Monday 22 October 2018

विद्यापीठात माहौल ‘जश्न-ए-कव्वाली’चा!

देशाला एका सूत्रात गुंफण्याची क्षमता संगीतात: डॉ. डेव्हीड सॅम्पसन

शिवाजी विद्यापीठात आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ कव्वाली स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी एआययूचे सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन. व्यासपीठावर (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, विद्यार्थी विकास संचालक डॉ. आर.व्ही. गुरव.



मध्य प्रदेशातील सागर येथील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठाचा संघ

राजस्थान येथील बनस्थळी विद्यापीठाचा संघ

कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर: ‘मेहफिल हमारी एक है, मेहफिल के टुकडे मत करो... मंझिल हमारी एक है, मंझिल के टुकडे मत करो... भारत हमारा एक है, भारत के टुकडे मत करो... अशी प्रत्येक देशबांधवाला आर्त साद घालणारी कव्वाली मध्य प्रदेशातल्या सागर येथील डॉ. हरिसिंह गौर विद्यापीठाच्या कव्वालीच्या संघाने कव्वाली सादर केली आणि खऱ्या अर्थाने शिवाजी विद्यापीठात जश्न-ए-कव्वालीचा माहौल तयार झाला.
कव्वालीला कोल्हापुरात प्रेक्षक नाही, अशी भावना एकीकडे असताना दुसरीकडे विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर सभागृहात या कव्वाली स्पर्धेला रसिकांचा इतका प्रतिसाद लाभला की, दुपारपर्यंत सभागृहात उभे राहण्यासही जागा नव्हती.
विद्यापीठात आजपासून तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेस प्रारंभ झाला. त्याच्या प्रारंभाची कव्वाली गौर विद्यापीठाच्या संघाने सादर केली. शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय विद्यापीठ महासंघ (एआययू) यांच्या संयुक्त विद्यमाने ही दोन दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तत्पूर्वी, नवी दिल्ली येथील भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) सहसचिव डॉ. डेव्हीड सॅम्पसन यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि एआययूचे निरीक्षक डॉ. विश्वरामन निर्मल प्रमुख उपस्थित होते.
डॉ. डेव्हीड सॅम्पसन
यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. सॅम्पसन म्हणाले, संगीत हे क्षेत्र असे आहे, की त्यामध्ये साऱ्या देशाला एका सूत्रात गुंफण्याची क्षमता आहे. संगीत माणसाला चिरतरुण ठेवते. कव्वाली ही तर पवित्र हृदयाने ईश्वराला घातलेली साद आहे. कव्वालीसारखा एक अतिशय महत्त्वाचा सांगितिक कलाप्रकार अस्तंगत होऊ लागला आहे, त्याला संजीवनी देण्यासाठी या कव्वाली स्पर्धेचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय एकात्मता आणि परंपरा यांचा संगम या माध्यमातून व्हावा, म्हणून एक कव्वाली राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सौहार्दाचे आवाहन करणारी असावी, अशी अट या स्पर्धेसाठी घालण्यात आली आहे. जेणे करून एकतेची, समतेची भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजेल. यावेळी डॉ. सॅम्पसन यांनी कव्वाली, सुफी, फकीर या परंपरांचे यथार्थ विश्लेषण केले. शिवाजी विद्यापीठाने या स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात दाखविलेल्या सकारात्मकतेचेही त्यांनी मनापासून कौतुक केले.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, रांगड्या पोवाडा आणि लावणीची परंपरा असलेल्या कोल्हापुरात कव्वाली स्पर्धेचे आयोजन ही एका सांस्कृतिक बदलाच्या आणि समावेशनाच्या दिशेने आपली वाटचाल होत असल्याचे सुलक्षण आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवूनच ही स्पर्धा आयोजिली आहे. गतवर्षी शिवाजी विद्यापीठाच्या कव्वाली संघाने राष्ट्रीय कव्वाली स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. त्या विद्यार्थ्यांच्या यशामुळेच मला शिवाजी विद्यापीठात ही स्पर्धा आयोजित करण्याची प्रेरणा मिळाली. ऐ माटी के पुतले तुझे कितना गुमान है, ही माणसाला स्वतःचा शोध घेऊन माणुसकीला प्रेरित करणारी कव्वाली ही व्यक्तीशः आपली आवडती असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी स्पर्धेचे परीक्षक सईद खान (नवी दिल्ली), रियाझ खान (मुंबई) व भारती वैशंपायन (कोल्हापूर) यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. स्वरुपा पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी आभार मानले.
त्यानंतर मध्य प्रदेशातील गौर विद्यापीठाच्या संघाचे सादरीकरण झाले. त्याच्यानंतर राजस्थान येथील बनस्थळी विद्यापीठाच्या संघाने चाह ये है के मेरी हर साँस देश के नाम पर मिट जाए ही कव्वाली सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
दरम्यान, सुरवातीला प्रमुख अतिथींना मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कोल्हापुरी फेटे बांधून आणि त्यानंतर तेथून कार्यक्रम स्थळापर्यंत हलगी-ताशाच्या कडकडाटात त्यांचे मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले.


No comments:

Post a Comment