Monday 24 January 2022

‘दक्षिण आशिया: ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध’ या विषयावर

२९ जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिसंवाद




कोल्हापूर, दि. २४ जानेवारी: शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग व मराठी अधिविभाग आणि द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH) यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २९ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन केले आहे, अशी माहिती डॉ. मेघा पानसरे आणि डॉ. रणधीर शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

डॉ. पानसरे व शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दक्षिण आशिया: ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध  (“Open Pages in South Asian Studies - IV”, Kolhapur, India) या शृंखलेतील ‘दक्षिण आशिया: समकालीन गतिमान वास्तव – 2022’ (The Contemporary Dynamics of South Asia – 2022) या मध्यवर्ती  विषयावर हा परिसंवाद होणार आहे.

शनिवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता परिसंवादाचे उद्घाटन होईल. या प्रसंगी प्रा. वेरा जबोत्किना (प्र-कुलगुरू, इंटरनॅशनल अफेअर्स, RSUH, मॉस्को), मा. निकलाइ कुदाशेव (रशियाचे भारतातील राजदूत), महनीय पवन कपूर (भारताचे रशियातील राजदूत) व डॉ. इलेना रेमीजवा (संचालक, रशियन हाउस इन मुंबई) सदिच्छा संदेश देण्यासाठी उपस्थित असतील. या सत्रात ज्येष्ठ इतिहासकार प्रा. रोमिला थापर उद्घाटनपर व्याख्यान देणार आहेत, तर विख्यात भाषातज्ज्ञ प्रा. गणेश देवी बीजभाषण करतील. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. डी. दयालन विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील तर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डी.टी. शिर्के उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.

या परिसंवादामध्ये देश-विदेशातील प्रख्यात विचारवंत, अभ्यासक दक्षिण आशियाशी संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यात प्रामुख्याने प्रा. प्रभात पटनाईक, श्री. सईद नक्वी, प्रा. उर्वशी बुटालिया, प्रा. उमा चक्रवर्ती, प्रा. सईदा हमीद (दिल्ली), तसेच दक्षिण आशियायी देशांतील प्रा. महेंद्र लावोटी (नेपाल व अमेरिका), श्रीमती खुशी कबीर (बांगला देश), अॅड. निमाल्का फेर्नान्दो (श्रीलंका), डॉ. तैमुर रहमान व फर्वा शफ्कत (पाकिस्तान) यांची व्याख्याने होतील. त्याचबरोबर प्रा. एस. इरुदया (केरळ), श्रीमती सबा नक्वी, प्रा. जया वेलणकर, डॉ. जया मेहता, विनीत तिवारी, (दिल्ली), सचिन केतकर (बडोदा), सलमा (तमिळनाडू), श्री. जतीन देसाई, प्रा. अविनाश पांडे, श्री. प्रताप आसबे, अॅड. मिहीर देसाई (मुंबई), श्रीमती मीना शेषू (सांगली), प्रा. परिमल माया सुधाकर, श्री. दत्ता देसाई (पुणे) यांचेही मार्गदर्शन होईल. दि. ३१ जानेवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार व राज्यसभा सदस्य श्री. कुमार केतकर समारोपाचे भाषण करणार आहेत. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील समारोप सत्राचे अध्यक्ष असतील.

परिसंवादाच्या माध्यमातून दक्षिण आशियाशी संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नांवर देश-विदेशातील अभ्यासक चर्चा करतील. त्यातून अनेक मते- निष्कर्ष समोर येतील. दक्षिण आशियातील देशांचे प्रश्न समजून घेऊन भविष्यात त्यांच्यामध्ये सौहार्द संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हा परिसंवाद महत्त्वाची भूमिका बजावेल. परिसंवादामध्ये भारत, रशिया, पाकिस्तान, बांगलादेश, इंग्लंड य देशांतील संशोधक शोधनिबंध वाचणार आहेत. भाषा, साहित्य, कला, इतिहास, सामाजिक विज्ञान आणि मानव्यशास्त्र या विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी संशोधक आणि तरुण तज्ज्ञांना या परिसंवादात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर परिसंवादाचे तपशीलवार माहितीपत्रक उपलब्ध आहे, अशी माहिती परिसंवादाचे निमंत्रक डॉ. मेघा पानसरे, प्रा. रणधीर शिंदे (कोल्हापूर) व प्रा. अलेक्सांद्र स्तल्यारव व डॉ. इंदिरा गजीयेवा (रशिया) यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment