Friday, 31 January 2025

पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत

शिवाजी विद्यापीठाला तीन पारितोषिके

कृषी रोबोट, धरण आपत्ती सूचना प्रणाली प्रथम; आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेसाठी निवड

 

नवी मुंबई येथे झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत सहभागी झालेला शिवाजी विद्यापीठाचा संघ डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि डॉ. नेहा जोशी यांच्यासमवेत.

नवी मुंबई येथे झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेतील शिवाजी विद्यापीठाचे विजेते संशोधक विद्यार्थी एआययूचे संचालक डॉ. अमरेंद्र पाणी, डॉ. एम.डी. पाटील, डॉ. नेहा जोशी, डॉ. मानसिंगराज निंबाळकर आदींसमवेत.



कोल्हापूर, दि. ३१ जानेवारी: नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून अंबाला येथे मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेमध्ये स्थान प्राप्त केले आहे.

नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात ३० व ३१ जानेवारी अशी दोनदिवसीय पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५ पार पडली. आज या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. त्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रे, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या दोन गटांत शिवाजी विद्यापीठाने प्रथम क्रमांक आणि मूलभूत विज्ञान गटात तृतीय क्रमांक मिळविला.

कृषी व संलग्न क्षेत्रे या गटात विघ्नेश उत्तम पाटील, ताहीर निसार मुल्ला आणि दीक्षा निवास घोसरवाडे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांनी शेती व्यवस्थापनासह जनावरांची देखभाल करणारा कृषी रोबोटसादर केला. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान गटात शुभम गिरीगोसावी, बालाजी प्रकाश पाटील आणि रोहित गणपती गवळी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. धरणाच्या भिंतीला धोका झाल्यास संभाव्य जीव व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणालीचे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी केले. मूलभूत विज्ञान गटात सुषमा राजीव देशमुख व अनुष्का रॉय यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांनी दुर्मिळ वनस्पती घटकांपासून औषध निर्मितीचा प्रकल्प सादर केला. विजेत्यांना भारतीय विद्यापीठ महासंघाच्या (ए.आय.यू.) संशोधन विभागाचे संचालक डॉ. अमरेंद्र पाणी यांच्या हस्ते आणि रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एम.डी. पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संशोधकांना त्यांचे प्रकल्प आता मार्चमध्ये अंबाला येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे. 

स्पर्धेच्या सामाजिक विज्ञान व मानव्यशास्त्रे, आरोग्य विज्ञान व संलग्न क्षेत्रे, मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, कृषी व संलग्न क्षेत्रे आणि आंतरविद्याशाखीय संशोधन या सहा संशोधन गटांमध्ये विद्यापीठाचा १४ जणांचा संघ सहभागी झाला. संघ व्यवस्थापक म्हणून विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र अधिविभागातील डॉ. मानसिंगराज निंबाळकर आणि सांगली येथील विलिंग्डन महाविद्यालयाच्या डॉ. नेहा जोशी यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील विजेत्यांसह सहभागी संशोधक विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह आविष्कार समन्वयक डॉ. डी. एच. दगडे, जीवरसायनशास्त्र अधिविभागाचे डॉ. पी. के. पवार आणि विलिंग्डन महाविद्यालयाचे डॉ. एस. डी. जाधव यांनी अभिनंदन केले आहे.

Thursday, 30 January 2025

गतिशीलता आणि स्वावलंबन हा गांधींचा चरख्यामागील विचार: डॉ.सुनीलकुमार लवटे

 शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधींवरील दोन पुस्तकांचे प्रकाशन

 

शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधी सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे. मंचावर (डावीकडून) डॉ. दशरथ पारेकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. प्रकाश पवार

शिवाजी विद्यापीठात डॉ. दशरथ पारेकर अनुवादित 'गांधी: एक माणूस' या पुस्तकाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. यावेळी (डावीकडून) डॉ. पारेकर, डॉ. सुनीलकुमार लवटे आणि डॉ. प्रकाश पवार.

(गांधी अभ्यास केंद्र कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: महात्मा गांधी यांनी चरख्याच्या माध्यमातून नागरी समाजाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी आणि देशाच्या विकासासाठी गांधीजींनी अनेक प्रयोग केले. गतीशीलता आणि स्वावलंबन हा चरख्यामागचा खरा विचार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राद्वारे गांधी अभ्यास केंद्राचे रौप्यमहोत्सवी वर्ष महात्मा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त दि. २७ जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधी महात्मा गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आज 'चरखा' या विषयावर डॉ. लवटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्याचप्रमाणे डॉ.अभय बं लिखित 'आजचे शिक्षण आणि महात्मा गांधींचे उपाय' आणि डॉ. दशरथ पारेकर अनुवादित व संपादित गांधी: एक माणूस या पुस्तकांचे प्रकाशनही झाले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

डॉ.लवटे म्हणाले, गांधीजींनी चरखा हे आपल्या स्वराज्याचे साधन म्हणून स्वकारले. १९०८ साली गांधीजींनी चरख्याला विचारांचे केंद्र बनविले. त्यावेळी ते गांधीजी बॅरिस्टरीच्या अभ्यासासाठी लंडनमध्ये होते. चरख्याला गांधीनी शेतकऱ्यांचे साधन मानले. स्वतंत्र्यपूर्व काळात जिरायती शेती होत्या. केवळ सहा हिनेच शेतकऱ्यांना कामे असत. उर्वरित वेळेत शेतकऱ्यांना कामे मिळण्यासाठी मुलोद्योगाचा पर्याय गांधीजींनी चरख्याच्या माध्यमातून प्राप्त करून दिला. प्रत्येक गोष्टीला मूल्य असते हे गांधीजींना मान्य होते. भारतीय अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी बारा बलुतेदार आणि ठरा आलुतेदार यांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. बलुतेदार हे स्थिर व्यवसाय करीत आणि आलुतेदार फिरून व्यवसाय करीत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर खादी आणि मुलोद्योगाचा विकास व्हावा, असे गांधीजींना वाटत होते.  खेडयांचा विकास केल्याशिवाय भारताचा समृध्द विकास होणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. गांधी विचारांवर छोटे छोटे अभ्यासक्रम सुरू झाल्यास आजचा तरूण स्वावलंबी आणि उद्योजक बनेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

'गांधी एक माणूस' या पुस्तकाविषयी बोलताना डॉ. दशरथ पारेकर म्हणाले, 'मिस्टर गांधी: मॅन' या पुस्तकाचे भाषांतर जरी माझ्याकडून घडलेले असले तरी, हे पुस्तक गांधीजींच्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या १९०५ ते गांधी भारतात परत येईपर्यंत म्हणजे १९१५ सालापर्यंत त्यांच्यासोबत राहून त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या मिली ग्रॅहम पोलाक या तरूणीने लिहिलेले आहे. मिली पोलाक खूप हुशार आणि गांधीजींना थेट प्रश्न करणाऱ्या, स्पष्टवक्त्या होत्या. गांधीजी एक सामान्य माणूस म्हणून किंवा कुटुंबाचे सदस्य म्हणून कसे होते याचे वर्णन या पुस्तकात अतिशय वेगळ्या स्वरूपात आहे, ते अन्यत्र कोठेही आलेले नाही. पोलाक ही गांधीजींची पहिली चरित्रकर्ती आणि टीकाकारही आहे. गांधीजींबरोबर एकत्र कुटुंबामध्ये जवळ-जवळ दहा ते बारा वर्षांमध्ये त्या स्त्रीचा आणि तिच्या पतीचा कालावधी गेलेला आहे. गांधीजी त्यांना आपली लहान भावंडे मानत. त्यांचे पती ग्रॅहम पोलाक गांधीजींच्या इंडियन ओपिनि या वृत्तपत्रामध्ये मदत करीत होते. तेही वकील होते. व्यावसायिक वकीलीपेक्षा भारतीयांची वकीली त्यांनी केली. हे पुस्तक गांधींजी समजावून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

अध्यक्षीय मनोगता कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकास होण्यासाठी गांधी विचारांवरील पुस्तकांचे सातत्याने वाचन, चिंतन, मनन आणि चर्चा करणे आवश्यक आहे.

याप्रसंगी, डॉ.अभय बं लिखित 'आजचे शिक्षण आणि महात्मा गांधींचे उपाय' आणि डॉ.दशरथ पारेकर अनुवादि 'गांधी: एक माणूस' या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी प्रास्ताविक केले. मोसिम पठाण यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.सुखदेव उंदरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, नागेशकर, डॉ. श्रीराम पवार, डॉ. नंदा पारेकर यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.