Thursday 12 May 2022

ज्ञानाची वृद्धी उत्तराने नव्हे; तर प्रश्नाने: डॉ. चंद्रकांत पाटील

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित लेखक कृतज्ञता समारंभात बोलताना डॉचंद्रकांत पाटील. मंचावर कुलगुरू डॉडी.टीशिर्केप्रभारी कुलसचिव डॉव्हीएनशिंदेडॉरणधीर शिंदे आणि डॉनमिता खोत.


 

कोल्हापूर, दि. १२ मे: ज्ञानाची वृद्धी ही उत्तराने होत नाही, तर प्रश्नांमुळेच होते. त्यासाठी वाचन हा आपल्‍या नित्य चिंतनाचा भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी, अनुवादक आणि समीक्षक डॉ. चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि मराठी अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज कृतज्ञता समारंभ पार पडला. मराठीतील ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर व समीक्षक डॉ. म.सु. पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यापश्चात त्यांचा अनमोल आणि बहुविध असा ग्रंथसंग्रह शिवाजी विद्यापीठास भेट दिला. त्याबद्दल कृतज्ञता समारंभ आयोजित केला होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

पुस्तकांच्या जगात या विषयावर डॉ. पाटील यांनी विवेचन केले. ते म्हणाले की, समाजसंस्कृतीच्या वाटचालीत पुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाचावे कसे, यावर देखील सर्वंकष चर्चा होणे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, काळसेकर व पाटील यांची ग्रंथसंपदा पाहिली की त्यांची वैचारिक दृष्टी आपल्याला कळते. चांगले लिहिण्यासाठी चांगले वाचणे महत्त्वाचे असते.

यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. व्‍ही.एन. शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक डॉ. नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. धनंजय सुतार यांनी आभार मानले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे, डॉ. मेघा पानसरे, डॉ. नंदकुमार मोरे, प्रा. एन. एम. घोटगावकर तसेच विविध अधिविभागांतील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 


 

No comments:

Post a Comment