Thursday 18 November 2021

शिवाजी विद्यापीठाचा ५९ वा वर्धापनदिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठाने अल्पावधीत साधलेली प्रगती नेत्रदीपक

- ‘सोलापूर’च्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचे प्रतिपादन

 

(शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या वर्धापन दिन समारंभाचे विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' या  युट्यूब वाहिनीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याची लिंक) 


शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या वर्धापन दिनाच्या प्रमुख पाहुण्या व सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करताना. शेजारी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ ध्वजास वंदन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत विद्यापीठाचे अन्य अधिकारी.

शिशिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना प्रमुख पाहुण्या व सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस. व्यासपीठावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.


अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागांमधील सर्वोत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. (श्रीमती) व्ही.एस. राठोड आणि शिक्षक.

अन्य अधिविभागांमधील सर्वोत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार स्वीकारताना अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले व शिक्षक.


सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार स्वीकारताना प्रा. डॉ. एस.एस. महाजन. व्यासपीठावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे.


विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना स्वाती खराडे.

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना फिरोज नायकवडी

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना अजय उर्फ आप्पासाहेब आयरेकर

विद्यापीठ गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना बबन चौगले

महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य डॉ. मोहन राजमाने

महाविद्यालयीन गुणवंत प्राचार्य पुरस्कार स्वीकारताना प्राचार्य डॉ. रमेश कुंभार

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना जयंतराव कदम

महाविद्यालयीन गुणवंत सेवक पुरस्कार स्वीकारताना विजयकुमार लाड

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारताना डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे.


कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार स्वीकारताना डॉ. तेजस्विनी पाटील-डांगे



कोल्हापूर, दि. १८ नोव्हेंबर: शंभर वर्षांहून अधिक काळाचा वारसा असलेल्या विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठाने अवघ्या ५९ वर्षांत साधलेली प्रगती नेत्रदीपक आहे, असे गौरवोद्गार सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या ५९ व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात विद्यापीठातील गुणवंत शिक्षकाचा पुरस्कार वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. एस.एस. महाजन यांना देण्यात आला. बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे यांना, तर कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका पुरस्कार कासेगाव (जि. सांगली) येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या डॉ. तेजस्विनी दीपक पाटील-डांगे यांना प्रदान करण्यात आला.

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस
यावेळी कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, शिवाजी विद्यापीठाने नॅकच्या  ++’ मानांकनासह देशविदेशांतील शैक्षणिक व संशोधकीय स्वरुपाचे अनेक टप्पे आणि शिखरे सर केली आहेत. अवघ्या साठ वर्षांच्या वाटचालीत विद्यापीठाची ही कामगिरी गौरवास्पद आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सामाजिक दायित्वाच्या भावनेतून राबविलेले उपक्रम सुद्धा अनुकरणीय स्वरुपाचे आहेत. अशा कामगिरीमुळे विद्यापीठाशी निगडित सर्वच घटकांमध्ये उत्तम काम करण्याची प्रेरणा निर्माण झालेली असल्याचे दिसते.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने उच्चशिक्षण क्षेत्रात कार्यरत धुरिणांची जबाबदारी अधोरेखित करताना कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, उच्चशिक्षण क्षेत्रात कार्यरत लोकांनी, विशेषतः शिक्षकांनी उच्चशैक्षणिक वारसा वृद्धिंगत करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी. विद्यार्थ्यांचा कल, आवड समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात पालकांसह शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. कोविड कालखंडाने आता आपल्याला विद्यार्थ्यांमधील बुद्ध्यांक (IQ), भावनांक (EQ) या बरोबरच आध्यात्मांक (SQ) विकसनाकडेही लक्ष द्यायला हवे. उत्तम शैक्षणिक प्रगतीसाठी मनःशांतीही तितकीच महत्त्वाची असल्याचे या कालखंडाने आपल्याला दाखवून दिले आहे, असे त्या म्हणाल्या.

कुलगुरू डॉ. फडणवीस पुढे म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक स्तरावर शाश्वत विकास साध्य करण्यासाठी १७ मानके निश्चित केली आहेत. त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षण या मुद्द्यांना अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. आरोग्याच्या संदर्भात केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक सुदृढतेलाही बरोबरीचे स्थान दिले आहे. तसेच शिक्षणाच्या संदर्भात दर्जावृद्धी महत्त्वाची मानली गेली आहे. आणि ही दर्जावृद्धी शालेय स्तरापासूनच अभिप्रेत आहे. या बाबींचा दिशानिर्देश करण्याची जबाबदारी शिक्षकांवरच आहे. निसर्ग व पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही शिक्षण क्षेत्राने घ्यायला हवी.

कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, ज्ञानाचे प्रसरण व संवर्धन ही भारताची मूळ परंपरा आहे. नालंदा तक्षशीला, विक्रमशीला आदी प्राचीन विद्यापीठांचा वारसा आपल्याला लाभला आहे. या वारशाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना वैचारिक व्यासपीठे उपलब्ध करून देण्याची जबाबदारीही शिक्षण क्षेत्रावरच आहे. या प्रक्रियेत पडलेला खंड दूर करण्यासाठी चिंतन करावे लागणार आहेच; शिवाय, संवाद (Communication), सृजनशीलता (Creativity) आणि सहकार्य (Collaboration) या त्रिसूत्रीचा अवलंब करून शिक्षण क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्त मर्यादांवर मात करण्याच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. एकमेकांसमवेत सहकार्य व साहचर्याची भूमिका घेऊन देशाच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये वाटा उचलण्यासाठी विद्यापीठांनी तत्पर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

इंडस्ट्री-४.०साठी सुसज्ज व्हावे : कुलगुरू डॉ. शिर्के

यावेळी अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, सध्या माहिती तंत्रज्ञान व तत्संबंधी संशोधन विकासाच्या बळावर इंडस्ट्री-४.० खूप वेगाने विस्तार पावत आहे. या इंडस्ट्रीमध्ये काम करावयाचे आणि टिकून राहावयाचे असल्यास त्याला माहिती संवाद तंत्रज्ञानाच्या अंगिकाराखेरीज पर्याय नाही. कोविड कालखंडाने आपल्याला त्यासाठी तयार केले आहेच. मात्र, आता शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्या दिशेने सुसज्ज करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांत कार्यरत कर्मचाऱ्यांनीही या नवतंत्रज्ञानाचा अवलंब तातडीने करणे गरजेचे आहे. त्यातूनच रोजगारास पूरक मनुष्यबळ निर्माण होईल आणि घटत्या मनुष्यबळावर उपाययोजना म्हणूनही हे प्रशिक्षित मनुष्यबळ कामी येईल. त्या दृष्टीने शिवाज विद्यापीठात विविध सेवांचे ऑटोमेशन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. काही सेवा कार्यान्वितही झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी कुलगुरूंनी शिवाजी विद्यापीठाच्या गेल्या वर्षभरातील वाटचालीचा वेधही आपल्या भाषणात घेतला.

या वेळी विद्यापीठातील, महाविद्यालयांतील गुणवंत शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांची गुणवंत पाल्ये यांचा विद्यापीठ प्रशासकीय तसेच कल्याण निधी पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. तसेच, प्रशासकीय गुणवत्ता अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त प्रशासकीय विभाग व अधिविभाग यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्याचबरोबर 'नॅक'चे '' मानांकन मिळविणाऱ्या दि न्यू कॉलेज, कोल्हापूर आणि भोगावती महाविद्यालय, कुरुकली या संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा सत्कार करण्यात आला.

उत्कृष्ट अधिविभागासाठीचा पुरस्कार वनस्पतीशास्त्र व अर्थशास्त्र अधिविभागांना!

शिवाजी विद्यापीठाने सन २०१९पासून उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार देण्यास सुरवात केली. विज्ञान व तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे असे दोन गट करून अधिविभागांचे सर्वंकष काटेकोर मूल्यमापन करण्यात येऊन हा पुरस्कार देण्यात येतो. संबंधित विभागाला पारितोषिकापोटी दहा लाख रुपये, प्रमाणपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा प्रदान करण्यात येतो. गत वर्षी कोविडमुळे वर्धापन दिन समारंभ न होऊ शकल्याने पुरस्कार देण्यात आला नव्हता. यंदा उत्कृष्ट अधिविभागासाठीचा हा पुरस्कार विज्ञान व तंत्रज्ञान गटात वनस्पतीशास्त्र अधिविभागाला; तर, अन्य अधिविभागांतून अर्थशास्त्र अधिविभागाला देण्यात आला. कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.

वर्धापन दिन समारंभात प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे:

विद्यापीठातील गुणवंत शिक्षक: प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण शंकर महाजन,  वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग

विद्यापीठातील गुणवंत सेवक:

१. स्वाती संजय खराडे, सिनिअर सिस्टीम अॅनालिस्ट

२. फिरोज हमीद नायकवडी, सहाय्यक अधीक्षक

३. अजय उर्फ आप्पासाहेब बाबुराव आयरेकर, कनिष्ठ सहाय्यक

४. बबन शिवाजी चौगले, प्रयोगशाळा परिचर

संलग्न महाविद्यालयांतील गुणवंत प्राचार्य:

१. डॉ. मोहन मार्तंड राजमाने, एस.जी.एम. कॉलेज, कराड

२. डॉ. रमेश राजाराम कुंभार, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर

महाविद्यालयीन गुणवंत सेवक:

१. जयंतराव जयसिंगराव कदम, कनिष्ठ लेखनिक, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पलूस, जि. सांगली

२. विजयकुमार पिराजी लाड, ग्रंथालय परिचर, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर

बॅ. पी.जी. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार: डॉ. अनिलकुमार कृष्णराव वावरे (छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा)

कै. प्राचार्य श्रीमती सुमतीबाई पांडुरंग पाटील आदर्श शिक्षिका: डॉ. तेजस्विनी दीपक पाटील-डांगे (आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कासेगाव, जि. सांगली)

या खेरीज, कार्यक्रमात राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता विद्यार्थी सौरभ संजय पाटील आणि कुलपती सुवर्णपदक विजेती विद्यार्थिनी महेश्वरी धनंजय गोळे यांचाही कुलगुरूंच्या हस्ते पदक प्रदान करून गौरव करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व पसायदान सादर केले. श्रीमती नंदिनी पाटील व सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

तत्पूर्वी, विद्यापीठाच्या प्रांगणात प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक अभय जायभाये, अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, डॉ. एस.एस. महाजन, आयक्यूएसी संचालक डॉ. एम.एस. देशमुख, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड यांच्यासह व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा यांचे सदस्य, अधिविभाग प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक, त्यांचे कुटुंबिय, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कोविडविषयक नियमावलीचे पालन करून संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यात आला. विद्यापीठाच्या शिव-वार्ता या युट्यूब वाहिनीद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. ९५० हून अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतला.

 

No comments:

Post a Comment