Saturday 19 August 2017

कठोर परीश्रमासह ध्येयवेडे व्हा - डॉ.तुषार जाधव


कोल्हापूर, दि.18 ऑगस्ट - स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी कठोर परीक्षम घेतले पाहिजेच. त्याचबरोबर, ध्येयवेडेही झाले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र शासन जळगांव येथील सहाय्यक गट विकास अधिकारी डॉ.तुषार जाधव यांनी आज येथे केले.  

या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ.तुषार जाधव
शिवाजी विद्यापीठातील सेवा पूर्व परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे 2017-18 कालावधीच्या प्रशिक्षण वर्गाच्या उद्धाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.जाधव बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कार्यक्रम झाला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षस्थानी होते.
         डॉ. जाधव म्हणाले, स्पर्धा परीक्षांबद्दल मनामध्ये असलेली भिती प्रथमत: विद्यार्थ्यांनी काढून टाकावी. स्वत:चा आत्मविश्वास वाढवावा, कोणताही न्यूनगंड बाळगू नये. सखोल वाचन आणि त्यावरील मुद्दे यांची टिपण ठेवावी. अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नपत्रिकांचा सातत्याने अभ्यास करावा. दिवसातून कमीत कमी सहा तास अभ्यास करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे. विद्यार्थ्यांनी स्वत:मधील कमतरता ओळखून पुढे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा, कणखरवृत्ती, हाजरजावाबीवृत्ती जोपासली पाहिजे.
डॉ.तुषार जाधव
ते पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरताना काळजीपूर्वक भरावा. त्यावर आधारित प्रश्न विचारले जावू शकतात. विद्यार्थ्यांनी सखोल वाचन, चिंतन, मनन यामध्ये सातत्य ठेवावे. विविध वर्तमानपत्रांमधील लेख वाचावेत. समाजकार्य करण्याची प्रचंड इच्छाशक्ती बाळगून तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्याची तळमळ असली पाहिजे.एमपीएससीच्या दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी आता युपीएससीच्या धर्तीवर सुरु करणारे महाराष्ट्र राज्य हे एकमेव आहे.
         डॉ.जाधव यांनी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत तंत्र याबद्दल सखोल मार्गदशन केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
        प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षीय भाषणात म्हणाले, डॉ.जाधव यांचे संपूर्ण कुटुंबीय समाजास प्रेरणा देणारे आहेत. आज, समाजामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्पर्धा आहे. एमपीएससी आणि युपीएससी हया स्पर्धा परीक्षांमधील राजमार्ग आहेत.  या स्पर्धेच्या जगात भक्कमपणे उभे रहावयाचे असेल तर कठोर परीश्रमाशिवाय पर्याय नाही.
यावेळी डॉ.तुषार जाधव यांच्या भगिनी दिप्ती जाधव, तृप्ती जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय केंद्राचे समन्वयक डॉ.जगन कराडे यांनी केले.  स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
डॉ.तुषार जाधव यांच्या मातोश्री सौ.कमल जावध हया अतिरिक्त पोलीस अधिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांचे वडील प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सर्व भगिनी उच्च विद्याविभूषित असून उच्चपदस्थ आहेत. डॉ.जाधव यांचे मामा आणि मावशी वरिष्ठ अधिकारी आहेत. या कुटुंबातील चारही भावंडे एकाच वेळेस सेट, नेट आणि एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. तसेच, डॉ.तुषार जाधव हे दोन वेळेस युपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

                                                  ------

No comments:

Post a Comment