Showing posts with label Shrimant Shahu Chhtrapati Maharaj. Show all posts
Showing posts with label Shrimant Shahu Chhtrapati Maharaj. Show all posts

Monday, 6 March 2023

जनमानसातील इतिहासाची उपेक्षा दूर करणे आवश्यक: कुमार केतकर

 महान शिवाजी महाग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात 'महान शिवाजी' महाग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ संपादक, खासदार कुमार केतकर. सोबत (डावीकडून) डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व वसंत आपटे



शिवाजी विद्यापीठात 'महान शिवाजी' महाग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक व खासदार कुमार केतकर.

शिवाजी विद्यापीठात 'महान शिवाजी' महाग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ पत्रकार-संपादक व खासदार कुमार केतकर. मंचावर (डावीकडून) डॉ. जयसिंगराव पवार, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व वसंत आपटे




कोल्हापूर, दि. ६ मार्च: जनमानसातील इतिहासविषयक उपेक्षेची भावना दूर करण्यासाठी त्यांच्या मनातील आदर्श व्यक्तीमत्त्वांच्या चरित्रांचा आधार घ्यायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, पद्मश्री खासदार कुमार केतकर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू संशोधन केंद्राच्या वतीने डॉ. बाळकृष्ण लिखित शिवाजी द ग्रेट या चार खंडांच्या महाग्रंथाचा मराठी अनुवाद महान शिवाजी या नावाने करण्यात आला आहे. डॉ. जयसिंगराव पवार संपादक असून वसंत आपटे अनुवादक आहेत. याचा प्रकाशन समारंभ आज विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री. केतकर बोलत होते. कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

इतिहासाच्या अभ्यासासाठी देशात पोषक वातावरण निर्माण होणे अत्यंत आवश्यक असून त्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता प्रतिपादन करून केतकर म्हणाले, इतिहास हा मुद्दा आपण अत्यंत काळजीपूर्वक पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. महान शिवाजी हा मूळ ग्रंथ ज्यांनी लिहीला, त्या डॉ. बाळकृष्ण यांचे मूळ मुलतान आहे, जे सध्याच्या पाकिस्तानात आहे. पण, ते पाकिस्तानात आहे म्हणून त्या ठिकाणाचा द्वेष करण्याचे कारण नाही. कारण इतिहासात मुलतान हे बौद्ध, जैन, हिंदू या सर्वच परंपरांचे पवित्र ठिकाण होते. तेथे त्यांच्या यात्रा भरत. पण इतिहासाच्या ज्ञानाअभावी ते आपल्या द्वेषाला कारण ठरते. तसे होऊ नये. तेथून महाराष्ट्रात येऊन डॉ. बाळकृष्ण महाराष्ट्रवासी झाले, ते कायमचेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ते इतके प्रेमात पडले की, त्यांचे अस्सल साधनांनिशी चरित्र लिहीणे, हे त्यांनी आपले जीवितकार्य मानले आणि पूर्णत्वास नेले. तत्कालीन व्यवस्थेमध्ये बाळकृष्णांना महाराज हे राष्ट्रीय चळवळीचे व स्वातंत्र्याचे प्रतीक वाटले असावेत, यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ही त्यांची महाराजांवरील अपार निष्ठा होती. जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांत इतिहासाबद्दल आस्था निर्माण करीत नाही, तोवर बाळकृष्णांचे योगदान त्यांच्या ध्यानी येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य या संकल्पनेचे वेगळेपण व महत्त्व अधोरेखित करताना कुमार केतकर म्हणाले, सार्वभौम स्वराज्याची संकल्पना जागतिक स्तरावर सुद्धा अस्तित्वात नसण्याच्या कालखंडात शिवाजी महाराजांनी त्या संकल्पनेवर आधारित स्वराज्य स्थापन केले. त्यांच्या प्रत्येक आदेशात, निर्णयात रयतेच्या हिताचा, कल्याणाचा विचार असे. महाराजांनी आपल्या साथीदारांना कधीही जहागिरी वाटल्या नाहीत. पिळवणुकीची, शोषणाची व्यवस्था त्यांनी स्वराज्यात कधीही निर्माण होऊ दिली नाही. आधुनिक सार्वभौम प्रजासत्ताकाच्या पद्धतीने राज्य चालविले. महाराजांनी लोकशाही मूल्ये स्वराज्यात ज्या पद्धतीने रुजविली, त्याला तोड नाही. तुलनेने लहान भूगोलावर महाराजांनी जे पेरले, त्याची दहशत त्याहून किती तरी पटींनी मोठ्या पातशाह्यांना होती. परकीय अभ्यासक, संशोधकांना त्यांचे आकर्षण होते. याचे कारण त्यांच्या राज्यपद्धतीमध्ये आहे. त्या दृष्टीने महाराजांचे रयतेच्या दृष्टीने काय योगदान होते, त्याची सातत्याने चर्चा होणे आवश्यक आहे. त्या काळात देशात अस्तित्वात असलेल्या ६५० संस्थानिकांपैकी एकाला सुद्धा आपले आरमार असावेसे वाटले नाही, पण शिवाजी महाराजांना सागरावरील अधिपत्याची आवश्यकता जाणवली होती, हे त्यांचे सर्वात मोठे वेगळेपण आहे. या सर्व बाबी समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी महाराजांचे विविध संदर्भसाधनांचा वापर करून पहिलेच विस्तृत चरित्र साकारले. महाराजांना शिवाजी द ग्रेट असे संबोधून जगज्जेता एलेक्झांडरच्या तोडीचे त्यांचे कार्य असल्याचे प्रथमच निदर्शनास आणून दिले. शंभर वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचे नाव घेईल, तो ब्रिटीशांचा शत्रू, असे एक चित्र होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी थेट प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या हातूनच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी करवून घेऊन त्यांच्याभोवतीचे हे अप्रसिद्धीचे कडे भेदले.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, डॉ. बाळकृष्ण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनेक पैलू ससंदर्भ सामोरे आणले आहेत. मराठा आरमाराचे जनक, हिंदी राष्ट्रीयत्वाचे प्रेरणास्थान आणि भारतीय स्वातंत्र्याचा ध्रुवतारा अशी महाराजांविषयीची वर्णने डच कागदपत्रांमध्ये सतराव्या शतकामध्येच करण्यात आली आहेत. ती बाळकृष्ण येथे सविस्तर मांडतात. इंग्लीश, फ्रेंच, डच, पोर्तुगीज अशा सर्व प्रकारच्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे त्यांनी महाराजांचे मोठेपण अधोरेखित केले आहे. सर्व बाजूंनी बलाढ्य शत्रूंनी घेरले गेले असताना सुद्धा शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेणे हे विस्मयजनक असल्याचे निरीक्षण डच अभ्यासकांनी नोंदविल्याचे येथे दिसते. त्याचप्रमाणे महाराजांच्या जडणघडणीतील माता जिजाऊंचे योगदानही सांगितले आहे. त्याग, सदाचार, कर्तव्यकठोरता, आदर आणि सन्मान अशी उच्चतम मूल्ये जिजाऊंनी शिवरायांच्या मनात रुजविली. मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवाजी महाराजांसाठी २५ हजार पागोडे बाजूला काढून ठेवल्याची नोंदही यामध्ये आढळते. यावेळी डॉ. पवार यांनी डॉ. बाळकृष्ण व छत्रपती राजाराम महाराज यांचे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेमधील योगदानही अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी डॉ. पवार यांच्या मागणीचा संदर्भ घेऊन या वर्षीपासून डॉ. बाळकृष्ण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ व्याख्यानमाला सुरू करण्यात येईल, याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे महान शिवाजी हा ग्रंथ राज्यातील सर्व विद्यापीठांना विशेष दूताकरवी पाठविण्यात येईल, असेही सांगितले.

यावेळी अनुवादक वसंत आपटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व डॉ. बाळकृष्ण यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कुमार केतकर यांच्या हस्ते महान शिवाजी या द्विखंडीय महाग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. देविकाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिवप्रेमी नागरिक, अभ्यासक, संशोधक, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 13 April 2022

डॉ. डी.वाय. पाटील यांच्यामुळे आधुनिक शिक्षण बहुजन समाजघटकांपर्यंत: श्रीमंत शाहू छत्रपती महाराज

शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार' 'पद्मश्री' डॉ. डी.वाय. पाटील यांना प्रदान करताना श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, सौ. शांतादेवी डी. पाटील आणि प्राचार्य बी.ए. खोत.
 
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज



शिवाजी विद्यापीठात प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांनी बहुजन समाजघटकांत आधुनिक शिक्षण वृद्धीचे मोलाचे कार्य केले, असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा सन २०२२ साठीचा प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्कार शाहू महाराज यांच्या हस्ते आज पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, सौ. शांतादेवी डी. पाटील आणि डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील प्रमुख उपस्थित होते.

यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉ. डी.वाय. पाटील यांना प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये १ लाख ५१ हजार रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. डॉ. अरुण कणबरकर यांनी कणबरकर कुटुंबियांच्या वतीने डॉ. पाटील यांचा सत्कार केला. तर, डॉ. नमिता खोत यांनी सौ. शांतादेवी पाटील यांचा सत्कार केला.

डॉ. डी.वाय. पाटील यांच्या कारकीर्दीचे आपण गेल्या साठ वर्षांहून अधिक कालखंडाचे साक्षीदार असल्याचे सांगून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. पाटील हे शहाजी महाराजांना भेटावयास यत असत, तेव्हापासूनचा आमचा स्नेह आहे. राजकारणापासून अलिप्त होऊन शैक्षणिक कार्य करण्याचा निर्णय खूप मोठा होता. मात्र, त्यांनी तो धाडसाने घेतला आणि त्यांच्या या कार्याचा लौकिक केवळ देशातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतही विस्तारला आहे. त्यांच्या संस्था विनाअनुदानित असल्या तरी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत तेथे कोणतीही तडजोड दिसून येत नाही, हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी.लिट.सह कणबरकर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. डी.वाय. पाटील म्हणाले, प्राचार्य कणबरकर सर हे माझे गुरू आहेत. गुरूंच्या नावे असणारा पुरस्कार मला मिळाला, यामुळे उपकृततेची भावना मनी दाटली आहे. त्यामुळेच अन्य पुरस्कारांपेक्षा हा पुरस्कार माझ्यासाठी खूप वेगळा आणि जवळचा आहे. पूर्वी गुरूदक्षिणा दिली जायची, पण आज गुरूकडून शिष्याचा सन्मान झाला आहे, हे या पुरस्काराचे वेगळेपण आहे.

यावेळी डॉ. डी.वाय. पाटील यांनी पुरस्काराच्या १ लाख ५१ हजार रुपयांच्या रकमेत आणखी १० लाख रुपयांची भर घालून तो निधी विद्यापीठाकडे सुपूर्द करण्याची घोषणा केली. या निधीमधून संतसाहित्याच्या क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पुरस्कार योजना निर्माण करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ. पाटील यांच्या हस्ते सदर ११ लाख ५१ रुपये इतक्या निधीचा धनादेश कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, डॉ. डी.वाय. पाटील हे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी तर आहेतच, शिवाय, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, विद्यापीठाची मानद डी.लिट. धारक व्यक्तीमत्त्व आणि आता त्यांचे शिक्षक असलेल्या कुलगुरूंच्या नावचा पुरस्कार प्राप्त झाल्याने या विद्यापीठाशी त्यांचे असणारे दृढ नातेच अधोरेखित होते. डॉ. पाटील आणि डॉ. कणबरकर कुटुंबिय यांच्यामध्ये दातृत्वाचा आणि त्यागाच्या संस्काराचा एक धागा दिसतो. आजचा समारंभ या दोन कुटुंबियांच्या दातृत्वातून साजरा झाला आहे. डॉ. पाटील यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेची पूर्ती विद्यापीठातर्फे करण्यात येईल, याची ग्वाही अधिकार मंडळांच्या वतीने कुलगुरूंनी दिली.

डॉ. कणबरकर यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता. त्यातून या परिसरात शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही ते हिरीरीने सक्रिय राहिले. त्यांनी केलेल्या भरीव पायाभरणीमुळेच त्यांनी जिथे जिथे काम केले, ती महाविद्यालये आज स्वायत्त बनलेली आहेत, असे गौरवोद्गारही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी काढले.

तत्पूर्वी, कार्यक्रमाची सुरवात डॉ. कणबरकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. डॉ. प्राचार्य कणबरकर आणि डॉ. डी.वाय. पाटील यांच्या जीवनकार्यावरील ध्वनीचित्रफीती दाखविण्यात आल्या. मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी डॉ. पाटील यांना प्रदान करावयाच्या मानपत्राचे वाचन केले. प्राचार्य डॉ. बी.ए. खोत यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. नंदिनी पाटील व धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमास माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. बी.एम. हिर्डेकर, डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषद तसेच अधिसभा यांचे सदस्य, डॉ. डी.वाय. पाटील समूहाचे पदाधिकारी, शिक्षक, प्रशासकीय सेवक, कणबरकर कुटुंबिय आणि डॉ. पाटील यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Friday, 11 March 2016

प्रामाणिक बौद्धिक वादविवाद हे बाबासाहेबांच्या चळवळीचे सूत्र: प्रा. अविनाश डोळस



डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक १२५ व्याख्यानांचे विद्यापीठाकडून यशस्वी आयोजन


कोल्हापूर, दि. ११ मार्च: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यातील बहुतेक सर्व लढे, चळवळी या बुद्धीच्या बळावरच जिंकल्या. प्रामाणिक बौद्धिक वादविवाद, चर्चांवर त्यांचा विश्वास होता, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण प्रकाशन समितीचे सदस्य-सचिव प्रा. अविनाश डोळस यांनी आज येथे केले.
डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आणि बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १२५ संलग्नित महाविद्यालयांत सकाळी ११ वाजता एकाच वेळी सुमारे १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. या मालिकेअंतर्गत शिवाजी विद्यापीठात 'डॉ. आंबेडकर व चळवळ' या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डोळस बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
प्रा. डोळस म्हणाले, बौद्धिक, वैचारिक देवाणघेवाणीखेरीज सुसंवाद प्रस्थापित होणे अशक्य आहे, असे बाबासाहेबांचे ठाम मत होते. कोणी राजा, नेता किंवा धर्मगुरू नव्हे, तर त्या त्या समाजातील बुद्धीवादी लोकच परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत ठरत असतात, असे ते म्हणत. भ्रष्ट पोटार्थी कारणांसाठी बुद्धीवादाचा वापर केल्यास त्यातून भ्रष्ट व्यवस्थाच जन्माला येते. त्यामुळे मानव कल्याणाचा विचार करणाऱ्या प्रामाणिक बुद्धीवादाची समाजाला नित्य गरज असते कारण त्यातून समतेच्या विचारांची रुजवात शक्य असते, असे त्यांचे मत होते. या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरच केवळ एका भाषणामुळेच बाबासाहेबांचे घटना समितीमधील स्थान पक्के झाले, हा इतिहास आहे.
डॉ. आंबेडकरांची चळवळ ही कधीही प्रतिक्रियावादी नव्हती, असे सांगून प्रा. डोळस म्हणाले, बाबासाहेब त्यांच्या चिंतनातून आणि कार्यातून या व्यवस्थेपुढे प्रश्न उपस्थित करत आणि त्यांची उत्तरे समाजाला द्यायला भाग पाडत. या प्रतिक्रियांतून बाबासाहेबांना प्रबोधनाची अपेक्षा असे. या वादविवादांमधूल विचारांचा विस्तार व्हावा आणि दुसऱ्यांना समजून घेण्याच्या प्रक्रियेची निर्मिती व्हावी, असा त्यांचा विचारमंथन घडवून आणण्यामागे हेतू असे. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादविवादांना मोठे महत्त्व आहे. या वादविवादाला बौद्ध धम्माची परंपरा तर आहेच, शिवाय, संसदीय लोकशाही पद्धतीत विरोधी पक्ष ठेवण्यामागेही निकोप लोकशाहीच्या निर्मितीचा हेतू असल्याचेच आपल्या निदर्शनास येईल.
कोणत्याही समस्येचा राष्ट्रीय भावनेच्या दृष्टीकोनातून वेध घेणारे बाबासाहेब हे महान व्यक्ती असल्याचे सांगून प्रा. डोळस म्हणाले, भारत- पाकिस्तान फाळणीच्या संदर्भात सैद्धांतिक मांडणी करणारे डॉ. आंबेडकर एकमेव व्यक्ती होते. त्यांच्या या मांडणीमुळेच फाळणीच्या प्रक्रियेला दिशा मिळू शकली. भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेमध्येही त्यांनी भारतातील विविध भाषा, प्रांत, संस्कृती यांचा सखोल अभ्यास करून समावेश केला. ईशान्य भारतीय राज्यांतील नागरिकांची जमातींमध्ये गणना करून ते भारताचा अविभाज्य घटक राहतील, याची तजवीजही बाबासाहेबांनी मोठ्या कौशल्याने केली.
आज एक राष्ट्र म्हणून आपण एकत्र असण्याला एकच आधार आहे, तो म्हणजे भारताचे संविधान, असे सांगून प्रा. डोळस पुढे म्हणाले, समता, बंधुता, सामाजिक न्याय, व्यक्तीस्वातंत्र्य आदी मानवी मूल्यांचा संविधानात बाबासाहेबांनी समावेश केला. या मूल्यांना व्यक्तीगत पातळीवर मानणारे काही उदारमतवादी नेतेही होते, तथापि, त्यांना मानणारा समूह अस्तित्वात नसणे हा बाबासाहेबांच्यासमोरील मोठा प्रश्न होता. त्यामुळे बौद्ध धम्माच्या स्वीकारातून त्यांनी या मूळ बौद्ध तत्त्वज्ञानाचा जीवनमूल्य म्हणून अंगिकार करणारा समूह निर्माण केला. धम्म म्हणजे नैतिकता या मूल्याचा आग्रह धरणारा समाज बाबासाहेबांनी दिला, हे भारतीय लोकशाही टिकण्यासाठी त्यांनी दिलेले मोठे योगदान आहे. जेव्हाही या देशासमोर बौद्धिक कसोटीचा क्षण उभा ठाकतो, तेव्हा संदर्भ म्हणून बाबासाहेबच सामोरे येतात, असेही ते म्हणाले.
धर्म, जात यांच्या भेदांवर नव्हे, तर समताधिष्ठित नवसमाज निर्मितीचा आग्रह धरणाऱ्या बाबासाहेबांच्या कार्यामागे लिंगभेदाच्या पलिकडे जाऊन सामाजिक समता प्रतिष्ठापनेचे सूत्र होते. त्याचप्रमाणे अडाणी माणसालाही लोकशाही प्रक्रियेत स्थान व मूल्य प्राप्त करून देण्याचे श्रेयही बाबासाहेबांचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महात्मा फुले यांच्याबरोबरीने राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव महाराज यांच्या उल्लेखाखेरीज सामाजिक चळवळींचा इतिहास अपूर्ण असल्याची भावनाही प्रा. डोळस यांनी व्यक्त केली.
यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी ज्या कौशल्याने लवचिक संविधानाची निर्मिती केली, त्यामुळेच ही लोकशाही टिकून आहे. भारतीय समाज त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञ राहील. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यामधील अनोख्या स्नेहपूर्ण पैलूंचाही त्यांनी आपल्या भाषणात वेध घेतला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना कितीही विशेषणे-उपमा देण्यात येत असल्या तरी 'बाबासाहेब' हे संबोधन माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाशी अधिक जवळचे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान, ओळख आणि अस्तित्वाची जाणीव प्रदान केली. बाबासाहेबांच्या नवसमाजरचनावादाची आता विज्ञानाच्या आधारावर नव्याने मांडणी करणे आवश्यक आहे. विज्ञानाच्या मते, जात ही आपली 'ब्लडलाइन' असते; तथापि, आपण तिला 'बॅटल-लाइन' बनविली आहे. संविधानाचा प्रामाणिक अंगिकार हा त्यावरचा एकच उपाय आहे. या देशाचा संविधान हा एकच ग्रंथ असला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. कृष्णा किरवले यांनी परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. आंबेडकर आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले. सुस्मिता खुटाळे, कोमल खैरमोडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. डी. के. गायकवाड, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्याख्यान मालिका उपक्रमाचे मान्यवरांकडून कौतुक
महामानवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाने डॉ. आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आज एकाच वेळी १२५ महाविद्यालयांत १२५ तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्याच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. ही अभिनव कल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी कुलगुरू डॉ. शिंदे यांचे मी अभिनंदन करतो, असे प्रा. अविनाश डोळस म्हणाले. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनीही विद्यापीठाचा हा एकमेवाद्वितिय उपक्रम असून त्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, याबद्दल समाधान व्यक्त केले.