Tuesday 12 July 2022

राज्यभरातील ५४ शेतकरी देताहेत रेशीमशास्त्राची परीक्षा

 

शिवाजी विद्यापीठात रेशीमशास्त्र पदविका परीक्षेसाठी राज्यभरातून उपस्थित शेतकरी विद्यार्थी


कोल्हापूर, दि. १२ जुलै: शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात आजपासून रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका आणि पदविका या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना प्रारंभ झाला. विशेष बाब म्हणजे या ऑफलाईन परीक्षेसाठी अगदी सिंधुदुर्गापासून ते चंद्रपूरपर्यंतचे ५४ शेतकरी विभागात उपस्थित राहिले आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागात सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनक्युबेशन इन सेरिकल्चरची स्थापन सन २०१७-१८मध्ये करण्यात आली. त्यावेळी सेंटरमध्ये रेशीमशास्त्र पदव्युत्तर पदविका व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षापासूनच या अभ्यासक्रमांना राज्यभरातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. अगदी मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रवेश घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. एक वर्षाच्या या अभ्यासक्रमांसाठी दहा हजार रुपये इतके शुल्क भरून शेतकरी प्रवेश घेतात आणि परीक्षाही देतात. यंदाही सिंधुदुर्गपासून ते चंद्रपूरपर्यंतचे शेतकरी प्रवेशित झाले आहे. सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात असूनही राज्याच्या विविध जिल्ह्यातील शेतकरी विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित राहिले आहेत. या तरुण शेतकऱ्यांकडे रेशीमशेतीतील अनेक कौशल्य आहेत. तथापि अधिक शास्त्रीय कौशल्य आणि तंत्रज्ञानाच्या माहितीची जोड मिळाल्यास रेशीमशेतीमध्ये कोशांची गुणवत्ता आणि उत्पादकता वाढविता येते. तसेच, शास्त्रीय ज्ञान मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम शेतीतील आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या एकूण उत्पादनात आणि अर्थशास्त्रात मोठा बदल होतो. याच कारणांसाठी शेतकऱ्यांमध्ये हा अभ्यासक्रम लोकप्रिय झाला आहे. या लोकप्रियतेचे दुसरे कारण म्हणजे रेशीमशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी शेतकरी अवघा सहावी उत्तीर्ण आणि त्याला रेशीमशेतीतील तीन वर्षांचा अनुभव असला तरी प्राधान्याने प्रवेश देण्यात येतो. या वर्षी अशा ५४ शेतकऱ्यांनी प्रवेश घेतला आणि सध्या ते परीक्षा देत आहेत.

या बाबत अधिक माहिती देताना सेंटरचे समन्वयक डॉ. ए.डी. जाधव म्हणाले, सर्व शेतकरी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जात आहेत. ते इथे हजर झाले, हीच या अभ्यासक्रमाच्या यशाची पोचपावती आहे, असे मी मानतो. या अभ्यासक्रमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांची उद्यमशीलता, व्यावसायिकता आणि स्वावलंबन हे गुणही शेतीतून सिद्ध करतात. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी त्यासाठी केलेले मार्गदर्शन व प्रोत्साहन मोलाचे ठरले.

No comments:

Post a Comment