Thursday 14 September 2023

प्रामाणिक कष्ट व सेवेप्रती भक्ती हीच यशाची गुरूकिल्ली: रघुनाथ मेडगे

  

शिवाजी विद्यापीठात मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना  (डावीकडून) डॉ. उमेश गडेकर, डॉ. महादेव देशमुख, श्री. मेडगे आणि डॉ. नितीन माळी.


शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे

समोर उपस्थित श्रोते

कोल्हापूर, दि. १४ सप्टेंबर: आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिक कष्ट आणि मनात सेवेप्रती भक्ती असणे नितांत आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष रघुनाथ मेडगे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंटमार्फत आयोजित इंडक्शन प्रोग्रॅममध्ये प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख अध्यक्षस्थानी होते. विभागाचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. उमेश गडेकर मंचावर उपस्थित होते.

श्री. मेडगे म्हणाले, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी ध्येयनिश्चिती करावी लागते. निर्धारित ध्येय प्राप्तीसाठी  सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. क्षेत्र कोणतेही असो, यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणास कष्ट आणि मनामध्ये सेवेप्रती भक्ती हेच खरे कौशल्य आवश्यक असते. मुंबई डबेवाला संघटनेमध्ये सुमारे पाच हजार सदस्य, ८०० मुकादम आणि ९ संचालक  आहेत. त्यांचे सरासरी माध्यमिक शिक्षण झालेले आहे. संघटना कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान वापरत नाही. तसेच दैनंदिन कार्यात प्रदूषणविरहित साधनांचा वापर केला जातो. मनुष्यबळाचे योग्य नियोजन, कामातील समन्वय आणि सदस्यांचा प्रामाणिक सहभाग यांच्या आधारे दररोज सुमारे चार लाख जेवणाच्या डब्यांची निर्धारित वेळेमध्ये देवाणघेवाण केली जाते. त्यामुळे संघटनेवर विश्वास ठेवणारे ग्राहक पूर्णपणे संतुष्ट व समाधानी आहेत. म्हणूनच मुंबई डबेवाला संघटनेच्या कार्यपद्धतीवर जगभरातील विविध नामवंत संस्थांनी संशोधन केले आहे, तर विविध माध्यमांनी माहितीपट बनविले आहेत. संघटनेला सर्वोच्च अशा ‘सिक्स सिग्मा’ पुरस्काराने गौरविले असल्याचेही श्री. मेडगे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मुंबई डबेवाला संघटनेचा इतिहास, कार्यपद्धती व संघटन रचना याबाबत माहिती दिली आणि विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. देशमुख यांनी कौशल्य आणि रोजगाराच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जागतिक क्रमवारीतील भारताचे स्थान, भारत सरकारच्या कौशल्य आधारित योजना आणि नवसंशोधन व नाविन्यता याबाबत सविस्तर मांडणी केली. तत्पूर्वी त्यांनी विद्यापीठाच्या कार्याचा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारी कौशल्ये आणि नवीन शैक्षणिक धोरण याबाबत माहिती दिली.

डॉ. नितीन माळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गडेकर यांनी आभार मानले. डॉ. तेजश्री मोहरेकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यापीठाच्या विविध अधिविभागांतील विद्यार्थी, संशोधक, शिक्षकांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment