![]() |
| शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित विशेष ग्रंथ प्रदर्शनाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. |
कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: विकसित भारताच्या
उभारणीमध्ये विज्ञानाची भूमिका महत्त्वाची राहणार असून वैज्ञानिक क्षेत्रातील
महिलांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने या क्षेत्रात आजपर्यंत
महिलांनी बजावलेल्या कार्याची माहिती होण्यासाठी त्याविषयीच्या पुस्तकांचे वाचन
अगत्याचे आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय
साळी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शिवाजी
विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे ‘विज्ञानातील महिला’ या विषयावरील विशेष
ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थितांशी संवाद
साधताना ते बोलत होते.
यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त केंद्र
सरकारने ‘विज्ञान क्षेत्रातील महिला: विकसित भारत
निर्मितीमध्ये योगदान’ ही मध्यवर्ती संकल्पना निश्चित केली आहे. त्या
अनुसरून विद्यापीठाच्या ग्रंथालयामधील निवडक, दुर्मिळ आणि महत्त्वाच्या
विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आज आयोजित करण्यात आले. डॉ. जयंत नारळीकर,
निरंजन घाटे, डॉ. बाळ फोंडके, अच्युत गोडबोले, माधव गाडगीळ, डॉ. ए.पी.जे. अब्दुल
कलाम, सुरेश कुमार जिन्दल, कॅप्टन एस. शेषाद्री अराधिका शर्मा, मीरा सिमसरकर इत्यादी
वैज्ञानिक, विज्ञान लेखरांची पुस्तके प्रदर्शनात मांडण्यात आली. यामध्ये वैज्ञानिक
संकल्पनांचे विश्लेषण करणारी, विज्ञान व वैज्ञानिकांचा
इतिहास, जीवनकार्य, चरित्रे व आत्मचरित्रे, माहितीपर अशी एकूण ११६ पुस्तके समाविष्ट
होती. शिवाजी विद्यापीठास सादर करण्यात आलेले महिला संशोधकांचे शोधप्रबंध तसेच
महिला वैज्ञानिकांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचे स्वतंत्र दालनही होते. या
प्रदर्शनाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर
शिंदे, ज्ञानस्रोत केंद्र संचालक डॉ. धनंजय सुतार, ग्रंथालय व माहितीशास्त्र
अधिविभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, उपग्रंथपाल डॉ. प्रकाश बिलावर, सहाय्यक
ग्रंथपाल डॉ. शिवराज थोरात, डॉ. राजेंद्र खामकर यांच्यासह ग्रंथालयीन कर्मचारी आणि
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.jpeg)

No comments:
Post a Comment