Thursday, 27 March 2025

अहिल्यादेवी होळकर महिला सक्षमीकरणाचे आदर्श उदाहरण: विनिता तेलंग

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना लेखिका विनिता तेलंग.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी लेखिका विनिता तेलंग, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. प्रभंजन माने, चंद्रकांत पाटील आदी


कोल्हापूर, दि. २७ मार्च: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य म्हणजे महिला सक्षमीकरणाचे मोठे आदर्श उदाहरण आहे, असे प्रतिपादन लेखिका विनिता तेलंग यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि. २६) विद्वत्ता परिषद आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रथम सत्रात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य व महिला सबलीकरण या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे समन्वयक डॉ. मच्छिंद्र गोफणे होते.

विनिता तेलंग म्हणाल्या, अहिल्यादेवींनी केवळ धार्मिक कार्य केले, असे नव्हे, तर त्याबरोबरीनेच अनेक लोककल्याणकारी कामे केली. महिला सक्षमीकरणाचे त्या स्वतः प्रतीक होत्याच, पण त्यांच्यामुळे राज्यातील इतर महिलांसाठीही त्यांचे कर्तृत्व प्रेरणादायी ठरले. आजही त्यांचे कार्य स्फूर्तीदायक आहे. त्यांचे कार्य देशातील प्रत्येकासाठी महत्त्वाचे सून त्याची जाणीव प्रत्येक भारतीयाने ठेवली पाहिजे. अहिल्यादेवी होळकर यांच्या चरित्रापासून नव्या पिढीने सर्वसमावेशक, सर्वव्यापक प्रेमाचा, सर्वांच्या हिताचा बोध घ्यावा आणि त्याप्रमाणे जीवन व्यतित करावे. अहिल्यादेवींचा आदर्श घेवून लोककल्याणाचे राजकारण, समाजकारण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर दुसऱ्या सत्रात सुखदेव थोरात यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राजकीय, सामाजिक धोरण व प्रशासकीय कार्य या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे चंद्रकांत पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रशांत आयरेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्तात्रय घोटुगडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास इंग्रजी अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने, सामाजिक कार्यकर्ते बबनराव रानगे, शहाजी सिद, प्रा.लक्ष्मण करपे, डॉ. संतोष कोळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे शिक्षक, संशोधक व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

गौरवगाथा आणि सांस्कृतिक कार्यक्रम

कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची गौरवगाथा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अहिल्यादेवींची जीवन गाथा सांगणारी नाटिका, गीते, पोवाडे, ओव्या, लोकगीते व पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले.

Tuesday, 25 March 2025

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सायबर सुरक्षा गरजेची: आशुतोष कापसे

 

ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांचे स्वागत करताना भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे.


कोल्हापूर, दि. २५ मार्च: ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी, संस्थांनी सायबर सुरक्षेबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाच्या फाल्कन लॅब्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष कापसे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र अधिविभागातर्फे काल (दि. २४) "सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय): आव्हाने आणि संधी" या विषयावर श्री. कापसे यांचे विशेष व्याख्यान आयोजित केले. अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे अध्यक्षस्थानी होते.

डिजिटल युगातील सुरक्षा आणि तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रातील आव्हानात्मक पैलूंवर प्रकाश टाकताना कापसे म्हणाले, प्रत्येक व्यक्ती आणि संस्थेला त्यांच्या डेटाच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. विशेषतः, डिजिटल युगात वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती सहज उपलब्ध होते, त्याचे दुरुपयोग टाळण्यासाठी एन्क्रिप्शन आणि नियमित सॉफ्टवेअर अपडेट्सचा वापर करणे गरजेचे आहे. डिजिटल गोपनीयता राखण्यासाठी आणि सुरक्षित डेटा शेअरिंग सुनिश्चित करण्यासाठी, मजबूत प्रमाणीकरण पद्धती आणि विश्वसनीय नेटवर्क सुरक्षा प्रोटोकॉल वापरावेत. फिशिंग हल्ल्यांच्या संदर्भात सातत्याने जागरुक राहणे आवश्यक आहे. सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी खाजगी माहिती, छायाचित्रे उघड करीत असताना सावधगिरी बाळगावी. कोणतेही ॲप अधिकृत ॲप स्टोअरमधूनच इन्स्टॉल करावे, अन्यथा डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. कोणत्याही बँकिंग व्यवहारासाठी कधीही मोफत वायफाय वापरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात बोलताना कापसे म्हणाले, एआयच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर डेटा विश्लेषण, ऑटोमेशन आणि संशोधन प्रक्रियांमध्ये सुधारणा शक्य आहे. तथापि, एआयचे विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अद्यापही मर्यादा असून त्यासाठी मानवी निरीक्षण आणि नियंत्रण आवश्यक आहे. अधिक कनेक्टिव्हिटीमुळे आय.ओ.टी. उपकरणांमध्ये अनेकदा सुरक्षाविषयक त्रुटी आढळतात. अशा परिस्थितीत, योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यास हल्ल्यांचा सामना करावा लागू शकतो. या संदर्भात सतर्कता बाळगण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

अध्यक्षीय मनोगतात  प्रा. सोनकवडे यांनी तांत्रिक प्रगतीशी संबंधित फायदे आणि जोखीम याबाबत जागरूक राहण्याचे महत्त्व सांगितले. ऑनलाइन फसवणुकीमध्ये गेलेले पैसे परत मिळवणे खूप कठीण असल्याने शेअर बाजाराशी निगडित अधिकृत ॲप्सव्यतिरिक्त इतर ॲपचा वापर करणे धोक्याचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

सुरवातीला डॉ. मानसिंग टाकळे यांनी प्रास्ताविक व परिचय करून दिला. सुप्रिया पाटील आणि वैष्णवी यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. आर. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. केशव राजपुरे, डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. एस. पी. दास, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. एम. आर. वायकर, डॉ. एस. एस. पाटील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासमवेत सहभागी विद्यार्थी, परीक्षक आणि शिक्षक

समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे,  डॉ. दिनेश अरोरा, डॉ. वैशाली पवार, डॉ. तानाजी चौगुले आदी



(फोटोओळ- उपरोक्त ३ फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठात आयोजित समूह युवा संसद स्पर्धेत सादरीकरण करताना शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी

 

कोल्हापूर, दि. २५ मार्च: केवळ राज्यशास्त्राच्याच नव्हे, तर सर्वच अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी संसदीय कार्यपद्धतीचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित समूहस्तरीय युवा संसद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल (दि. २४) बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, संसदीय राजकारण हा सार्वत्रिक अभ्यासाचा विषय आहे. संविधानिक मूल्यांचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांना युवा संसदसारख्या उपक्रमातून चालना मिळते.

या स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी जालंधर (पंजाब) येथील डी.ए.व्ही. महाविद्यालयाचे डॉ. दिनेश अरोरा (समूह समन्वयक) आणि पुण्याच्या श्री शाहू विद्यामंदिर महाविद्यालयाच्या डॉ. वैशाली पवार (शिक्षणतज्ज्ञ  परीक्षक)  उपस्थित होते. शपथविधीपासून ते कायदानिर्मिती प्रक्रियेपर्यंत सर्व घटकांचा समावेश असलेल्या या उपक्रमात शिवाजी विद्यापीठाच्या संघाने उत्तम सादरीकरण केले. यावेळी गायत्री सोनवणे, तेजस सन्मुख, संदेश लडकट, श्रेया म्हापसेकर, स्वप्नील माने, विश्वजित पाटील या सहा विद्यार्थ्यांची उत्कृष्ट संसदरत्न म्हणून निवड करण्यात आली. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. तानाजी चौगुले, सुरेखा आडके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. प्रल्हाद माने यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. संतोष सुतार, डॉ. कविता वड्राळे, आकाश ब्राह्मणे, डॉ. अतुल जाधव आदींनी संयोजन केले.

Friday, 21 March 2025

‘एआय’ पूरक; पर्याय नव्हे!: निखिल पंडितराव

डिजिटल माध्यम उद्योग कार्यशाळेचा समारोप

डिजिटल माध्यम उद्योग कार्यशाळेस उपस्थित असणारे (डावीकडून) दिग्दर्शक सुमित पाटीलबी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशीदैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितरावजर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ. निशा मुडे-पवारडॉ. शिवाजी जाधव आदी.


कोल्हापूर, दि. २१ मार्च: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) जगभर बोलबाला आहे. माध्यमांमध्ये हे तंत्रज्ञान स्वीकारणे अपरिहार्य आहे. तथापि, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे सर्वस्व नसून ते पूरक असेल, पण पर्याय असू शकत नाही, असे मत दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी आज व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाच्या जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित डिजिटल माध्यम उद्योग या दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी अध्यक्षस्थानी होते.

पंडितराव म्हणाले, मुद्रित माध्यमांनी गेल्या पावणेतीनशे वर्षांमध्ये अनेक बदल केले आहेत. डिजिटल माध्यमाच्या प्रभावाच्या काळातही वर्तमानपत्रे आपले अस्तित्व टिकवून आहेत. उलट कोविडनंतर वर्तमानपत्राच्या खपामध्ये आणि संख्येमध्ये वाढ झाली आहे. विश्वासार्हता जपल्यामुळे मुद्रित माध्यमांना या पुढील काळातही धोका असणार नाही. परंतु डिजिटल माध्यमांच्या प्रभावामुळे काही प्रमाणात वर्तमानपत्रातील वृत्त सादरीकरण बदललेले आहे. मुद्रित माध्यम आणि डिजिटल माध्यम यांचा स्वतंत्र वाचक आणि ग्राहक आहे. ही दोन्ही माध्यमे एकत्र येणं शक्य नाही. या पुढील काळात वर्तमानपत्रांसाठी संशोधन, शोध पत्रकारिता आणि मानवी स्वारस्याच्या बातम्या दिल्याशिवाय गत्यंतर नाही. 

चारुदत्त जोशी म्हणाले, टेलिव्हिजन पत्रकारितेमध्ये अनेक तांत्रिक बदल झाले आहेत. हे बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे. सध्या देशभर बाराशेपेक्षा जास्त विविध चॅनल्स आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे यातील अनेक चॅनलवर परिणाम होताना दिसत आहे. डिजिटल माध्यम हेच टीव्हीकडे जाण्याचे भविष्यातील माध्यम असेल. विशेषतः मोबाईलच्या माध्यमातून मोठा वर्ग टीव्हीशी जोडला जाईल. केबल नेटवर्क कंपन्यांमध्ये अलीकडच्या काळात मनोमिलन सुरू असून स्पर्धा करण्यामध्ये त्यांना विशेष रुची उरली नाही. त्या ऐवजी आपला ग्राहक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न ते करत असल्याचे चित्र आहे. भारतात इंटरनेटची गती वाढल्यानंतरचे चित्र अजून वेगळे असू शकेल, असेही त्यांनी नमूद केले.

चित्रपट दिग्दर्शक सुमित पाटील म्हणाले, चित्रपट क्षेत्रापुढे आज अनेक आव्हाने आहेत. चांगला आशय असूनही लोक चित्रपटगृहात जात नाहीत, हे वास्तव आहे. चित्रपटाच्या पायरसीमुळे निर्माते आणि दिग्दर्शकांची खूप मोठी आर्थिक हानी होऊ लागली आहे. डिजिटल माध्यमामुळे मोठ्या प्रमाणात आशयाची निर्मिती होत असली तरी चित्रपट माध्यमांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म फारसे फलदायी ठरले नसल्याचे दिसते.

विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पाहुण्यांची ओळख डॉ. शिवाजी जाधव यांनी करून दिली. चंद्रशेखर वानखेडे यांनी आभार मानले. 

ज्ञानसंक्रमणात अनुवादित साहित्याची भूमिका महत्त्वाची: डॉ. रघुनाथ ढमकले

 

शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. चेतना सोनकांबळे यांच्यासह शिक्षक, संशोधक व विद्यार्थिनी


कोल्हापूर, दि. २१ मार्च: ज्ञानाच्या संक्रमणामध्ये अनुवादित साहित्य महत्त्वाची भूमिका बजावते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी आज केले.

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागात "अध्ययन साहित्याचे भाषांतर" या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांबळे होते.

डॉ. ढमकले म्हणाले, भाषांतर ही केवळ कला नसून ती सर्जनशील नवनिर्मिती असते. एका भाषेतील ज्ञान दुसऱ्या भाषेमध्ये नेऊन भाषेसह माणूस समृद्ध करण्याचे काम या माध्यमातून होते. अनुवाद प्रक्रियेमुळेच सामान्य माणसापर्यंत ज्ञान पोहोचू शकते.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. कांबळे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार बहुविद्याशाखीय आणि आंतरविद्याशाखीय ज्ञानाच्या प्रसाराला महत्त्व देण्यात आले आहे. त्याचे योग्य उपयोजन करण्यासाठी अध्ययन साहित्य स्थानिक भाषेमध्ये उपलब्ध होणे गरजेचे आहे.

शिक्षणशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यशाळेच्या  समन्वयक डॉ. रूपाली संकपाळ कार्यशाळेचे प्रयोजन स्पष्ट केले. बन्सी होवाळे व आरती पाटील यांनी परिचय करून दिला. प्रतिक्षा माने व दर्शना डोकरमारे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुप्रिया पाटील यांनी आभार मानले.

यावेळी सरस्वती कांबळे, आनंदा कुंभार, अर्चना कुराडे, अंजली गायकवाड, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, संजय चव्हाण उपस्थित होते. विद्यापीठ परिक्षेत्रातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला.

Thursday, 20 March 2025

डिजिटल माध्यमांसाठीचे धोरण लवकरच : राजा माने

जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागात दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन

 

शिवाजी विद्यापीठाच्या जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन विभागाच्या वतीने आयोजित डिजिटल माध्यम उद्योग या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना ज्येष्ठ संपादक राजा माने. (डावीकडून) डॉ. राजेंद्र पारिजातडॉ. दशरथ पारेकरडॉ. निशा मुडे-पवार. 

कोल्हापूर, दि. २० मार्च: डिजिटल माध्यमांमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढत आहे. या माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांना पत्रकार मानायचे की नाही याविषयी खूप चर्चा होत आहेत. परंतु नुकतेच राज्य सरकारने डिजिटल माध्यम धोरण तयार केले असून लवकरच ते धोरण जाहीर होईल, अशी माहिती डिजिटल मीडिया पत्रकार संपादक परिषदेचे अध्यक्ष राजा माने यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन विभागात पीएम उषा अंतर्गत डिजिटल माध्यम उद्योग या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार, संपादक डॉ. दशरथ पारेकर अध्यक्षस्थानी होते.

राजा माने म्हणाले, कोविड कालखंडानंतर डिजिटल माध्यमांचा प्रसार आणि प्रभाव वाढला आहे. या माध्यमात काम करणारे हजारो पत्रकार राज्यभर विखुरले आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातही अनेक पत्रकार डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. डिजिटल पत्रकारांना सध्या कोणत्याही प्रकारची नियमावली नसल्यामुळे या माध्यमात काम करणाऱ्यांना पत्रकार म्हणायचे की नाही, याविषयी संदिग्धता आहे. ही संदिग्धता दूर करावी यासाठी संघटनेच्या वतीने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. डिजिटल माध्यमांचे आर्थिक मॉडेल तयार व्हावे आणि इतर माध्यमाप्रमाणे डिजिटल माध्यमांनाही शासकीय जाहिराती मिळाव्यात, यासाठी संघटना काम करत आहे. संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने डिजिटल माध्यमांचे धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच हे धोरण सर्वसामान्य नागरिकांसाठी जाहीर केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी सायबरचे निवृत्त प्राध्यापक डॉ. राजेंद्र पारिजात यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डिजिटल माध्यमांमध्ये ऑटोमेशन, व्हिडिओ, ऑडिओ आदी अनेक गोष्टी येत आहेत. खर्च कमी असल्याने खूप लोक या माध्यमाकडे वळत आहेत. डिजिटल माध्यमांमध्ये नेमकं काय करायचं आहे, याच्या संकल्पना स्पष्ट असणे आवश्यक आहे. अनेकांना या संकल्पना स्पष्ट नसल्याने त्यांचा महत्त्वाचा वेळ वाया जातो. यासाठी डिजिटल विश्वातून रियल विश्वामध्ये डोकावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. दशरथ पारेकर म्हणाले, माध्यमाच्या परिघावरून लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हद्दपार झाले आहेत. पर्यावरणासह लोकांच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न उग्र होत असताना माध्यमे केवळ भावनिक मुद्दे हातात घेताना दिसतात. माध्यमांची विश्वासार्हता खूप महत्त्वाची गोष्ट असल्याने डिजिटल माध्यमांनी विश्वासार्हता जपावी. राज्य सरकार डिजिटल माध्यमांसाठी नवे धोरण तयार करत असले तरी नियमानाच्या नावाखाली माध्यम स्वातंत्र्य हरवणार नाही, लेखन स्वातंत्र्याचा संकोच होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

दुपारच्या सत्रामध्ये पुणे येथील दैनिक सकाळचे वृत्त संपादक धनंजय बिजले यांनी डिजिटल माध्यमांचा मुद्रित माध्यमांवरील झालेल्या परिणामाबद्दल विवेचन केले. ते म्हणाले, माहितीचा विस्फोट झाला असल्याने प्रत्येकाकडे माहिती उपलब्ध आहे. भारत प्रचंड मोठी बाजारपेठ असून भारतात डेटा खूपच स्वस्त आहे. परिणामी डिजिटल माध्यमांचा विस्तार भारतात सर्वाधिक गतीने होत आहे; पण त्याचवेळी फेक न्युजचा धोकाही वाढलेला आहे. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे वर्तमानपत्रांवर चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम झालेले आहेत. ट्विटरच्या आगमनानंतर वर्तमानपत्रातील शब्दसंख्येवर मर्यादा आली. लेआउटमध्ये बदल झाला. त्याशिवाय बातम्यांचे प्राधान्यक्रमही बदलले. विशेषतः अतिस्थानिक आशय वाढून लक्षसमुहांसाठी बातम्या लिहिणे सुरू झाले. इंफोग्राफिक्सचा वापरही वाढला. क्यू आर कोडसारखे नवे विषय दैनिकांमध्ये आले. तथापि इतक्या वर्षानंतर मुद्रित माध्यमांना आपला वाचक नेमका कोण आहे आणि कुठे आहे याची वस्तुनिष्ठ आकडेवारी उपलब्ध करता आलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले.

सांगली येथील सायबर जुरिक्सचे अध्यक्ष आर. विनायक म्हणाले, डिजिटल माध्यमांमध्ये आशय निर्मिती सर्वात महत्त्वाची आहे. आशयाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास तो असे अधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आशयामध्ये स्क्रिप्ट रायटिंग हा सगळ्यात मूलभूत मुद्दा आहे. आशयाचे नियोजन करणे आणि योग्य उद्दिष्ट समोर ठेवून संबंधितापर्यंत तो पोहोचवणे डिजिटल माध्यमांसाठी आवश्यक आहे. यासाठी तंत्रज्ञान आणि नवे प्रवाह याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

विभाग प्रमुख डॉ. निशा मुडे-पवार यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. यावेळी ऐतवडे येथील वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रताप पाटील, आनंदा पांढरबळे यांच्यासह वारणा महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच तिटवे येथील शहीद लक्ष्मीबाई पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. चंद्रशेखर वानखेडे यांनी केले, तर डॉ. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.

Tuesday, 18 March 2025

‘एलजीबीटीक्यूएआय’ समुदायाला समता, सन्मानाचा अधिकार: कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित 'एलजीबीटीक्यएआय'विषयक जागृतीपर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) पूर्वा, प्रिन्स, स्मिता, डॉ. भारती पाटील, मीना शेषू, विशाल पिंजानी


'एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेत बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) मीना शेषू, विशाल पिंजानी आणि डॉ. भारती पाटील

शिवाजी विद्यापीठात 'एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेत बोलताना  मीना शेषू

शिवाजी विद्यापीठात 'एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेत बोलताना विशाल पिंजानी


('एलजीबीटीक्यूएआय'विषयक कार्यशाळेचा व्हिडिओ)





 

कोल्हापूर, दि. १८ मार्च: एलजीबीटीक्यूएआयहा समुदाय आपल्या समाजातील एक घटकच आहे, याची सर्वांना जाणीव होणे आवश्यक आहे. कोणताही भेदभाव न करता त्यांचे जीवन समानतेचे आणि सन्मानाचे असले पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन, अभिमान, कोल्हापूर आणि मुस्कान, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये एलजीबीटीक्यूएआयसमुदायाविषयी एकदिवसीय जागृतीपर कार्यशाळा आज झाली. त्यावेळी कुलगुरू डॉ.शिर्के अध्यक्षस्थानावरून बोलत होते.  यावेळी मुस्कानच्या मीना शेषू आणि अभिमानच्या विशाल पिंजानी यांची विशेष उपस्थिती होती. 

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, या कार्यशाळेकडे सामाजिक कार्य म्हणून पाहिले पाहिजे. या समुदायास न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता आली तरी निसर्गाचे आकलन कोणाला शक्य नाही.  त्यामुळे आपणच या समुदायाला समजून घेतले पाहिजे. दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. समानता आणि सर्वांची प्रतिष्ठा हा संविधानाने प्रदान केलेला अधिकार सर्वांना आहे, याची जाणीव जागृती करण्यामध्ये कार्यशाळा निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी मीना शेषू म्हणाल्या, लिंगभाव हा केवळ जैविक नाही, तर तो समाज आणि संस्कृतीने तयार केलेला आहे. मुलांना समाजाबरोबर बाहेर जाऊन शिकण्याची आणि माणूस म्हणून तयार होण्याची संधी मिळते आणि मुलींना घरात बसविले जाते. हा समुदाय आणि समाजामध्ये पुल बांधण्याचे काम असे उपक्रम करतात. सर्वांना सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. तो या समुदायासाठीही मान्य व्हायला हवा.

यावेळी विशाल पिंजानी म्हणाले, या समुदायातील लोकांचे आयुष्य वाचविण्याची संधी तुमच्या हातात आहे.  योग्य माहितीअभावी या लोकांबद्दल गैरसमज निर्माण होवून द्वेष, हिंसा आणि अत्याचार घडतात.  लोकांमध्ये यांच्याप्रती जागृती निर्माण होणे गरजेचे आहे. या लोकांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही.  परंतु, अशा स्वरूपाचे लोक एकत्र आल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य सुधारते. छोटया प्रयत्नांमुळे त्यांचे जीवन सुधारू शकते.  सर्वत्र प्रवेश, समान वागणूक, आरोग्य आणि शांततामय जीवन जगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला पाहिजे.

यावेळी अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. ऊर्मिला दशवंत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. मेघा पानसरे, डॉ. उमेश गडेकर, डॉ. परशुराम वडर, डॉ. सोनिया रजपूत, डॉ. सुरेश आपटे, एलजीबीटीक्यूएआय समुदायातील प्रिन्स, सँडी, यशश्री, सना, पूर्वा, मयुरी यांच्यासह सायबर कॉलेज आणि विद्यापीठातील समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक: डॉ. श्रीरंग गायकवाड

 

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीरंग गायकवाड. मंचावर (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे.


कोल्हापूर, दि. १८ मार्च: तुकोबांचे चौदा टाळकरी हे समूहभक्तीचे प्रतीक आहेत, असे प्रतिपादन डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासनाच्या वतीने तुकाराम बीजेनिमित्त आयोजित संत तुकोबांचे चौदा टाळकरीया विशेष व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. येथील शाहू स्मारक भवनात काल (दि. १७) झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

डॉ. गायकवाड म्हणाले की, संत तुकारामांच्या अभंगाचे संकलन करण्याचे मोलाचे काम तुकोबांच्या चौदा  टाळकऱ्यांनी केले. तुकोबांच्या सोबत असणारे चौदा टाळकरी समाजातील सर्व स्तरांतील होते. बहुजन समाजामध्ये जागृती करण्याचे काम त्यांनी केले. या चौदा टाळकऱ्यांच्या जीवनचरित्राचा आणि कार्याचा सविस्तर आढावा गायकवाड यांनी घेतला.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, तुकारामाच्या चौदा टाळकऱ्यांचे कार्य समाजासमोर एक आदर्श आहे. निष्ठेचे मूर्तीमंत प्रतीक आहेत.

संत तुकाराम अध्यासनाचे समन्वयक डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी तुकाराम शिर्के, डॉ. डी. . देसाई, डॉ. अनिल गवळी, डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. संजय पाटील, मराठी विभागाचे संशोधक व एम..चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.