Tuesday 19 January 2021

मराठीचे विद्यार्थी भाषेच्या निरंतर सेवेत राहावेत

- कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांची अपेक्षा

 

'मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी' व 'दृष्टांतपाठ: निवडक दृष्टांत' या क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत (डावीकडून) डॉ. गोपाळ गावडे, प्रा. नानासाहेब जामदार, प्राचार्य प्रकाश कुंभार, डॉ. अरुण शिंदे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. कोमल कुंदप.


कोल्हापूर, दि. १९ जानेवारी: मराठी शिकणारे सारे विद्यार्थी या भाषेच्या निरंतर सेवेत राहतील, याची दक्षता सर्वांगाने घेतली जाईल, तेव्हाच मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन होईल, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात येत असलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी आणि दृष्टांतपाठ: निवडक दृष्टांत या बी.ए. भाग-३च्या दोन क्रमिक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थी ज्या विषयाचे शिक्षण घेतो आहे, त्याला ज्या क्षेत्रात काम करावयाचे आहे, त्या क्षेत्रातील संधींची माहिती त्याला दिली जावी, अशी अपेक्षा नव्या शैक्षणिक धोरणात व्यक्त करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने अर्थार्जनाच्या संधींविषयीचे क्रमिक पुस्तकच विद्यार्थ्यांना सादर करून या अपेक्षेची पूर्तता केली आहे, ही महत्त्वाची बाब आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने सोमवारी मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली, तर आज शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी संपादित केलेल्या पुस्तकांचे प्रकाशन होते आहे, ही बाबही नोंद घेण्यासारखी आहे. या पुस्तकासाठी संबंधित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिक, माहीतगार लोकांना लिहीते केले आहे, हे निश्चितच वेगळेपण आहे. त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे लाभ होईल.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, अभ्यासक्रमाचे रुपांतर एका दर्जेदार क्रमिक पुस्तकात करण्याचे काम मराठी अभ्यास मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांपर्यंत सर्वंकष ज्ञान पोहोचविण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. विषयाची गोडी निर्माण होण्याबरोबरच विद्यार्थ्यांत रोजगाराभिमुखता निर्माण करण्यासाठी अभ्यास मंडळाचा पुस्तकरुपी उपक्रम महत्त्वाचा आहे. प्रत्येक अधिविभागाने अशा प्रकारचा  विस्तार उपक्रम हाती घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी संपादक डॉ. दत्ता पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संपादक डॉ. अरुण शिंदे, अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी पुस्तकांविषयी मनोगत व्यक्त केले. कुलगुरू व प्र-कुलगुरूंच्या हस्ते घटक लेखक डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. ए.एम. गुरव, प्रा. नानासाहेब जामदार, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. कोमल कुंदप, योगीराज बच्चे यांचा ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन अभ्यास मंडळाच्या उपकुलसचिव संध्या अडसुळे आणि विभागातील सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमास डॉ. शहाजी पाटील, डॉ. सुभाष जाधव, डॉ. गोपाळ गावडे, डॉ. संदीप कंदले, प्राचार्य डॉ. प्रकाश कुंभार, डॉ. नितीश सावंत, डॉ. नामदेव मोरे, डॉ. सर्जेराव जाधव, डॉ. एकनाथ पाटील, लेखक संपत मोरे आदी उपस्थित होते. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment