Thursday 14 September 2023

कला-संस्कृतीचा वारसा तरुणांनी वृद्धिंगत करावा: कुलगुरू डॉ. शिर्के

विविध युवा महोत्सवांत सहभागी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ

आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात लोकवाद्यवृंद सादरीकरण करणारा शिवाजी विद्यापीठाचा संघ.

युवा महोेत्सवांत सहभागी विद्यार्थ्यांच्या गुणगौैरव समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. प्रकाश गायकवाड, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. प्रकाश गायकवाड, डॉ. शरद बनसोडे, डॉ. तानाजी चौगुले यांच्यासमवेत विविध युवा महोत्सवांमध्ये शिवाजी विद्यापीठाचे यशस्वी प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी.



कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: भारतीय कला, संस्कृतीचा वारसा वृद्धिंगत करणे ही तरुणांची जबाबदारी आहे. त्या दृष्टीने युवा पिढीने कार्यरत राहावे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सन २०२२-२३मध्ये राष्ट्रीय कव्वाली स्पर्धा, इंद्रधनुष्य युवा महोत्सव, पश्चिम विभागीय युवा महोत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव आणि आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव आदींमध्ये पदकांसह यश प्राप्त केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गौरव समारंभ आज सकाळी राजर्षी शाहू सभागृहात झाला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विविध युवा महोत्सवांमध्ये आपले वर्चस्व सातत्याने टिकवून ठेवले आहे. प्रचंड आत्मविश्वास आणि उर्जेसह मंचावर सादरीकरण करून आपले विद्यार्थी विद्यापीठाचा लौकिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत उंचावित आले आहेत. त्यांनी आपल्या कला, संस्कृतीचा वारसा असाच वृद्धिंगत करीत राहण्यासाठी प्रयत्नरत राहणे आवश्यक आहे. विद्यापीठात विविध प्रकारच्या वाद्यांच्या सादरीकरणाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस असून त्यासाठी सर्व युवा वर्गाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवावयाची असली तरी आपले लक्ष्य इतके उंच ठेवावे की त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला पाहिजे. अशा संघर्षातून प्राप्त केलेल्या यशाचे मोल फार मोठे असते.

कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, माणसाला आयुष्य उत्तम जगण्यासाठी जिविका आणि उपजिविका या दोन बाबींची गरज असते. अन्नातून आपली उपजिविका भागते. पण, कलेसारख्या माध्यमातूनच आपली जिविका चालते. आयुष्य सुंदर बनते. त्यामुळे कलेला आपल्या आयुष्यातून कधीही वर्ज्य न करता तिची असोशीने जपणूक करा. चांगले आयुष्य जगल्याचे समाधान ती आपल्याला मिळवून देईल.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. यामध्ये १८व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ सांस्कृतिक इंद्रधनुष्य युवा महोत्सवामध्ये २१ स्पर्धांत सहभागी होऊन ६ सुवर्ण, ४६ रौप्य आणि ३ कांस्य पदके, ३६व्या पश्चिम विभागीय युवा महोत्सवात १० सुवर्ण व १६ कांस्य, ३६व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात ४५ सुवर्ण व १० कांस्य पदके प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालेल्या २३ विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या संघाचा समावेश होता. संघ व्यवस्थापक शीला मोहिते, भाग्यश्री कालेकर, तुकाराम शिंदे, संगीता पाटील, डॉ. एस.ए. महात, सुरेश मोरे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आंतरराष्ट्रीय युवा महोत्सवात सादरीकरण करणाऱ्या संघांनी लोकवाद्यवृंद, नकला आणि राग यमन कल्याणवर आधारित गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. तुकाराम शिंदे यांनी आभार मानले. यावेळी क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment