Friday 30 September 2022

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे - प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 


कोल्हापूर, दि.30 सप्टेंबर - आत्मनिर्भर भारत करण्यासाठी देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा, राष्ट्रीय आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनदिवसीय राष्ट्रीय/राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून प्र-कुलगुरू डॉ.पाटील बोलत होते.

राष्ट्रीय सेवा योजन क्षेत्रीय कार्यालय, पुणे, युवा कार्य क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई आणि राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिबिराच्या समारोप समारंभामध्ये प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुखडॉ.प्रशांतकुमार वनंजे, भारत सरकारच्या युवा कार्य क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील म्हणाले, उत्कृष्ट नमुना होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.यामधून आपल्या कलागुणांना वाव मिळतो आणि आपल्यामधील नेतृत्वगुण उजागर होतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारे आहे. आयुष्यामधील वळणबिंदू म्हणून या शिबिराकडे पाहता येईल.विद्यार्थ्यांनी स्वत:चे करियर घडविण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे.त्यानुसार पुढील वाटचाल करणे संयुक्तीक ठरेल.आपल्या देशामध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' देशभर साजरा करण्यात येत आहे.संघ बांधणी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्यातील कृषी आणि अकृषी विद्यापीठे एकत्रित येवून या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले हे सर्वांसाठी अधिक प्रोत्साहात्मक आहे.

भारत सरकारच्या युवा कार्य क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन म्हणाले, शिवाजी विद्यापीठामधील राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग विविध कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करून खुप चांगले योगदान देत आहे. उत्कृष्ट नियोजनामुळेराष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत हे ठिकाण सकारात्मक आहे.या शिबीरांमध्ये शिकवली जाणारी शिस्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे.छोटया-छोटया प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी हिरहिरीने भाग घेतला पाहिजे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ.प्रशांतकुमार वनंजे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास असे शिबिर सहाय्यभूत ठरतात.राज्याच्या विविध भागांमधील विद्यापीठांमध्ये असे शिबीर राबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. 

प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचेसह संघ व्यवस्थापक डॉ.निर्मला जाधव, डॉ.पवन शिनगारे, डॉ.गांधी पुष्कर, डॉ.कल्याण सावंत, स्वयंसेवक कु.सृष्टी क्षीरसागर, सार्थक पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.एस.देशमुख, क्षेत्रीय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, महाराष्ट्र शासनाचे मंगेश खैरनार, रमेश देवकर, कॅप्टन प्रशांत पाटील, कॅप्टन राहूल मगदूम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.अभय जायभाये यांनी केले.डॉ.स्नेहल राजहंस, डॉ.संदीप पाटील यांनी सूत्रसंचलन केले. तर युवा अधिकारी अजय शिंदे आणि जिल्हा समन्वयक डॉ.एस.एन.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातील 29 विद्यापीठांचे 280 रासेयो स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

------



No comments:

Post a Comment