतके कोणीही केले नाही, म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये त्यांचे योगदान सर्वार्थाने महत्त्वाचे राहिले. भारतीय समाजाची कोणतीही बाब साक्षरतेविना स्वीकारण्याच्या मानसिकतेवर नेमके बोट ठेवण्याचे कार्यही बाबासाहेबांना शक्य झाले, ते केवळ त्यांनी मिळविलेल्या ज्ञानामुळेच, असेही त्यांनी सांगितले. बाबासाहेब आणि त्यांचे गुरू यांच्यामधील संबंधांचे तपशीलवार स्पष्टीकरण श्री. कांबळे यांनी या वेळी केले. बाबासाहेबांच्या अनेकविध पैलूंचा विविधांगांनी अभ्यास होण्याची गरजही त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, शरीराला जसा सकस आहार आवश्यक असतो, त्याचप्रमाणे शिक्षण हा मन, मेंदू बळकट करणारा सकस आहार आहे. शोषणाची जाणीव करून देऊन त्याविरुद्ध संघर्षाला प्रेरित करते, ते खरे शिक्षण. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांकडून अशा शिक्षणाची प्राप्ती अपेक्षित केली होती. आयुष्यभर बाबासाहेबांनी शिक्षण व चिंतनाची जी परंपरा, पद्धती विकसित केली, त्यातून त्यांचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन प्रतीत होतो, असे ते म्हणाले.
यावेळी केंद्राचे संचालक डॉ. भगवान माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले; तर विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांनी आभार मानले.