Wednesday, 10 September 2025

कॉ.शरद पाटील यांच्याकडून भारतीय सामाजिक रचनेचे नवे प्रमाणशास्त्र विकसित: सरोज पाटील

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. सरोज पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. नेहा वाडेकर, प्रा. प्रतिमा परदेशी आणि डॉ. भारती पाटील

शिवाजी विद्यापीठात आयोजित चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात बोलताना डॉ. सरोज पाटील. मंचावर डॉ. भारती पाटील.


कोल्हापूर, दि. १० सप्टेंबर : भारतीय सामाजिक रचनेचे यथायोग्य आकलन करून घेण्यासाठी कॉ.शरद पाटील यांनी नवे प्रमाणशास्त्र विकसित केले. प्रमाणशास्त्र म्हणजे ज्ञान मिळविण्याच्या साधनांचे शास्त्र,  असे प्रतिपादन महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सरोज पाटील (माई) यांची आज येथे केले.

      कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन आणि सत्यशोधक प्रबोधन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 'प्राच्यविद्यापंडित कॉ.शरद पाटील यांचे स्त्रीदास्य व जातीदास्य विषयक चर्चाविश्व' या विषयावर चर्चासत्राचे आयोजित विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये करण्यात आले होते.  चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी सरोज पाटील (माई) बोलत होत्या. 

      सरोज पाटील (माई) म्हणाल्या, प्राच्यविद्यापंडित आणि कृतीशील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ख्याती असलेले कॉ.शरद पाटील कम्युनिस्ट चळवळीत सक्रीय होवून आदिवासी, शेतमजूर यांच्याकरिता विविध लढे उभारले. परिणामी देशाच्या सामाजिक आंदोलनांना विशिष्ट आकार प्राप्त झाला. 

त्या पुढे म्हणाल्या, आजच्या काळात, विद्यार्थ्यांप्रती शिक्षक नेहमी संवेदनशील असले पाहिजे. प्रत्येक मूल गुणवत्तेचे आणि बुध्दीमत्तेचे लेणे घेवून जन्माला येत असते, हे शिक्षकांनी ओळखून पैलू पाडण्याचे काम केले पाहिजेझोपडपट्टीमध्ये राहणारी मुले शिक्षणामुळे आज लघुउद्योजक आणि आमदार झालेली आहेत. आईच्या कडकपणामुळे आम्हाला चांगली शिस्त लागली.  त्यामुळे पुढील आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगी आम्ही कोठेही सैरभैर झालो नाही. प्रत्येक भाऊ आपल्या क्षेत्रामध्ये कर्तबगार झाले आणि त्यांच्या शिस्तीमुळे, वागणुकीमुळे आज चार पद्मश्री घरात आहेत.  शंभर वर्षांपूर्वी आईच्या कामांची लोकांनी निर्भर्त्सना केली. परंतु, वडीलांच्या भक्कम पाठींब्यामुळे आईची पुढील वाटचाल झाली, असेही त्यांनी सांगितले. 

सत्यशोधक प्रबोधन ट्रस्ट, पुणे येथील प्रा.प्रतिमा परदेशी म्हणाल्या, महाराष्ट्राच्या साहित्य व संस्कृतीच्या चळवळीमध्ये कॉ.शरद पाटील यांचे योगदान महत्वाचे आहे.  त्यांनी इतिहास, संस्कृती, समाजकारण व अर्थशास्त्र या क्षेत्रात लेखन केले.  विचार हे जेव्हा जनमानसामध्ये पकड घेतात तेव्हा समाजामध्ये जागृती निर्माण होते. 

शारदाबाई पवार अध्यासनाच्या समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.उर्मिला दशवंत यांनी केले तर डॉ.नेहा वाडेकर यांनी आभार मानले.  कार्यक्रमास प्राचार्य टी.एस.पाटील, गौतमीपुत्र कांबळे, डॉ.निर्मला जाधव, सचिन गरूड, किशोर धमाले, डॉ.रणधीर शिंदे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment