Tuesday 22 February 2022

परीघाबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंतही विज्ञानसंधी पोहोचाव्यात: डॉ. श्याम कोहली

शिवाजी विद्यापीठात आयोजित विज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात बोलताना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात बोलताना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. आर.जी. सोनकवडे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, श्री. किरण ठाकूर, डॉ. आर.के. कामत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात बोलताना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली.

 


शिवाजी विद्यापीठात विज्ञान सप्ताहाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. २२ फेब्रुवारी: केंद्र सरकारने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणासाठी स्तुती हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठीय परीघाबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील संधींची माहिती पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली यांनी आज येथे व्यक्त केली.

आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून डीएसटी-स्तुती कार्यक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठात दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान जागृती सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुमे म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि तरुण भारत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठातील एसएआयएफ- डीएसटी केंद्राच्या वतीने हा उपक्रम आयोजिला आहे.

डॉ. कोहली म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, वैज्ञानिक संशोधन विकासाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यासाठी देशभरातील १३ केंद्रांची (हब) निवड करून तेथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. डीएसटीकडून विविध योजना विद्यापीठांना प्रदान करण्यात येतात. त्यापैकी डीएसटी-फिस्टअंतर्गत शिवाजी विद्यापीठात सहा प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे डीएसटी-पर्स, डीएसटी-सैफ, डीएसटी-साथी, डीएसटी-सर्ब यांसह रामानुजन फेलोशीप आदी बाराहून अधिक उपक्रम व प्रकल्प येथे सुरू आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. त्याअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या साधनसुविधांचा लाभ विद्यापीठाने संशोधक विद्यार्थ्यांना करून देण्याबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठीही प्रयत्न करणे अभिप्रेत आहे.

यावेळी ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर म्हणाले, स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांच्या कालखंडात विज्ञान क्षेत्रात आपली किती प्रगती झाली, याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा हा केंद्र सरकारचा उपक्रम महत्त्वाचा आहे. भारताची क्षमता अफाट आहे, मात्र, त्यासाठी योग्य वेळी योग्य संधींची निर्मिती होणे आणि त्यांचा लाभ घेणेही महत्त्वाचे आहे. जगात शांतता नांदावयाची झाल्यास शांतीप्रिय भारताने महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे तरुणांनी शास्त्रज्ञ होण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याप्रमाणे भारावून जाऊनच काम करण्याची गरज आहे. तसेच, या देशातील प्रत्येक व्यक्तीने आपण आहोत, त्या ठिकाणी राहून प्रामाणिकपणे देशसेवेत आपापले योगदान दिले, तरी सुद्धा देशाची प्रगती गतीने होणे शक्य आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यार्थीदशेत प्रश्न पडणे, हे प्रगतीच्या आणि यशाच्या शक्यतेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीडेवर मात करीत आपल्या शंकांचे समाधान करवून घेणे ही फार महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठात ज्ञानसंवर्धनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डीएसटीच्या माध्यमातून येथे अनेकविध प्रकल्प आणि साधनसुविधा उपलब्ध आहेत. त्यांची योग्य प्रकारे सर्वंकष माहिती घेऊन विज्ञान सप्ताहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी येथून बाहेर पडताना काही ना काही उपयुक्त माहिती आपल्यासोबत घेऊन जावे. त्यातच या उपक्रमाचे यश सामावलेले आहे.

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवाजी विद्यापीठाच्या विविध विज्ञान अधिविभागांत उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक उपकरणे, सुविधा आदींची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत यांनी स्वागत केले, तर डीएसटी-सैफ केंद्राचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी आभार मानले. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

विज्ञान सप्ताहांतर्गत आयोजित उपक्रम असे-

दि. २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित विज्ञान सप्ताहात अनुक्रमे शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर के कामत, जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ. व्ही. ए. बापट, विज्ञान लेखिका डॉ. माधुरी शानभाग, भौतिकशास्त्र अधिविभागाचे डॉ. एम.व्ही. टाकळे,  मराठी विज्ञान विश्वकोश मंडळाच्या जीवशास्त्र ज्ञानमंडळाचे अध्यक्ष डॉ. मोहन मदवण्णा यांची व्याख्याने होणार आहेत. या सप्ताहात विद्यापीठ परिक्षेत्रातील १४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील दररोज १०० या प्रमाणे एकूण ७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महाविद्यालयांची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेप्रमाणे सामाजिक दुर्बल घटक आणि मुलींच्या सहभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एकात्मिक दृष्टिकोन हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

No comments:

Post a Comment