Friday 20 October 2023

शिवाजी विद्यापीठात अमृत कलश संकलन समारोह

 






 

कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: मेरी माटी, मेरा देश या उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील ३३ तालुक्यांतून संकलित मातीचे ५० अमृत कलश आज विद्यापीठामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्विकारले.

मिट्टी को नमन आणि विरों को वंदना या भारत सरकारच्या उपक्रमाचा भाग म्हणून देशभरात हा उपक्रम साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यांपासून राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 'सेल्फी विथ मिट्टी तसेच प्रत्येक गावातून माती संकलन करून त्यांचे कलश जमा करण्यात येत आहेत. जमा झालेल्या मातीमधून थोडी माती संबंधित महाविद्यालयाच्या रोपवाटिकेमध्ये मिसळून थोडी माती अमृत कलशाद्वारे संबंधित विद्यापीठात संकलित करावयाची होती. सदर संकलित मातीचे अमृत कलश दिल्ली येथे पाठवून तेथे तयार होणाऱ्या अमृत वाटीकेमध्ये ही देशभरातून आलेली माती मिसळली जाणार आहे.

आज कुलगुरू डॉ. शिर्के यांनी तीन जिल्ह्यांमधून आलेले कलश स्विकारले आणि या उपक्रमाद्वारे युवा पिढीमध्ये देशप्रेमाचा संदेश प्रसारित होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. संकलित कलशांची सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कलश यात्रा काढण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक तसेच विद्यापीठातील प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment