कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या
अन्न विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे "शाश्वत अन्न व्यवस्था" या
मध्यवर्ती संकल्पनेवर विशेष पोस्टर सादरीकरण व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी
एकूण ३० माहितीपर पोस्टर सादर करत अन्न, कृषी व संबंधित अन्न
विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शासकीय व अशासकीय संस्था, केंद्रीय मंत्रालये,
ग्राहक हक्क संरक्षण तसेच विविध शैक्षणिक संस्थांची सखोल माहिती प्रदर्शित केली. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी
भरडधान्यापासून तयार केलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन व विक्रीचे
स्टॉलही मांडण्यात आले.
सदर उपक्रमाचे उद्घाटन कुलसचिव डॉ. विलास शिंदे
यांच्या हस्ते आणि वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील यांच्या प्रमुख
उपस्थितीत करण्यात आले. यावेळी डॉ. शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले, अन्न, पाणी
आणि हवा या मानवाच्या खऱ्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात्मक
माहितीपलिकडे जाऊन मानवाचा शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने आपल्या ज्ञानाचा
उपयोग करावा.
या सादरीकरणामध्ये अन्न उत्पादन, वितरण आणि
व्यवस्थापनाच्या शाश्वत पद्धतींबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करणाऱ्या
पोस्टर्सचा समावेश होता. वाढती लोकसंख्या, हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची
मर्यादा आणि अन्नाचा अपव्यय यासारख्या समस्यांमुळे शाश्वत अन्न व्यवस्थेची गरज
अधिक तीव्र झाली आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांनी पोस्टर सादरीकरणातून प्रभावीपणे
मांडली. पारंपरिक व आधुनिक कृषी पद्धतींचे एकत्रीकरण, जलसंवर्धन, मृदासंवर्धन, जैविक शेती, तसेच स्मार्ट अॅग्रिकल्चरसारख्या
संकल्पनांची माहितीही त्यात होती. अन्न साखळीतील आधुनिक तंत्रज्ञान थंड साखळी
व्यवस्थापन, अन्न ट्रॅकेबिलिटी इत्यादींचा वापर कसा
शाश्वततेकडे वाटचाल करू शकतो याकडेही विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. अन्न सुरक्षा व
पोषण धोरणांबाबत सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेत, त्या योजनांची
प्रभावी अंमलबजावणी शाश्वत अन्न व्यवस्थेसाठीची उपयुक्तताही विद्यार्थ्यांनी अधोरेखित
केली. माहितीपूर्ण सादरीकरणातून अन्न व्यवस्थेतील भविष्यातील आव्हाने आणि संधी
यांचे विश्लेषण विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी व अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले.
या उपक्रमाला विद्यापीठातील शिक्षक, अभ्यासक आणि
विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अधिविभाग प्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील यांनी सामाजिक व
पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा हेतू या
आयोजनामागे असल्याचे सांगितले. डॉ. अभिजीत गाताडे यांनी आभार मानले.





No comments:
Post a Comment