Saturday 21 October 2023

जागतिक अन्न दिनानिमित्त विद्यापीठाची ‘पाण्यासाठी चाला’ रॅली

जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या विशेष रॅलीचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे. सोबत वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील व अन्य सहभागी शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी.
 
जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष रॅलीत सहभागी झालेले कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. पी.डी. पाटील व अन्य सहभागी शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थिनी.


जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष रॅलीत 'पाणी हे जीवन, पाणी हे भोजन' या मध्यवर्ती विषयावर पथनाट्य सादर करताना अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी.

जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित विशेष रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी सहभागी विद्यार्थी-विद्यार्थिनींसमवेत संवाद साधताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.

(शिवाजी विद्यापीठाच्या जागतिक अन्न दिन रॅलीचा संपादित व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. २१ ऑक्टोबर: भावी पिढ्यांसाठी पाण्याचे संवर्धन करण्याबरोबरच अन्नाची नासाडी रोखणे ही जबाबदारी आजच्या युवा पिढीवर आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आज जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने वॉक फॉर वॉटर (पाण्यासाठी चाला) ही विशेष जनजागरण रॅली काढण्यात आली. तिच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू बोलत होते.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठापासून राजारामपुरीतील माऊलीच्या पुतळ्यापर्यंत आणि परत अशी रॅली काढण्यात आली. यंदा 'पाणी हे जीवन, पाणी हे भोजन' असा विषय असल्याने त्या अनुषंगाने प्रबोधन करणारे फलक रॅलीत होते. पाणी वाचवा-जीवन वाचवा, पाणी वाचवा-पृथ्वी वाचवा असे पाणीबचतीचे संदेश देणारे फलक घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले. 'पाणी हे जीवन, पाणी हे भोजन' याच विषयावर शिवाजी विद्यापीठ परिसर, माऊली पुतळा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पथनाट्ये सादर केली.

यावेळी रॅलीत कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह कुलसचिव डॉ. शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.डी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, डॉ. इराण्णा उडचण, डॉ. अमोल कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले. डॉ. अभिजीत गाताडे, हर्षवर्धन कांबळे आणि स्नेहल खांडेकर यांनी रॅलीचे यशस्वी संयोजन केले.


पथनाट्यातून जलसंवर्धनाचा संदेश

यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी जलबचत व संवर्धनाचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले. या पथनाट्याचे व त्यातील गीतांचे डॉ. अभिजीत गाताडे यांनी लेखन व दिग्दर्शन केले. यामध्ये सिमरन कदम, श्रेयश पाटील, रेवती भोसले, प्रज्ञा कांबळे, सुप्रिया निकम, यश पाटील, साक्षी गंगवाणी, ओंकार म्हेत्रे, ऋतुजा पाटील, वरद रायबागे, वैष्णवी बिवाल, राधा शिंदे, साक्षी कदम, अनुष्का जाधव, वरदा पटवर्धन, ज्योती गुरव, आदिती मगर, दिगंबर मगदूम, ऋषीकेश म्हमाने, निशा लटके, शालिक राठोड आणि शिवानी गजबर यांनी भूमिका केल्या. विभागाच्या विद्यार्थ्यांनीच गीतगायन केले.


No comments:

Post a Comment