Monday 12 June 2023

भारत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था एकत्र येणे आवश्यक - डॉ. उदय निरगुडकर

 



कोल्हापूर, दि.12 जून - भारत देशाला विश्वगुरू बनविण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि शिक्षण व्यवस्था एकत्र येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भारत सरकारच्या नॅशनल हायड्रो इलेक्ट्रीक पॉवर कार्पोरेशन प्रा.लिमिटेडचे स्वतंत्र संचालक डॉ.उदय निरगुडकर यांनी आज येथे केले.

      शिवाजी विद्यापीठाच्या विद्यापीठ उद्योग संवाद केंद्राच्या वतीने ''युनिव्हर्सिटी-इंडस्ट्री लिंकेजिस : एम्प्लॉएबिलिटी अँड आंत्रप्रिन्युअरशीप डेव्हलपमेंट'' या विषयावर विद्यापीठ-उद्योग संवादवृद्धीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण विशेष परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये करण्यात आले होते.  या परिसंवादाच्या उद्धाटनपर भाषणामध्ये डॉ.उदय निरगुडकर बोलत होते.  अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के उपस्थित होते.

डॉ. निरगुडकर पुढे बोलताना म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये संपूर्ण धडा उद्योग आणि शैक्षणिक संबंधांवर आधारीत आहे.  उद्योग क्षेत्र आणि शिक्षण व्यवस्थेमधील वाढलेली दरी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे.  आज, आपल्या देशाची प्रगती तर शेजारील देशांची अधोगती होताना दिसत आहे.  हे केवळ देशातील लोकशाही आणि येथील शिक्षण व्यवस्थेमुळे शक्य झाले. आपण संशोधन करतो तेव्हा रूपयाचे रूपांतर ज्ञानामध्ये करीत असतो आणि नवकल्पनांचा अंतर्भाव करीत असतो तेव्हा ज्ञानाचे रूपांतर रूपयामध्ये करीत असतो.  उद्योग व्यवसायामध्ये उभारी घेण्यासाठी शिक्षणातील व्यवस्थापनाचा पाया मजबूत असणे आवश्यक आहे.  उद्योग क्षेत्रास त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे सुलभ असणारे अभ्यासक्रम विद्यापीठांनी शिकविले पाहिजेत.  प्राध्यापकांनी उद्योगक्षेत्रामध्ये दोन वर्षे काम करावे आणि पुन्हा येवून अभ्यासक्रमाची रचना करावी. 

राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिध्दार्थ शिंदे परिसंवादाची उद्दीष्टे विषद करताना म्हणाले, विद्यापीठाने उद्योग क्षेत्रास पूरक अभ्यासक्रम आणि तांत्रिकदृष्टया सक्षम मनुष्यबळाचा पुरवठा केल्यास देशाच्या प्रगतीत निश्चित हातभार लागणार आहे.विद्यापीठ आणि उद्योग क्षेत्र एकत्र आल्यास दर्जेदार शिक्षणाबरोबरच देशाच्या आर्थिक विकासात निश्चित वृध्दी होईल.

प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील मनोगतामध्ये म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरीच्या शोधात राहता स्वत:चा उद्योग कसा निर्माण करता येईल हे पाहिले पाहिजे.  संघर्षमय जीवनामध्ये जगत असताना आपल्याकडे वेगळया प्रकारचे कौशल्य असली पाहिजेत.  स्टार्टअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, त्याचा उपयोग करावा.  नाविण्यपूर्ण संशोधनाचा लाभ विद्यार्थी आणि शिक्षकांनी घेतला पाहिजे. त्याचबरोबर, संशोधनाच्या माध्यमातून विद्यमान तंत्रज्ञानामध्ये आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

            अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी या वर्षापासून सुरू झालेली आहे.ती पहिल्यांदा पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी सुरू होत आहे.अद्यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्थानिक समस्यांबरोबरच जागतिक समस्यां सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे.बदलत्या काळामध्ये टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करावेत.  प्रचलीत आणि नामांकित महाविद्यालयांएेवजी विद्यार्थी दुसऱ्या अभ्यासक्रमांसाठी अन्य महाविद्यालयांकडे जात आहेत.  याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.रोजगाराधारीत शिक्षणाची आज गरज आहे.

विद्यापीठ उद्योग संवाद केंद्राचे समन्वयक डॉ.सागर डेळेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केल.  तंत्रज्ञान अधिविभागप्रमुख डॉ.शिवलिंगप्पा सपली यांनी आभार मानले.यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचेसह मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.सरिता ठकार, विविध अधिविभागांचे प्रमुख, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थींनी, उद्योग-व्यवसायप्रेमी जनता मोठया प्रमाणात उपस्थित होते.

-----------

विद्यापीठ आणि उद्योग यांच्यामधील संवाद वृध्दींगत होण्याच्या दृष्टीने परिसंवादामध्ये सहभागी प्रतिनिधींच्या चर्चासत्राचे आयोजन कार्यक्रमाच्या उद्धाटन सत्रानंतर करण्यात आले.

श्री.अभय देशपांडे (पायाभूत संरचना उद्योग) -या क्षेत्रामध्ये येणारे विद्यार्थी संवाद कौशल्यामध्ये खूप कमी पडतात.व्यावहारीक ज्ञानाबरोबरच क्षेत्रीय ज्ञानामध्ये विद्यार्थी कमी पडतात. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविण्यासाठी विद्यापीठाने मार्गदर्शन केले पाहिजे.त्याचबरोबर इलेक्ट्रीक वाहनासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव विद्यापीठाने केला पाहिजे.

श्री.मोहन जयकर (विधी सेवा) रोजगारासाठी विधीचे विद्यार्थी विविध शहरांमध्ये जातात परंतु त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या इंग्रजी भाषेमधून बोलू शकत नाहीत.  शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजीमधून संवाद साधले पाहिजेत.  आपल्या देशामध्ये परदेशातील वकील येत आहेत.  त्यांच्यासमोर निभाव लागण्यासाठी स्वत:मध्ये सुधारणा केली पाहिजे.  शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कालबाहय अभ्यासक्रमाची माहिती न देता अद्यावत अभ्यासक्रमाची माहिती दिली पाहिजे.

श्री.ओंकार गुणे (औषधनिर्माण) फार्मासुटीकल्स इंडस्ट्री खूप मोठयाप्रमाणात उद्योग निर्मिती करते.  फार्मासुटीकल्स इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथील अप्रत्यक्ष मार्केटींगची जागृकता नाही.  विद्यार्थ्याचे संवाद कौशल्य उत्तम असले पाहिजे.  विद्यापीठाने या क्षेत्राची विद्यार्थ्यांना ओळख करून द्यावी आणि चांगल्याप्रकारे अभ्यासक्रमाची निर्मिती करावी.

श्री. जयराज पाटील (कास्टींग) विद्यार्थ्यांनी मानधनाकडे न पाहता सर्जनशीलतेवर भर दिला पाहिजे.  वैद्यकीय क्षेत्रामध्ये कास्टींगचा प्रचंडप्रमाणात वापर होत आहे.  विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि शिक्षणाच्या माध्यमातून सहकार्य केल्यास कोल्हापूर हे पुढील वैद्यकीय केंद्र होवू शकतो.

श्री. प्रितम संगवी (प्लास्टीक) -  विद्यापीठाने या क्षेत्रामधील व्यावहारिक शिक्षणावर भर दिला पाहिजे.  विद्यार्थ्यांना, प्रबंध आणि संशोधन प्रकल्प अनिवार्य करावेत. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यामध्ये मोठयाप्रमाणावर प्लास्टीक इंडस्ट्री आहे.  विद्यार्थ्यांना निश्चितच या ठिकाणी रोजगार उपलब्ध होवू शकेल. तसेच, प्लास्टीक उद्योगाला मोठयाप्रमाणात चालना मिळू शकेल. 

श्री. सतीश डाकरे (अकाऊंटिंग) कॉमर्स शाखेतील विद्यार्थी फक्त अकाऊंटिंगमध्ये अडकून पडतात.  वाणिज्य संघटन, अर्थशास्त्र, खर्च, सेक्रेट्रीयल प्रॅक्टीस, बिझनेस लॉ, बैंकींग अँड इंश्युरन्स्, इक्विटी मार्केट, सरकारी लेखे याबाबत विचारच करीत नाहीत.  हे विद्यार्थी शिकता शिकता अर्थार्जन करावे.  संगणक कौशल्यामध्ये निपुण व्हावेत. 

श्री. सचिन पाटील (माहिती तंत्रज्ञान) -  गणितामध्ये आवड असेल तर विद्यार्थ्यांना आयआयटीमधील कोणत्याही क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करता येते.  18 ते 22 वयोगटातील विद्यार्थ्यांना लवकर संवाद कौशल्ये आत्मसात करता येतात.  सध्याच्या शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञानाचे अद्यावत ज्ञान असणे आवश्यक आहे.

श्री. रमाकांत मालू (समृध्दी इंडस्ट्री लि.) - उद्योग व्यवसाय सुरू करताना विद्यार्थ्यांना भांडवलाची उभारणी, टॅक्सेशन, कामगार कायदा यांची माहिती नसते.  विद्यार्थ्यांना येणाऱ्या या अडचणींचा अंतर्भाव अभ्यासक्रमामध्ये होणे गरजेचे आहे.  प्लास्टीक इंडस्ट्रीच्या अभ्यासक्रमामध्ये जुने अभ्यासकम आहे ते बदलले पाहिजेत.  नवीन, डीजीटल तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करावा.

-----------

 

No comments:

Post a Comment