Tuesday 25 January 2022

‘निसर्ग व माणसांतील अंतर कमी करण्याचा मराठी साहित्यविश्वाकडून प्रयत्न’

विद्यापीठातील ‘मराठी निसर्ग साहित्य’ चर्चेमधील सूर

शिवाजी विद्यापीठात आयोजित ऑनलाईन मराठी साहित्य चर्चेत बोलताना साहित्यिक संदीप नाझरे


कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: माणसांसह सजीव सृष्टीचेही भावविश्व रेखाटताना मराठी साहित्यविश्वाने निसर्ग व माणूस यांच्यातील अंतर कमी करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, असा सूर आज मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या साहित्य चर्चेमध्ये उमटला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी निसर्ग साहित्यया विषयावर आज साहित्य चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चे साहित्यिक सलीम मुल्ला, दत्ता मोरसे आणि संदिप नाझरे सहभागी झाले.

इथून पुढच्या लिहिणाऱ्या पिढीने देखील निसर्गाला काहीतरी सांगायचे आहे, याची जाणीव ठेवून पर्यावरणाचा विचार करून लेखन करावे’, असे मत साहित्यिक सलीम मुल्ला यांनी यावेळी मांडले. संदिप नाझरे यांनी मौखिक परंपरेतील लोककथांचा आणि लोकगीतांचा आधार घेत पशुक्ष्यांचे लोकसाहित्याबरोबरचे नाते उलडले. दत्ता मोरसे यांनी साहित्यातून चित्रित झालेल्या जंगल चित्रणाचा वेध घेतला. तसेच जंगलातील भाषा आणि पशुक्ष्यांतील सांकेतिक खुणांचे अर्थनिर्णयन कसे करावे, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ऑनलाईन स्वरूपात झालेल्या या चर्चासत्राचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment