Monday 30 May 2022

जगात कुठेही शिका, पण देशकार्यासाठी सज्ज राहा: प्रा. सौरभ लखनपाल

 

शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमाचे उद्घाटन करताना प्रा. सौरभ लखनपाल आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. नीलेश सावे, जी.आर. पळसे, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. बलप्रीत सिंह आणि डॉ. प्रकाश कुंभार.

शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलताना प्रा. सौरभ लखनपाल. मंचावर कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व मान्यवर. 

प्रा. सौरभ लखनपाल यांनी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह मान्यवरांना पंजाबी फलकारी (शाल) प्रदान केली.

शिवाजी विद्यापीठात 'महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग' या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.



विद्यार्थ्यांच्या उत्साही प्रतिसादात महाराष्ट्र के रंग, पंजाब के संगचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. ३० मे: विद्यार्थ्यांनी जगाच्या पाठीवर कुठेही शिकावे, मात्र आयुष्यात देशकार्यासाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन फगवाडा (पंजाब) येथील लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विद्याशाखेचे वरिष्ठ अधिष्ठाता प्रा. सौरभ लखनपाल यांनी आज येथे केले.

आजादी का अमृतमहोत्सव आणि शिवाजी विद्यापीठाचा हिरक महोत्सव अशा संयुक्त निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र के रंग, पंजाब के संग या सांस्कृतिक आदान प्रदान उपक्रमाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते. या उद्घाटन समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत उत्साही प्रतिसाद लाभला.

प्रा. सौरभ लखनपाल

विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. लखनपाल म्हणाले, आज विद्यार्थ्यांनी देशासमोरील समस्यांवर विविध उपाय शोधण्याला प्राधान्य देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. असे उपाय घेऊन सामोरी येणारी पिढी आज देशाला हवी आहे. त्यासाठी संगीत, कला, नृत्य, साहित्य ही अत्यंत महत्त्वाची साधने आणि घटक आहेत. त्या दृष्टीने या साहित्यिक व सांस्कृतिक व्यवहाराकडे तरुणाईने अत्यंत गांभीर्याने पाहायला हवे.

प्रा. लखनपाल पुढे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाशी लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे निर्माण झालेले सांस्कृतिक बंध हे काही आजचे नाहीत. त्याला खूप महान वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमध्ये अनेक शतकांपासून सांस्कृतिक बंध निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राचे संत नामदेव यांनी केलेल्या ६१ रचना पवित्र गुरूग्रंथसाहिबमध्ये आहेत. गुरू गोविंदसिंहांबद्दल पंजाबमध्ये जितका आदर आहे, तितकाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही आहे. याशिवाय फलोत्पादनासह अनेकविध क्षेत्रांत ही दोन्ही राज्ये संयुक्तपणे काम करीत आहेत.

कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कोविड-१९च्या साथीनंतर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला एक आगळे महत्त्व आहे. हा स्पर्धेचा नव्हे, तर सांस्कृतिक आदानप्रदानाचा कार्यक्रम असल्याने अतिशय निकोप आणि स्पर्धेपेक्षाही उत्तम सादरीकरणाची दोन्ही विद्यापीठांच्या युवा कलाकारांकडून अपेक्षा आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी प्रा. लखनपाल यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले. तर, प्रा. लखनपाल यांनी मंचावरील सर्वांनाच पंजाबची फलकारी ही वैशिष्ट्यपूर्ण शाल प्रदान केली.

यावेळी मंचावर लव्हली प्रोफेशनल विद्यापीठाचे उप-अधिष्ठाता डॉ. बलप्रीत सिंह, शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, व संघ व्यवस्थापक डॉ. नीलेश सावे उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून तसेच दीपप्रज्वलनाने उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. श्रीमती व्हॅलेंटिना भार्गव यांनी सूत्रसंचालन केले तर व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. प्रकाश कुंभार यांनी आभार मानले.

डोक्यावर महाराष्ट्रीय फेटा आणि गळ्यात पंजाबी फलकारी, हा दुर्मिळ क्षण

आज डोक्यावर महाराष्ट्रीय फेटा आणि गळ्यात पंजाबी फलकारी घालून मी आपणासमोर उभा आहे. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत दुर्मिळ क्षण आहे. उत्तर भारत व पश्चिम भारताचा हा अनोखा मिलाप होतो आहे, याचा अतिशय आनंद वाटतो आहे, अशी भावना यावेळी प्रा. लखनपाल यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment