Thursday, 9 July 2026

'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक - प्रा.चेतन सिंह सोलंकी

कोल्हापूर, दि.09 जुलै - 'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक आहे. सध्या मनुष्य वापरत असलेले पृथ्वीवरील संसाधनांचे प्रमाण निम्मे करणे गरजेचे आहे. याकरिताच 'क्लायमेट सत्याग्रह' करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोलर मॅन ऑफ इंडिया, एनर्जी स्वराजचे फाऊंडर प्रा.चेतन सिंह सोलंकी यांनी आज येथे केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इश्रे) आणि युआन यांच्या संयुक्त विद्यमाने 'भारत क्लायमेट सत्याग्रह यात्रा' अंतर्गत राजर्षी शाहू सभागृहामध्ये हवामान जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.सोलंकी प्रमुख वक्ते म्हणून बोलत होतेे.अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत उपस्थित होते.प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव यांची विशेष उपस्थिती होती.

            प्रा.सोलंकी पुढे बोलताना म्हणाले, जागतिक तापमान सातत्याने वाढत असून उन्हाळयात उष्णतेच्या तीव्र लाटा निर्माण होत आहेत.हवामानाचे चक्र बिघडल्यामुळे अनपेक्षित ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूर येण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी होऊन तीव्र दुष्काळ पडत आहे. तसेच, जंगलांना अचानक आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. बदलत्या हवामानामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत असून जगभरात अन्नटंचाई आणि कुपोषणाचा धोका निर्माण झाला आहे. तापमानवाढीमुळे दोन्ही ध्रुवांवरील हिमनदया वेगाने वितळत आहेत ज्यामुळे समुद्राची पातळी वाढत असून किनारपट्टीची शहरे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.अतिउष्णता आणि पुरामुळे अनेक साथीचे आजार, श्वसनाचे विकार आणि मानसिक समस्या वाढत आहेत.पृथ्वीवरील सर्वात महत्वाचे घटक पाणी, हवा आणि माती यालाच आपण दुषित करीत आहोत.यामुळे वातावरणामध्ये मोठे बदल घडत आहेत ते आता वेगाने बदलत आहेत.हिमनग वितळून साडेचार मिमीने समुद्राची पातळी वाढत आहे.आपण बदललो नाही तर मनुष्याचे जीवन धोक्यातच नाही तर नष्ट होईल.आधुनिक जीवनशैलीमधील प्रत्येक गोष्ट वातावरणावर परिणामकारक ठरत आहे.वातावरणामध्ये बदल घडविण्याचे काम हे फक्त सरकार आणि इंडस्ट्रीचे नाही तर आपणा प्रत्येकाचे हे काम आहे. छोटया मोठया कामातून दिवसागणीक मनुष्य निर्मित कार्बनडायऑक्साईडचे उत्सर्जन मोठया प्रमाणात होत आहे.हे उत्सर्जित कार्बनडायऑक्साईड जागाच्या वातावरणामध्ये तीनशे वर्षांपर्यत राहणार आहे.आज, जगामध्ये 53 टक्के जादा कार्बनडायऑक्साईड निर्मित झालेले आहे.यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे.सध्या, पृथ्वीचे 2.5 डीग्री फेरेनाईट इतके तापमान वाढलेले आहे.वस्तुंच्या अतिरेकी वापरामुळे निर्माण होणाऱ्या तपामानवाढीला 'लक्ष्मणरेखा' तयार केली पाहिजे.पृथ्वी सिमित आहे, सारे संसाधने सिमित आहेत तर तापमानवाढ रोखण्यासाठी आपल्या गरजाही सिमित करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी, श्रीम इलेक्ट्रीक लिमिटेड इंडस्ट्रीचे एस.आर.जगदाळे यांनी इनर्जी स्वराज फाऊडेशनला एक्कावन्न हजार रूपयांची देणगी दिली.

यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ.गिरीष कुलकर्णी, किर्लोस्कर ऑईल इंजिनचे शरद आजगेकर, आर्किटेक्चर शिरिष बेरी, इश्रेचे प्रमोद पुणगावकर यांची आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजनीश कामत म्हणाले,हवामान बदलामुळे जगभरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई, शेतीचे अतोनात नुकसान, अन्नसुरक्षेचा प्रश्न आणि मानवी आरोग्यास धोके निर्माण झाले आहेत.यासाठी आपण आपल्या घराची ज्यापध्दीने काळजी घेतो तशीच काळजी पृथ्वीची आपल्या सभोवतालच्या परिसराची घेतली पाहिजे.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.प्रदीप भास्कर यांनी स्वागत प्रस्ताविक केले.तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ.अजित कोळेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.डॉ.हर्षवर्धन पंडीत यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमाला उपेंद्र देऊसकर, आर्किटेक्ट अंजली जाधव, अजय कोरणे, डॉ.एन.एन.शिंदे तसेच इंडस्ट्रीचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, संशोधक, पर्यावरणप्रेमी जनता मोठया संख्येने उपस्थित होते.

-----

No comments:

Post a Comment