Thursday 28 January 2021

कवितेनं जगणं समृद्ध व्हावं: राजन गवस

 

शिवाजी विद्यापीठात ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते पंडित आवळीकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. गवस, सुप्रिया आवारे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, दिनकर मनवर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, नामदेव कोळी, गणेश वसईकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. प्रकाश पवार.

पंडित आवळीकर पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना डॉ. राजन गवस

पंडित आवळीकर पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना डॉ. राजन गवस. सोबत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना पंडित आवळीकर काव्य पुरस्कार प्रदान

कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: कविता म्हणजे अक्षरांतून वाहणारे वारेच जणू. त्या वाऱ्याची एखादी झुळूक आपल्याही आत खोलवर पसरावी, रुजावी आणि त्या झुळुकेनं अवघं जगणं समृद्ध होऊन जायला हवं, असा तिचा परिणाम साधला जावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के तर प्रमुख उपस्थितीत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील होते.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप समारंभ आणि पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण असा संयुक्त समारंभ आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झाला.

शिवाजी विद्यापीठाने मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक पंडित आवळीकर यांच्या नावे पंडित आवळीकर काव्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आवळीकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीमधून सदर पुरस्कार दोन वर्षातून एकदा देण्यात येतो. सन २०१४ ते २०२० या कालावधीतील एकूण चार काव्यसंग्रहांना एकाच वेळी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन २०१४-१५साठी गणेश आत्माराम वसईकर (मधल्या मध्ये), सन २०१६-१७ साठी दिनकर मनवर (अजूनही बरंच काही), सन २०१८-१९साठी सुप्रिया आवारे (न बांधल्या जाणाऱ्या घरात) आणि सन २०२०साठी नामदेव कोळी (काळोखाच्या कविता) यांना आज डॉ. राजन गवस यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि शिवाजी विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर (बांदा) आणि प्रा. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले.

यावेळी बोलताना डॉ. गवस म्हणाले, पंडित आवळीकर हे समीक्षक म्हणून नावाजलेले, पण ते मूळचे कवी होते. कवितेवर त्यांचे मनापासून प्रेम होते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्या नावे पुरस्कार देण्याला वेगळा अर्थ आहे. आपले रोजचे जीवन गद्यप्राय जगण्याच्या नादात अगदी दगड बनून गेलेले असत्. मात्र कवितेसाठी द्रव मानसिकता फार महत्त्वाची असते. उत्तम कविता झरण्यासाठी कवींमध्ये ही द्रव मानसिकता असणे फार आवश्यक असते. संवेदनशीलता जागृत राखण्याचे काम ती करीत असते. ती जपणे अत्यंत गरजेचे असते.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कवीचं अंतर्मन आणि त्याच्या कवितेचे भावविश्व यांच्यात डोकावणे ही अवघड बाब असते. काव्यनिर्मितीतून सामाजिक जाणिवांच्या प्रेरणा जागृत राखण्याचे काम कवी करीत असतात. मराठी अधिविभागाने मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने या पुरस्कारांसह अन्य राबविलेले उपक्रम हे अत्यंत सर्जनशील व म्हणून कौतुकास्पद आहेत. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक संवेदना जागवण्याचे काम या उपक्रमांनी केले आहे.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, कोणाही व्यक्तीने साहित्याच्या कोणत्याही परिभाषेद्वारे अभिव्यक्त होणे आवश्यक असते. मराठी विभागाने गेल्या १५ दिवसांत राबविलेले उपक्रम त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरले. यापुढील काळातही त्यांनी भाषा संवर्धनाचे असे उपक्रम राबवावेत.

यावेळी कवी गणेश वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे आणि नामदेव कोळी यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला व आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, राज्यशास्त्र अधिविभागाचे डॉ. प्रकाश पवार, डॉ. पंकज पवार, कवी खलील मोमीन, वर्जेश सोळंकी, महेश लीला पंडित, बळवंत जेऊरकर यांच्यासह पंडित आवळीकर यांचे कुटुंबिय, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment