Monday 17 January 2022

ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे

कृतीशील, खंदे प्रबोधक नेतृत्व हरपले: कुलगुरू डॉ. शिर्के

 



सन २०१९मध्ये शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार. व्यासपीठावर तत्कालीन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, सौ. सरोज (माई) पाटील, प्राचार्य बी.ए. खोत आदी.

सन २००६मध्ये शिवाजी विद्यापीठाची सर्वोच्च मानद डी.लिट. पदवी डॉ. एन.डी. पाटील यांना प्रदान करताना तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे. सोबत (डावीकडून) तत्कालीन परीक्षा संचालक एन.व्ही. ठक्कर, दीक्षान्त समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे 'पद्मविभूषण' प्रा. एम.एम. शर्मा आणि कुलसचिव डॉ. एस.एन. देसाई.

ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांनी सन २०१९मध्ये शिवाजी विद्यापीठाचा प्राचार्य कणबरकर पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेले अत्यंत महत्त्वाचे भाषण. (ध्वनीचित्रफीत)

ज्येष्ठ नेते श्री. शरद पवार यांनी डॉ. एन.डी. पाटील यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना. (ध्वनीचित्रफीत)


कोल्हापूर, दि. १७ जानेवारी: ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अत्यंत विवेकनिष्ठ, निस्पृह विचारवंत आणि सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कणखर कृतीशीलतेने तळपणारे खंदे प्रबोधक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या रुपाने शिवाजी विद्यापीठाचा एक महान मार्गदर्शक व हितचिंतक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शोकभावना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केल्या आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे पुरोगामी व्यक्तीमत्त्व घडविणाऱ्या महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि विचारांनी प्रभावित झालेल्या डॉ. एन.डी. पाटील यांनी विद्यार्थी दशेपासूनच त्या आदर्शाबरहुकूम वाटचाल केली आणि अखेरच्या श्वासापर्यंत अव्याहतपणे जपली. एन.डी. पाटील यांचे जीवन म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मानवी हक्क आणि राष्ट्रीय भावना या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी निर्माण झालेली संग्रामगाथाच आहे. 

शिवाजी विद्यापीठाशीही एन.डी. पाटील सरांचे स्थापनेपूर्वीपासूनचे दृढ नाते राहिले. विद्यापीठाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने १९६२ मध्ये नियुक्त केलेल्या पहिल्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. १९६५ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभेवर ते निवडून आले होते. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे विद्याशाखेचे ते अधिष्ठाता होते. १९६५ ते १९७८ अशी तब्बल तेरा वर्षे ते विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचेही सदस्य होते. विविध अधिकार मंडळांच्या माध्यमातून आपली शिक्षणविषयक भूमिका वेळोवेळी प्रकट करीत शिवाजी विद्यापीठाला त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण असे शैक्षणिक व समाजाभिमुख स्वरुप प्राप्त करून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विद्यापीठात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन स्थापन करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. शिवाजी विद्यापीठाने सन २००६मध्ये सर्वोच्च डी.लिट. पदवी प्रदान करून त्यांच्या या योगदानाचा गौरव केला. तसेच २०१९ साली प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार देऊनही त्यांना गौरविले. त्यांचे अखेरपर्यंत विद्यापीठाशी स्नेहाचे नाते राहिले. एन.डी. पाटील यांच्या निधनामुळे शिवाजी विद्यापीठ परिवार एका महान मार्गदर्शक व हितचिंतकास मुकला आहे, असेही कुलगुरूंनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment