Wednesday 22 September 2021

विद्यापीठाच्या ‘हवामान बदल व शाश्वत विकास’ विषयावरील व्याख्यानमालेस प्रारंभ

हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावध होणे गरजेचे: डॉ. अनिल कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठाच्या हवामान बदलविषयक व्याख्यानमालेत सहभागी झालेले (clockwise) डॉ. सचिन पन्हाळकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


 

कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपणास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मानवाने हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावधगिरीची पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आय.आय.एस.सी.) चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी काल येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलीटी स्टडिज्मार्फत हवामान बदल व शाश्वत विकासया विषयावरील व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सदर व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना तापमानवाढ व जलस्रोतांवर होणारा परिणामया विषयावर डॉ. कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

डॉ. कुलकर्णी म्हणाले, हिमालयामध्ये अनेक पर्वतरांगा आहेत, ज्यात शिवालिक, पीर पंजाल, ग्रेट हिमालय, काराकोरम अशा पर्वत रांगांचा समावेश होतो. पैकी दक्षिणेकडील शिवालिक पर्वत रांग वगळता इतर पर्वत रांगांमध्ये प्रामुख्याने बर्फ आढळतो. उत्तर भारतात सिंधु, गंगा व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांची खोरी आहेत. हवामान बदलामुळे या नद्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. १९६० पर्यंत भारताच्या इतर भागाशी तुलना करता हिमालयीन क्षेत्र थंड होते. पण जसा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव वाढत गेला तसे हिमालयीन क्षेत्रामधील तापमान वाढत गेल्याचे दिसून येते. या वाढत्या तापमानामुळे पर्वत रांगांमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. जवळपास उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतू बदलानुसार तेथील भूपृष्ठात ७५% बदल दिसून येतो. वितळलेल्या बर्फामुळे सिंधु खोऱ्यात ७०% पाणी पुरवठा होतो. गंगा नदी खोऱ्यात त्याचे प्रमाण केवळ १०-१५% असून ब्रह्मपुत्रा खोऱ्यात ते त्यापेक्षा कमी होते.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाले, कमी उंचीवरील बर्फ हा जास्त उंचीवरील हिमनगांपेक्षा हवामान बदलाला अधिक प्रतिसाद देतो. परिणामी, पर्वत रांगांच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकवस्तीची जीवनशैली असुरक्षित होते. ती असुरक्षितता मोजण्याची आणि त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी सर्वच क्षेत्रांनी संयुक्तपणे घेण्याची गरज आहे. विविध सांख्यिकीय आकडेवारीच्या आधारे त्यांनी सतलज, रावी, बियास, अलकनंदा, चंद्रा, भागीरथी या नद्यांच्या खोऱ्यात गेल्या १२ वर्षांत झालेला बदल दर्शविला. ढगफुटी, हिमस्खलन, भूस्खलन, फ्लॅश फ्लड अशी अनेक आव्हाने तेथील लोक समुदायासमोर आहेत. हिमनदी तलावांची निर्मिती व त्याचा बेड रॉकवर पडलेला दबाव यामुळे फ्लॅश फ्लडचा धोका अधिक वाढतो. हा धोका टाळणे शक्य आहे, पण त्यासाठी मॉडेलिंग टेक्निक वापरून फ्लो पाथ, व्हेलोसिटी, धोक्याची तीव्रता, हिमनदी तलावांचे स्थान व भविष्यातील त्याचा विस्तार या गोष्टींकडे नवीन अभ्यासकांनी लक्ष वेधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नुकत्याच केलेल्या पोटॅन्शियल ग्लॅशियर रिट्रीट: स्पिती व्हॅलीया अभ्यासानुसार त्यांनी  सिंधु खोऱ्यातील स्पिती व्हॅली भागात भविष्यात २०५० पर्यंत जवळपास ६०%, तर २०७० पर्यंत ६६% बर्फ वितळण्याची शक्यताही व्यक्त केली. इतर ऋतूंमधील पाण्याची कमतरता कमी करण्यासाठी लडाखमध्ये  ‘ICE STUPAS’ (बर्फाचे स्तूप) निर्माण करून ७.५ कोटी लिटर पाण्याचे संवर्धन केले आहे. इतर भागांसाठी हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी अधिक वैज्ञानिक चिकित्सा होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, हवामान बदलांचे दुष्परिणाम सार्वत्रिक आहेत. मानवी समुदायाबरोबरच पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होतो आहे. या दुष्परिणामांना अटकाव करण्यासाठी संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन व उपाययोजना करण्याची गरज आहे. या विषयाच्या अध्ययनाकडे विद्यार्थी तसेच शिक्षकांनी लक्ष देणे आवश्यक असून सदर मॉडेलिंग टेक्निकचा समावेश अभ्यासक्रमात करण्याची गरज असल्याचे सांगितले.  

या ऑनलाईन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध विद्यापीठांतील अभ्यासक, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व साधन व्यक्तींचा परिचय केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी करून दिला. सदरच्या व्याख्यानासाठी डॉ. प्रशांत पाटील, सुधीर पोवार व अभिजीत पाटील यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.

 

No comments:

Post a Comment