Friday 31 March 2023

शिवाजी विद्यापीठाचा रा.कृ. कणबरकर पुरस्कार-२०२३

डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर

 

प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, मा. कुलपती, भारती अभिमत विद्यापीठ, पुणे


कोल्हापूर, दि. ३१ मार्च: शिवाजी विद्यापीठातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय 'प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार' भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांना जाहीर करण्यात येत आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते येत्या १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पुरस्कार प्रदान समारंभ होईल, अशी घोषणा शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. रुपये १ लाख ५१ हजार रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य रा.कृ. कणबरकर राष्ट्रीय पुरस्काराच्या शोध समितीने सन २०२३च्या पुरस्कारासाठी भारती अभिमत विद्यापीठाचे विद्यमान कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांची एकमताने निवड केली. डॉ. कदम यांनी एक प्रभावी शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, एक उत्साही संशोधक आणि तळमळीचा समाजसेवक म्हणून दिलेले योगदान लक्षात घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

सन २०१६ पासून हा पुरस्कार भारतरत्न प्रा. सी.एन.आर. राव (२०१६), रयत शिक्षण संस्था, सातारा (२०१७), डॉ. जब्बार पटेल (२०१८), प्रा. एन.डी. पाटील (२०१९) आणि डॉ. डी.वाय. पाटील (२०२२) यांना प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, शोध समितीचे सदस्य प्राचार्य डॉ. बी.ए. खोत उपस्थित होते.

प्राचार्य रा.कृ. कणबरकर पुरस्काराविषयी...

महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक, दक्षिण भारत जैन सभेची कर्मवार भाऊराव पाटील, कोल्हापूर भूषण, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे महाराज, शाहू प्रतिष्ठान आदी विविध पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. 'देणाऱ्याने देत रहावे, घेणाऱ्याने घेतच राहावे, घेता घेता देणाऱ्याचे हातचे घ्यावेत' या उक्ती सार्थ ठरवणारा दीड लाखांचा 'प्राचार्य रा. कृ. पुरस्कार' त्यांच्या स्मृतीपित्यर्थ दरवर्षी देण्याइतकी रक्कम त्यांच्या कुटुंबियांनी शिवाजी विद्यापीठाकडे ठेव ठेवली आहे. या पुरस्कारासाठी भाषा, साहित्य, शास्त्रे, सामाजिक व नैसर्गिक, कला, क्रीडा, समाजसेवा तसेच सामाजिक हिताचे लक्षणीय संसदीय काम करणारी व्यक्ती / संस्था यांच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन पुरस्कार प्रदान करण्याबाबत निर्णय घेतला जातो. पुरस्कारप्राप्त व्यक्तिस शाल, श्रीफळ, ,५१,०००/- रू. चा धनादेश, स्मृतीचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुशल शैक्षणिक प्रशासक डॉ. शिवाजीराव कदम (अल्पपरिचय)

भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे कुलपती प्रा.डॉ. शिवाजीराव श्रीपतराव कदम यांनी या विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, नंतर कुलगुरूपद भुषवित आता कुलपतीपदावर विराजमान होवून ते समर्थपणे कार्यभार सांभाळत आहेत.

डॉ. शिवाजीराव कदम यांचा प्रवास अतिशय देदिप्यमान असून या वाटचालीमध्ये त्यांना स्वत:ला आदर्श व ध्येयनिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, उत्साही संशोधक आणि निस्वार्थी समाजसेवक म्हणून सिद्ध केले आहे. रसायनशास्त्र विषयातून डॉक्टरेट मिळविल्यानंतर डॉ. कदम यांनी दीर्घकाळ अध्यापन व संशोधन क्षेत्रात व्यतीत केला आहे. डॉ. कदम यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १७५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य म्हणून १४ वर्षे, विद्वत् परिषदेवर १२ वर्षे, अधिसभा सदस्य म्हणून १६ वर्षे असे भरीव योगदान दिले आहे. तसेच औषध निर्माणशास्त्र या विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून त्यांनी १५ वर्षे काम केले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग (दोन वेळा) व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (तीन वेळा) या भारत सरकारच्या दोन सर्वोच्च संस्थांचे सदस्य म्हणून त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. तसेच नॅकचे सदस्य म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले आहे. तसेच, रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या शिक्षणसंस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून देत ते असलेले शैक्षणिक योगदान प्रशंसनीय आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांना विविध सन्मान आणि पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

प्राचार्य डॉ. रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी

प्राचार्य रामचंद्र कृष्णाजी कणबरकर (१९२१-२०१४) यांचे बालपण मॅक्झिम गॉर्कीच्या रशियातील कष्टमय विदारक अनुभवांची आठवण देते. वेदनामय अयशस्वी दत्तक प्रकरण आणि वयाच्या १४ व्या वर्षी हरवलेले पित्रृछत्र यामुळे बेळगावसारख्या शहरात वास्तव्याला असूनही सातवीच्या परीक्षेला बसता आले नाही. अनंत अडचणींना तोंड देत हा राम १९४० मध्ये मॅट्रिकची परीक्षा पहिल्या वर्गात पास झाला. 'राकृ हे संक्षिप्त नाव लाभलेल्या या तरूणाच्या आयुष्यातील वाटा आणि वळणे थक्क करणारी आहेत. कष्टाळू वृत्ती, पारदर्शी मन आणि निःस्वार्थी स्वभाव यामुळे 'राकृ' या शब्दाला हळूहळू वेगळे वलय प्राप्त होत गेले. १९४७ साली नव्यानेच सातारला कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या छ. शिवाजी कॉलेजला इंग्रजीच्या प्राध्यापकाची गरज होती. बेळगावातील लिंगराज कॉलेजमध्ये पूर्वीच मिळालेली स्वगृहीची नोकरी सोडून ते सातारला गेले. उमद्या वयात कर्मवीर भाऊराव पाटलांचा सहवास व संस्कार ही त्यांना मिळालेली मोठी शिदारी होती. कोल्हापूरच्या गोखले कॉलेजात प्राध्यापक झाल्यानंतर त्यांना विवेकानंद शिक्षण संस्थेत, संस्थापक सभासद बापूजी साळूंखे यांनी उस्मानाबाद येथील त्यांच्या संस्थेच्या पहिल्या कॉलेजचे प्राचार्य केले. १९५९ ते १९७५ पर्यंत, वयाच्या पन्नाशीपर्यंत त्या संस्थेत त्यांनी कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेजदेखील पहिले प्राचार्य म्हणून मोठ्या उंचीवर नेले. न्यु कॉलेजच्या अडचणीच्या वेळी त्यांनी प्राचार्य कणबरकरांना पहिले प्राचार्य व्हायला लावले. या अनुभवी प्राचार्यांनी मोठ्या कौशल्याने न्यू कॉलेजची उभारणी दुप्पट वेगाने केली. महाराष्ट्र राज्याचा आदर्श शिक्षकाचा शासकीय पुरस्कार मिळाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूपदही त्यांनी भूषविले.


No comments:

Post a Comment