Tuesday 18 October 2016

कॉ. दत्ता देशमुख अत्यंत तेजस्वी, लढाऊ नेते: डॉ. एन.डी. पाटील






कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर: कॉ. दत्ता देशमुख हे एक अत्यंत तेजस्वी, लढाऊ आणि हिम्मतबाज नेतृत्व होते. या अलौकिक व्यक्तित्वाच्या विविध पैलूंची नव्या पिढीला ओळख करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील प्रस्तावित कॉ. दत्ता देशमुख अध्यासनासाठी एस.एम.ई. वर्कर्स फेडरेशन आणि स्वाभिमानी वीज कामगार या मुखपत्राकडून दहा लाख रुपयांचा निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम गणितशास्त्र अधिविभागात झाला. त्यावेळी ते बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कॉ. दत्ता देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. पाटील म्हणाले, कॉ. देशमुख यांची काम करण्याची पद्धत अत्यंत झंझावाती होती. एक लढवय्या कामगार नेते असण्याबरोबरच अत्यंत अभ्यासू वृत्ती त्यांच्यात होती. त्या बळावरच त्यांनी कृषी आणि सिंचनाच्या संदर्भातही महाराष्ट्राला मोलाचे योगदान दिले. संयुक्त महाराष्ट्र लढा असो, दुष्काळ निर्मूलन समितीवरील कामकाज असो, साऱ्याच बाबतीत त्यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा राहिला. तत्कालीन परिस्थितीत त्यांनी उभारलेला उसाच्या किंमतीसाठीचा संघर्ष आणि आजच्या परिस्थितीतील त्याच प्रकारचे लढे यांच्यात अत्यंत गुणात्मक फरक असल्याचे दिसून येते. निवडणुकीच्या मर्यादांतून बाहेर पडून पूर्णतः कामगार व सामाजिक चळवळीला त्यांनी वाहून घेतले.
यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर आणि गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी दत्ता देशमुख यांना प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कायद्याखाली केलेली स्थानबद्धता आणि त्यानंतर घडलेल्या विविध राजकीय घडामोडींची अत्यंत रंजक माहितीही डॉ. पाटील यांनी या वेळी दिली.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांना लहानपणापासूनच त्यांच्या आईकडून दातृत्वाचे संस्कार लाभले. स्वतःची परिस्थिती अत्यंत खडतर असतानाही इतरांना मदत करण्याचा गुण त्यांनी आपल्या आईकडून घेतला. हे दातृत्व त्यांनी आयुष्यभर जोपासले. प्रत्यक्ष शिक्षक नसले तरी त्यांनी शिक्षकाचा पिंड सदोदित जोपासला. जनसामान्यांचा कळवळा असणारा एक द्रष्टा पुढारी, कृतीशील शेतकरी, अभ्यासू समाजचिंतक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तीमत्त्वात दडलेले होते. प्रस्तावित अध्यासनाच्या माध्यमातून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, विविध समाजघटकांशी संवाद प्रस्थापित करणे आणि त्यांच्या हिताचे कार्यक्रम राबविणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असते. त्याची पूर्तता करणारे कॉ. दत्ता देशमुख अध्यासन आहे. त्यांच्यामुळेच आज विद्यापीठात इतक्या मोठ्या संख्येने वीज कर्मचारी प्रथमच आले, ही मोठी उपलब्धी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा म्हणाले, कॉ. दत्ता देशमुख यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अध्यासनाचा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांनी केलेल्या त्याग व त्यामागील भावना ही आजच्या पिढीसमोर मांडण्याची नितातं गरज निर्माण झाली आहे. सुजाण समाजाची जडणघडण होण्याच्या दृष्टीने प्रस्तावित अध्यासन उपयुक्त ठरेल. नागपूर विद्यापीठातही कॉ. ए.बी. वर्धन यांच्या नावे अध्यासन सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी डॉ. एन.डी. पाटील यांच्या हस्ते प्रस्तावित अध्यासनासाठी दहा लाख रुपयांचा धनादेश आणि कॉ. दत्ता देशमुख यांची प्रतिमा कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. स्वाभिमानी वीज कामगारचे संपादक सुरेश परचुरे यांनी प्रास्ताविक केले, तर वीज कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विनय कोटी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment