Friday 18 December 2020

शिवाजी विद्यापीठाचा ‘वाम्निकॉम’समवेत

सहकारविषयक संशोधनाबाबत सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ आणि 'वाम्निकॉम' यांच्या दरम्यान झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि डॉ. के.के. त्रिपाठी. सोबत (डावीकडून) डॉ. एम.एस. देशमुख, डॉ. प्रकाश पवार, डॉ. संतोष सुतार, डॉ. वैशाली भोसले, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर, डॉ. यशवंत पाटील, डॉ. नामदेव पाटील.

शिवाजी विद्यापीठात झालेल्या सामंजस्य करार कार्यक्रमाचा शॉर्ट व्हिडिओ 


कोल्हापूर, दि. १८ डिसेंबर: सहकारविषयक संशोधनात राष्ट्रीय स्तरावर अग्रगण्य असलेल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेसमवेत (VAMNICOM) सामंजस्य करारामुळे शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील सहकारी चळवळीच्या अनुषंगाने संशोधन कार्याला मोठे पाठबळ लाभणार आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठात आज सायंकाळी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेसमवेत विद्यापीठाचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वाम्निकॉमचे संचालक डॉ. के.के. त्रिपाठी, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, आयक्यूएसी समन्वयक डॉ.एम. एस. देशमुख, वाम्निकॉमच्या सेंटर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे डॉ. यशवंत पाटील उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, वाम्निकॉमसमवेत झालेल्या या सामंजस्य कराराचा विद्यापीठ परिक्षेत्रातील सहकारी चळवळीचा विविधांगी संशोधनात्मक वेध घेणे शक्य होणार आहे. शिक्षक-विद्यार्थी एक्स्चेंजसारख्या बाबी या करारात समाविष्ट आहेतच, पण त्यापुढे जाऊन प्रशिक्षण कार्यक्रम, संयुक्त संशोधन प्रकल्पांची निर्मिती, समाजकेंद्री संशोधन प्रकल्प तसेच सहकारविषयक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम हाती घेणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही संस्थांच्या सहकार्यातून सहकारविषयक एखादे संयुक्त अध्यासन स्थापित करता आले, तर त्याचे दूरगामी लाभ या विभागाला होत राहतील.

यावेळी डॉ. त्रिपाठी म्हणाले, वाम्निकॉमचे संशोधन कार्यक्षेत्र हे सहकार, ग्रामीण विकास आणि कृषी असे मर्यादित आहे. मात्र, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात नेमक्या या बाबींची समृद्धी उत्तम आहे. या विभागातील सहकार तर केवळ भारतातच नव्हे, तर आशियातील सर्वाधिक यशस्वी मॉडेल आहे. सध्या बरेच ठिकाणी सहकार आणि कॉर्पोरेट या दोन क्षेत्रांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. या परिस्थितीत आता आपण या संदर्भातील संशोधनाच्या क्षेत्रांची नव्याने निश्चिती करणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय कार्यक्रम निर्धारित करायला हवेत. प्रायोजित संयुक्त प्रकल्पही हाती घ्यायला हवेत. त्या दृष्टीने हा सामंजस्य करार दोन्ही संस्थांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

यावेळी सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी, तर वाम्निकॉमच्या वतीने डॉ. त्रिपाठी यांनी स्वाक्षरी केल्या. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. वैशाली भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. कविता वड्राळे, डॉ. संतोष सुतार, गजानन साळुंखे, चेतन गळगे, सुधीर देसाई, उमेश गडेकर, डॉ. विशाल ओव्हाळ, डॉ. नीलम जाधव, परशुराम वडार, डॉ. सागर वाळवेकर, मृणालिनी जगताप, गणेश भड, ऊर्मिला दशवंत आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment