(बुधवार, दि. १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि त्या निमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने विशेष लेख...)
आपण जागतिक इतिहासाची पाने उलगडून पाहिली तर आपल्याला
हे स्पष्टपणे जाणवेल की युवक हेच इतिहासाच्या केंद्रस्थानी आहेत. इतिहासातील लढाया,
योद्ध्यांचे पराक्रम, संघर्ष, स्वातंत्र्यपूर्व काळात झालेले उठाव या सर्वांमध्ये युवकांची भूमिका अग्रेसर
आहे. मग युवकच का इतिहास घडवू शकतात? युवकांना
असे कोणते स्वातंत्र्य आहे? युवकांकडे अशी कोणती शक्ती आहे?
असे प्रश्न जेव्हा एखाद्या व्यक्तीला पडतात, तेव्हा त्यांना स्वामी विवेकानंद यांच्या
‘युवक कसा असावा?‘ यातील प्रत्येक शब्दामधून
या प्रश्नांची उत्तरे मिळतात. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त
१२ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा
केला जातो. हा दिवस भारतातील अशा युवकांसाठी आहे, जे युवक देशाला
समृद्ध आणि प्रगतशील बनवण्यासाठी प्रयत्नशील असतात. राष्ट्रीय
युवा दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांच्या अनमोल विचारातून आजच्या युवकांनी
कोणती मूल्ये आत्मसात केली पाहिजेत, हे जाणून घेऊ या.
नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा जीवनप्रवास निश्चितच
संपूर्ण विश्वासाठी प्रेरणादायी आहे. कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ साली जन्मलेल्या नरेंद्रचे-
शिकागो येथे ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या धर्म परिषदेमधील “ अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो...“ या उद्गारांसाठी
- स्वामी विवेकानंद म्हणून झालेल्या प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटापर्यंतचे जीवन ही एक
तपस्याच आहे. स्वामी विवेकानंद हे बुद्धिमान तर होतेच परंतु प्रत्येक
गोष्ट अनुभवाच्या पातळीवर कसून बघण्याची त्यांची सवय होती. बालपणी
नरेंद्रच्या मनात असंख्य प्रश्नांचे वादळ उठलेले असायचे आणि हे वादळ तेव्हा शमले, जेव्हा
त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. गुरु आणि शिष्याच्या
ज्ञानमय नात्याचा आणि स्वामी विवेकानंदांच्या आत्मसाक्षात्काराच्या प्रवासाला येथूनच
सुरुवात झाली. स्वामी विवेकानंदांना हे माहित होते कि सभोवतालची
परिस्थिती बदलायचे सामर्थ्य युवकांमध्येच आहे. म्हणूनच त्यांनी
तरुणांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर
देशसेवा आणि धर्मजागृती अशा कार्यांमध्ये युवकांना सहभागी करून
घेतले. समाजातील आजच्या युवकांची परिस्थिती पाहता त्यांनी स्वामी
विवेकानंदांच्या विचारांचा आणि त्यांच्या जीवन चरित्राचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवणे गरजेचे
आहे.
मोबाईलच्या दुनियेत अडकलेला आजचा युवक, ज्याला सोशल मिडिया आणि
त्यातून मिळणारी प्रसिद्धी, झगमगाटी जीवनशैली या पलीकडचे जीवन दिसत नाही. आजच्या युवकांकडे बौद्धिक क्षमता प्रचंड आहे; पण त्या
क्षमतेला योग्य दिशा देताना युवक दिसत नाहीत. त्यांच्या सभोवताली
निर्माण झालेले कृत्रिम जग हेच त्यांच्या जीवनाचे अस्तित्व आहे, अशी धारणा आजच्या युवकांची बनली आहे. आजच्या युवकांना
समाजात घडणाऱ्या भीषण घटना आणि स्वामी विवेकानंदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करायला
हवा, म्हणूनच युवक दिनाच्या निमित्ताने स्वामी विवेकानंदांचे काही विचार आत्मसात करू
या.
●
स्वामी विवेकानंद युवकांना म्हणतात, “उठा, जागे
व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका,“ म्हणजेच आजच्या काळाचा विचार करायला गेलो तर युवकांनी सर्वप्रथम ध्येय निश्चित
केले पाहिजे. ते ध्येय स्थिर असायला हवे, तरच युवक योग्य दिशेने
प्रवास करू शकतील. ध्येयप्राप्तीच्या प्रवासामध्ये असंख्य बाधा
येतील, म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात, ते पूर्ण होईपर्यंत
थांबू नका. आजच्या मन भरकटवणाऱ्या जगात हा विचार सर्वात मौल्यवान
आहे. कारण एक उचित ध्येयच त्या व्यक्तीला महान बनवू शकते.
●
आजच्या युवकाला एकाच वेळी सर्व गोष्टी करायच्या आहेत. आजच त्याला
यशस्वी व्हायचे आहे. त्याला एकाचवेळी क्रिकेटर बनायचे आहे,
अभिनेता बनायचे आहे, अधिकारी बनायचे आहे आणि असे
बरेच काही करायचे आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याला करायच्या आहेत
पण होत तर काहीच नाहीत, अशी परिस्थिती आहे. यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात, “एका वेळी एक गोष्ट
करा आणि ती करत असताना इतर गोष्टी वगळून आपले सर्व अस्तित्त्व
त्या गोष्टीत ओतून द्या,“ असे केले तरच आपण यशस्वी होऊ शकतो.
●
स्वामी विवेकानंद म्हणतात, "प्रत्येक काम या टप्प्यांतून जावे लागते- उपहास,
विरोध आणि नंतर स्विकृती. जे लोक आपल्या वेळेच्या पुढचा विचार करतात
त्यांच्याबद्दल असा गैरसमज होणे निश्चित आहे." जेव्हा आजच्या
घडीला आपण एखादे नवीन कार्य, नवीन ध्येय निश्चित करून त्या दिशेने
वाटचाल करू लागतो, त्यावेळी समाजातील काही लोकांकडून आपली चेष्टा केली जाते,
तर काही लोक आपल्या ध्येयाला आणि नियोजित कार्यालाच विरोध करू लागतात.
त्या क्षणी खचून न जाता आपले ध्येय आणि कार्यात खंड पडू न देता ते करत राहणे हाच एक
मार्ग आहे. कारण ज्यावेळी या ध्येयाची प्राप्ती होईल त्यावेळी
हा समाज त्याचा स्वीकार केल्याखेरीज राहात नाही.
●
आजकालची सर्वात महत्त्वाची समस्या जी आजच्या युवकांमध्ये निदर्शनास आली
आहे, ती म्हणजे युवकांमध्ये असणारा आत्मविश्वासाचा अभाव. आजचे
युवक इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखतात. स्वतःची इतरांशी तुलना करतात. त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याच्या
मान्यतेची वाट पाहतात. यासंदर्भात स्वामी विवेकानंद म्हणतात,
"तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बल
समजाल तर तुम्ही दुर्बल
बनाल आणि तुम्ही स्वतःला सामर्थ्यवान समजाल, तर तुम्ही सामर्थ्यशाली बनाल."
त्यामुळे आजच्या युवकांनी विचार करण्याची पद्धत बदलायला हवी,
सकारात्मकतेने विचार करायला हवा. त्यासाठी ते म्हणतात,
"स्वतंत्र होण्याचे धाडस करा. जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत,
तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा आणि तुमच्या रोजच्या जगण्यातही ते आणण्याचे धाडस करा,"
या विचारामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळू शकते.
●
आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येक युवक व्यस्त आहे, त्यांना स्वतःसाठी
वेळ नाही आणि तो स्वतःसाठी वेळ काढण्याचा प्रयत्नही करत नाहीत. स्वतःला मनोरंजनाच्या
साधनांमध्ये गुंतवून ठेवण्यात युवक आनंद वाटून घेतो आहे; पण स्वतःच्या
आध्यात्मिक प्रगतीसाठी आजच्या युवकांना वेळ नाही. त्यासाठी स्वामी विवेकानंद म्हणतात
"दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला. अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट
व्यक्तीला हरवून बसाल." म्हणून आजच्या युवकांनी स्वतःला
वेळ देणे आणि स्वतःच्या समस्यांचे स्वतः निराकरण करणे आवश्यक आहे. विवेकानंद म्हणतात, "तारुण्याचा जोम अंगी आहे तोवरच
कोणतीही गोष्ट शक्य होईल आणि त्या कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे."
त्याचबरोबर ते असेही म्हणतात, " एखाद्या दिवशी
जेव्हा आपल्याला कोणतीही समस्या उद्भवत नाही, त्यावेळी आपण चुकीच्या मार्गावर जात आहोत
याची खात्री असू द्या." ते युवकांना संदेश देतात की, "तुम्ही जोखीम उचलण्याचे भय बाळगू नका. जर जिंकलात तर तुम्ही नेतृत्व कराल आणि
जर हरलात तर तुम्ही इतरांना मार्गदर्शन करू शकाल."
स्वामी विवेकानंदांचा एखादा जरी विचार स्वीकारून त्या दिशेने वाटचाल करण्याचा
प्रयत्न करणारा युवक नक्कीच यशस्वी होऊ शकेल. समाजातील सध्याची परिस्थिती पाहता स्वामी विवेकानंदांसारख्या
महान विचाराच्या युवकांची देशाला फार गरज आहे. चेहऱ्यावर तेज
आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह
आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे असे युवकच देशाचे भवितव्य उज्ज्वल
आणि सुरक्षित करू शकतात. कारण बदल घडवण्याचे काम हे युवा पिढीच
करू शकते.
-
पवन पाटील
(लेखक शिवाजी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन अधिविभागाचे विद्यार्थी आहेत.)